' अबू आझमी, बाबासाहेब आंबेडकर, वंदे मातरम आणि इस्लामी मुळतत्ववाद – InMarathi

अबू आझमी, बाबासाहेब आंबेडकर, वंदे मातरम आणि इस्लामी मुळतत्ववाद

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

मध्यंतरी काही काळ शमलेला ‘वंदे मातरम सक्ती’चा वाद आता पुन्हा एकदा उफाळून आला आहे आणि या सक्तीविरोधात वादग्रस्त विधान करून समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आगीत अजून तेल टाकण्याचं काम केलंय असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

आम्हाला देशातून बाहेर काढा, पण खरा मुसलमान कधीच वंदे मातरम् गाणार नाही. मी ‘वंदे मातरम्’चा सन्मान करतो. मात्र माझा धर्म मला वंदे मातरम् म्हणण्याची परवानगी देत नाही. मग कारवाई करा, किंवा जेलमध्ये टाका.

अबू आझमी यांच्या मुखातून असे वक्तव्य बाहेर पडल्याने साहजिकच संपूर्ण देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत, पण मुस्लिमांचा वंदे मातरम म्हणण्याला नेमका विरोध का आहे? अजूनही आपल्याला नीटसे माहित नाही. याच प्रश्नाच्या उत्तरावर प्रकाश टाकण्यासाठी डॉ. अभिराम दीक्षित आणि प्रतिक कोसके या दोन अभ्यासकांनी आपल्या फेसबुक वॉलवर मांडलेली मते आम्ही InMarathi.com च्या वाचकांसाठी लेखाच्या मार्फत प्रसिद्ध करत आहोत.

 

abu-azami-marathipizza
afternoonvoice.com

===

अबू आझमी आणि वंदे मातरम

मी व्यक्तिस्वातंत्र्याचा चाहता आहे. व्यक्तीला संपूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. हे स्वातंत्र्य अभिव्यक्तीचे आहे. स्वईराचाराचे सुद्धा आहे. एक व्यक्ती म्हणून वंदे मातरम -ला आझमींच्या अबूने विरोध करणे हा त्याचा अधिकार आहे. निदान असला तरी पाहिजे. याच्यावरून धिंगाणा घालायची गरज नाही.

वंदे मातरम गाण्यातली भारतमाता संघाची आहे – असा काहींचा आक्षेप आहे. मुद्दा वंदे मातरम चा नाहीच. मुद्दा सच्च्या मुसलमानाचा आहे. कुराण हदीस मधून आलेल्या धर्माचे पालन करणाऱ्या मुसल्लम इमानदाराचा आहे… अबू आझमी करत असलेल्या इस्लामी राजकारणाचा आहे. इस्लाम हा “दिन” म्हणजे धर्म राजकारण सबकुछ आहे.

कारण अबू आझमी चे स्टेटमेंट वंदे मातरम ला “व्यक्तिगत” विरोध करून संपत नाही. कुठलाही सच्चा मुसलमान वंदे मातरम म्हणणार नाही अशी त्याची गर्जना आहे आणि देशाबाहेर हाकलून दिले तरी चालेल तरीपण सच्चा मुसलमान वंदे मातरम म्हणणार नाही, अशी त्याची डरकाळी आहे.

डरकाळी खरी आहे. सच्चा मुसलमान अल्लाह सोडून कोणासमोर नमणार नाही. सच्चा मुसलमान काफिरांना शरण जाणार नाही. काफ़िरांची अथवा नास्तिकांची राजवट मोडून काढेल – तिथले कायदे संविधान मानणार नाही. हे सारे अबू आझमी खरे – खरे बोलत आहे. इस्लाम हा एकेश्वरवादी (अल्लाह ) – एकलोकवादी (मोमीन ) – एक कायदा (शरियत ) वादी असा एकमेव ठाम धर्म आहे. आम्हाला शरियत पाळायचा अधिकार संविधानाने द्यायलाच पाहिजे अथवा दिलेलाच आहे – अशी मुस्लिम नेतृत्वाची सरसकट भूमिका आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे –

मुस्लिमांच्या दृष्टीने हिंदु काफिर आहेत .काफ़िरांचि लायकी मान सन्मानाची नाही. इस्लाम नुसार काफिर जन्मानेच नीच (low born ) आणि दर्जाहीन (without status) असतात. काफिर शासित देशाला दार उल हरब असे म्हणतात. हे सर्व पाहता मुसलमान लोक हिंदु (भारत ) सरकारचे आदेश पाळणार नाहीत हे सिद्ध करायला आणखी पुराव्यांची गरज नाही.

– Volume 8. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 8. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989)

अबू आझमी सारख्या – अशा खरे बोलणाऱ्या सच्च्या मुसलमानांपासून “इतर काफिर नास्तिक” लोक्स बोध घेतील अशी खात्री आहे …. . आधुनिक आणि प्रगत व्हायचे असेल तर मुस्लिम यातून बोध घेतील आणि धर्मा पासून दूर जातील अशीही आशा करूया.

– डॉ. अभिराम दीक्षित

=====

islam-marathipizza
nationalvanguard.org

|| आझमी, वंदे मातरम आणि इस्लाम.. ||

गरज पडल्यास देशाच्या बाहेर जाऊ पण ‘वंदे मातरम’ म्हणणार नाही

या अबू आझमी यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा रान पेटलंय. ऑगस्ट 2006 मध्ये एका पत्रकार परिषदेत दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी ‘वंदे मातरम’ म्हणणे इस्लामी श्रद्धेच्या विरोधात असून मुस्लिमांनी वंदे मातरम म्हणणे बंद करावे असे जाहीरपणे सांगितले आहे.  त्यामुळे वंदे मातरम म्हणायला नकार देणे हा विचार केवळ अबू आझमी नावाच्या माथेफिरू डोक्यातून आलेला नाही तर त्यामागे मूलतत्त्ववादी धार्मिक विचारधारा आहे हे स्पष्ट आहे. या सर्वच वादाच्या पार्श्वभूमीवर ‘वंदे मातरम’ ला नेमका विरोध का आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

इस्लामची सर्वात महत्वाची आणि मूलभूत शिकवण ही आहे की अल्लाह एक आहे आणि तो एकमेव आहे. यालाच एकेश्वरवाद असे म्हणतात. अर्थात जो मनुष्य अल्लाह वगळता इतर देवतांवर श्रद्धा ठेवतो तो अनेकेश्वरवादी ठरतो आणि अनेकेश्वरवादी असणे हा कुराणाच्या दृष्टीने सर्वात कठोर शिक्षेस पात्र असणारा गुन्हा आहे.

तौहिद म्हणजे काय?

अल्लाह हा एक आणि एकमेव आहे आणि त्याच्या एकत्वात कोणीही भागीदार नाही ही अढळ श्रद्धा म्हणजे तौहिद. इस्लामच्या सुवर्णकाळात राज्य म्हणून इस्लामची जी काही भरभराट झाली ती ‘अल्लाह एक आहे’ या अढळ श्रद्धेमुळे झाली असे मुस्लिम पंडित म्हणतात आणि इस्लामची आज जी काही अवस्था आहे ती मुस्लिमांनी अनेकेश्वरवादाकडे दुर्लक्ष केल्यामुळे झाली आहे हेही ते सांगतात. त्यामुळे ‘तौहिद’ हा विशुद्ध इस्लामचा गाभा आहे.

आता होतं काय, की ‘वंदे मातरम’ म्हणताना मातृभूमीला दुर्गा, शारदा इत्यादी देवतांच्या जागी ठेवून तिची स्तुती करण्यात आली आहे. याचाच अर्थ एकेश्वरवाद या इस्लामच्या मूळ तत्वाशी ते विसंगत आहे. नव्हे विरुद्धच आहे आणि एकेश्वरवादाच्या विरोधात जाणे हा शुद्ध धर्मद्रोह आहे.

त्यामुळे इस्लामी पंडित आणि प्रसंगी अबू आझमी यांच्यासारखे मूलतत्त्ववादी लोक वंदे मातरम म्हणण्यास नकार देतात यात आश्चर्य काहीच नाही.

आता राहिला प्रश्न अबू आझमी यांच्या वक्तव्यावर मुस्लिम समुदायातून त्यांच्या विरोधात आलेल्या प्रतिक्रियांचा, तर विशुद्ध इस्लामच्या वैचारिक मांडणीनुसार अनेकेश्वरवादाला पाठींबा देणे ही ‘तकफिरी’ आहे आणि या तकफिरीविरोधात करायचा न्यायसंमत उठाव म्हणजेच ‘खुरुज’ हा अल्लाहवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाला करणे अनिवार्य आहे. ही इस्लामची भूमिका आहे.

परंतु आझमी यांच्या वक्तव्याला मुस्लिम समुदायातून उस्फुर्त विरोध हाच आपल्या घटनादत्त सेक्युलर विचारांचा खरा चेहरा आहे.

इस्लामने काफिर ठरवलेल्या मुस्लिम बांधवांना मुख्य प्रवाहात बरोबरीचे स्थान देणे आणि आधुनिकतेकडे घेऊन जाणे ही इस्लाम विरोधातली खरी लढाई असेल.

#जय_काफिरियत

– प्रतिक कोसके

====

असं आहे हे, आता हा वाद अजून काय उलथापालथ घडवून आणतो ते येणाऱ्या काळात सरकारची आणि मुस्लीम समाजाची भूमिकाच ठरवेल!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?