' प्रिय BMC, मुंबईतील पावसाचे हाल वाचवायचे असतील तर प्लिज हे वाचा…! – InMarathi

प्रिय BMC, मुंबईतील पावसाचे हाल वाचवायचे असतील तर प्लिज हे वाचा…!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आवाहन : मुंबईत (आणि इतरत्रदेखील) दर वर्षी निर्माण होणारी पूर / पूर सदृश परिस्थिती निर्माणच होऊ नये, ह्यासाठी काय करता येईल? आपली उत्तरं आमच्या फेसबुक पेज – facebook.com/MarathiPizza – वर मेसेज करा. निवडक अभ्यासपूर्ण लेखांना प्रसिद्धी देण्यात येईल. 

काल मुंबईवर वरुणराजाची जरा जास्तच कृपादृष्टी झाली आणि अख्खी मुंबई जलमय झाली. गटार, नाले, रस्ते तुंबले, वाहतुकीचे तीन-तेरा वाजले, चाकरमानी घराबाहेर अडकून पडला. घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे धावणारी मुंबई मंदावली आणि हळू हळू ठप्प झाली. तब्बल १०-१२ तास मुंबईकरांनी हाल सहन केले. या आधी मुंबई पावसामुळे अशी बंद झाली होती ती २६ जुलै २००५ रोजी! म्हणूनच पुन्हा एकदा २६ जुलै सारखीही परिस्थिती अनुभवायला लागतेय की काय अशी भीती प्रत्येक मुंबईकराला सतावत होती. पण नंतर अजून एक खुलासा झाला तो म्हणजे २६ जुलै २००५ रोजी तब्बल ९४४ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती आणि काल २९ ऑगस्ट २०१७ रोजी अर्ध्यापेक्षाही कमी म्हणजे २८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.

mumbai-rain-marathipizza
indiatoday.in

मग अश्या वेळी प्रश्न असा उपस्थित होतो की २६ जुलैला १२ वर्षे पूर्ण होऊन देखील त्यातून प्रशासनाने अजूनही काहीच धडा घेतलेला नाही का? २६ जुलैच्या तुलनेत अतिशय कमी पावसाची नोंद होऊन देखील मुंबापुरीची तुंबापुरी झालीच कशी? इथे केवळ मुंबई प्रशासनावर बोट ठेवून भागणार नाही. अशीच परिस्थिती भारताच्या बहुतेक शहरांत आढळून आली होती.

ह्या २१ ऑगस्टला पंजाबची राजधानी चंडीगड मध्ये कधी नव्हे इतक्या १२२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हा पाउस काल झालेल्या मुंबईतील पावसापेक्षा अतिशय कमी होता, पण तिथेही चंडीगड ठप्प झाले होते. लोक आपल्या गाड्यांमध्येच अडकून पडले. घरी जायचे म्हटले तर कमरेपर्यंत पाण्यापर्यंत वाट काढत जावे लागले.

chandigarh rain marathipizza
indianexpress.com

स्वातंत्र्यदिनादिवशी बँगलोर शहरामध्ये ११ आणि १२ ऑगस्ट रोजी आगरताळा शहरामध्येही अतिवृष्टी झाली, जी १००-५० मिलीमीटरच्या आसपास होती, पण त्या पावसाने ह्या दोन्ही शहरांमधील जनजीवन विस्कळीत झालं होतं. अशी कित्येक शहरांची उदाहरणे देता येतील – जेथे पावसाने १०० मिलीमीटरची मर्यादा पार केली आणि शहराच्या तीन-तेरा वाजले.

या प्रत्येक शहरातील प्रशासनाचे हेच म्हणणे होते की,

आम्ही पुरेपूर जबाबदारी घेतली होती, सर्व कामे सुरळीत केली होती, पण पाउस जास्त झाला त्याला आम्ही काय करणार?

पण मंडळी तुम्हाला माहित आहे का, जेव्हा २०१५ मध्ये चेन्नई अशीच जलमय झाली होती तेव्हा चेन्नई महापालिकेने त्यावर अनेक संस्थांकडून अहवाल मागवून घेतले होते आणि ज्यात बँगलोर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि चेन्नईच्या आयआयटीने असा अहवाल सदर केला की –
भारतीय पट्ट्यात हवामान बदल प्रकर्षाने होत आहे आणि त्यामुळे इथून पुढे १०० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस हा वारंवार होतच राहणार आहे.

म्हणजे आता आपल्याला ५०-६० मिलीमीटर पावसाच्या प्रमाणाबद्दल विसरून जाऊन १०० मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पावसापासून शहराला सुरक्षित कसं राखता येईल याचा विचार करायला हवा.

कदाचित ही गोष्ट चेन्नई वगळता कोणत्याही प्रशासनाला माहित नसावी, अन आता भारतातातील प्रत्येक शहराच्या प्रशासनाला आपल्या उपाययोजना ह्या अतिवृष्टी होणारच हा विचार डोळ्यासमोर ठेवूनच करावा लागेल.

जगभरातील सर्वच शहरांमध्ये, जेथे भरपूर पाऊस पडतो तेथे ५-६ वर्षांपूर्वीपासूनच या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत आणि आपल्याकडचे प्रशासन मात्र अजूनही पावसावर खापर फोडून मोकळं होत आहे हे दुर्दैव!

मुंबईच काय, अन्य कोणतीही शहरे घ्या, त्यांची रचना अशी आहेच नाही की १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यास ते तग धरून राहू शकतात. मुळात पाण्याचा निचरा व्हायला जागा नाही. पंपिंग स्टेशन्स कार्यक्षम नाहीत आणि तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कचरा. योग्य वेळेत, पावसापूर्वीच कचरा आणि गाळ उपसला गेला तर परिस्थिती म्हणावी तितकी हाताबाहेर जाणार नाही.

भारतातील सर्वच शहरे “विकसित” होत आहेत. झपाट्याने वाढताहेत आणि ही वाढ अस्ताव्यस्त आहे. त्यामुळे मिळेल त्या जागेत बांधकाम होत आहे, परिणामी पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी अडूनच राहते. कधीकधी तर बांधकाम इतके निकृष्ट दर्जाचे असते की इवल्याश्या पावसाने देखील ते कोसळून जाते. हे सर्व रोखायचे असेल तर प्रशासनाने चाकोरीबाहेरचा विचार केला पाहिजे. पारंपारिक पद्धतीने काम करण्याऐवजी विदेशातील तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या संकटांसाठी सज्ज झाले पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळात यापेक्षा भयावह परिस्थिती उद्भवल्याशिवाय राहणार नाही.

आवाहन : मुंबईत (आणि इतरत्रदेखील) दर वर्षी निर्माण होणारी पूर / पूर सदृश परिस्थिती निर्माणच होऊ नये, ह्यासाठी काय करता येईल? आपली उत्तरं आमच्या फेसबुक पेज – facebook.com/MarathiPizza – वर मेसेज करा. निवडक अभ्यासपूर्ण लेखांना प्रसिद्धी देण्यात येईल. 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?