' कल्पना करवत नाही अश्या संकटांमधे ठामपणे लढत राहिलेली पेशव्यांची पराक्रमी लेक! – InMarathi

कल्पना करवत नाही अश्या संकटांमधे ठामपणे लढत राहिलेली पेशव्यांची पराक्रमी लेक!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

इतिहासात डोकावलं तर पुरुष व्यक्तीमत्वांचा भरणा अधिक असल्याची बाब लक्षात येते. शिवरायांचे मावळे असो, लढणारे वीर मराठे असो वा पेशवाई… इथे वीरांच्या यशोगाथा मोठ्या प्रमाणावर वाचायला मिळतात. अर्थात त्या काळी स्त्रिया चुल आणि मुल यात अधिक रमणाऱ्या असल्या तरी वीरांगनांचाही इतिहास मोठा आहे. याच यादीतील एक महत्वाचं नाव म्हणजे अनुबाई घोरपडे! घोरपड्यांची गादी सांभाळणाऱ्या आणि वेळप्रसंगी वाड्याबाहेर पडून मोहिमा लढणाऱ्या या विरांगनेचे पेशव्यांशी असलेलं खास नातं आजही अनेकांना ठाऊक नाही.

पेशवाईची नीव रचणारे बाळाजी विश्वनाथ यांचे थोरले सुपुत्र बाजीराव पेशवे हे सर्वानाच ज्ञात आहेत. पण याच पेशव्यांची धाकटी बहीण मात्र इतिहासाच्या काही मोजक्या पानांत हरवली आहे.

 

anubai im

 

थोरले बाजीराव, नानासाहेब, राघोबादादा, नारायण राव, विश्वासराव…पेशवाईतील या वीरांमध्ये त्यांच्याइतकीच पराक्रमी, अनेक आघाड्यांवर लढणारी एक व्यक्ती म्हणजे थोरल्या बाजीरावांची धाकटी आणि लाडकी बहीण म्हणजे अनुबाई घोरपडे.

अनुबाई सहा वर्षांच्या असताना त्यांचा विवाह इचलकरंजीचे व्यंकटराव घोरपडे यांच्याशी झाला. पेशव्यांची ही लेक राजकारण, युद्धनिती यात रमली नसती तरच नवल! खऱंतर वयाची केवळ सहा वर्ष त्या पेशव्यांच्या अंगाखांद्यावर खेळल्या मात्र पेशव्यांमधील निडरता, चिकाटी हे गुण आपोआप त्यांच्यात रुजले.

लग्नानंतर सुरवातीला त्या संसारात रमल्या, मात्र त्यावेळीही दरबारातील राजकारण, समाजकारण यातही त्यांची रुची होती. मात्र त्यांच्या या आवडीला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन मिळालं ते पुण्यात आल्यावर!

 

shaniwarwada im

 

व्यंकटराव मोहिमांवर असताना अनुबाईंना इचलकरंजीला करमत नसे, शिवाय इकडे पेशव्यांनाही धाकट्या बहिणीची आठवण येत असल्याने त्यांनी पुण्यातच त्यांच्यासाठी महाल बांधला, त्यामुळे वरचेवर पुणे स्वारी करणाऱ्या अनुबाई पुण्यातील राजकारण, दरबारी कामकाज यांकडे जातीनं लक्ष द्यायच्या.

नारायणराव आणि वेणुबाई या दोन आपत्यांच्या जन्मापर्यंत अनुबाईंचं आयुष्य सुरळीत सुरु होतं. पत्नी, आई अशा भुमिका त्या पार पाडत होत्या. मात्र काही काळानंतर त्यांच्या पतीचं क्षयरोगानं निधन झालं आणि त्यांच्यावर आभाळ कोसळलं.

वैधव्यामुळे त्या खचल्या मात्र इचलकरंजीच्या राजकारभाराकडे पहात त्यांनी आपले अश्रु गिळले. १७४५ साली मुलगा नारायणराव यांना गादीवर बसवत त्यांनी कारभार आपल्या हाती घेतला. मुलगा वयानं लहान असल्यानं महत्वाचे निर्णय, मोहिमांची आखणी, राजकारण या सर्वच बाबतीत त्या सक्रीय होत्या.

बंधू बाजीरावर यांच्या निधनानंथर त्यांनी पेशवाईतील आपल्या अनेक भाच्यांचा आधार दिला.

१७५६ साली सावनूर आणि धारवाडच्या मोहिमेत अनुबाई स्वतः रणी उतरल्या. ही मोहिम फत्ते झाल्यानंतरच त्या इचलकरंजी येथे पतरल्या. यावेळी त्यांच्या चातुर्याची तसंच युद्धनितीची महती थेट पुण्यापर्यंत पोहोचली होती. या मोहिमेत त्यांनी बेळगाव, बागलकोट, मिश्रीकोट, धारवाड यांसारखी अनेक महत्वाची ठाणी आपल्याकडे घेतली.

 

indian warrior im

 

१७७५ च्या श्रीरंगपट्टमणच्या मोहिमेतही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली इचलकरंजीच्या सैन्याने पराक्रम गाजवला.

मात्र पराक्रमी अनुबाईंच्या मुलाने वेळोवेळी त्यांची निराशा केली. वारंवार तो मोहिम अर्धवट सोडून परतून यायचा, मात्र अनुबाई नेटाने मोहीम पुर्ण करायच्या.

अनुबाईंचे शौर्य पाहून नानासाहेब पेशव्यांनी धरावाडचा संपूर्ण परिसर अनुबाईंच्या ताब्यात दिला. यानंतर त्यांनी विविध मोहिमांव्दारे धारवाडचा संपूर्ण परिसर इचलकरंजी संस्थानाशी जोडला.

इतकंच नाही, तर पेशव्यांच्या मोहिमांमध्येही अनुबाई त्यांना विविध पद्धतीने मदत करायच्या.

एकीकडे शत्रुशी लढणाऱ्या अनुबाईंना घरात मात्र जिंकता येत नव्हतं. व्यसनी, हेकेखोर मुलापुढे त्यांचा निभाव लागत नव्हता. मात्र असं असलं तरी अशा मुलाच्या हाती सत्ता येऊ द्यायची नाही हा पण त्यांवी अखेरपर्यंत जपला.

मुलाच्या निधनानंतरही दुःख करत न बसता रयतेकडे पाहून त्यांनी नातवाला गादीवर बसवलं, आणि प्रत्यक्ष सत्तेची दोरही त्यांनी आपल्याच हाती ठेवला.  १७४५ पासून तब्बल ३८ वर्ष त्या इचलकंजीची राज्यकर्ती म्हणून काम पहात होत्या.

अखेरिस घरातील कारवायांना कंटाळून त्यांनी राजसंन्यास घेतला आणि काशीस प्रयाण केलं. १७८३ साली तुळापुर येथे निधन झालं.

पेशव्यांची लेक ही एवढीच ओळख मर्यादित न ठेवता स्वतंत्र राज्यकर्ती, पतीच्या पश्चात त्याचं राज्य सांभाळणारी अर्धांगिनी, तहाच्या राजकारणातील मु्स्सद्दी शासक अशा विविध आघाड्यांवर लढणाऱ्या अनुबाईंविषयी फारशी माहिती उपलब्ध नसणं ही दुर्दैवाची बाब नाही का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?