' टेंशनमधे, स्ट्रेसमधे गोड खावंसं का वाटतं? तुमचा मेंदू मोठाच घोळ घालतोय! – InMarathi

टेंशनमधे, स्ट्रेसमधे गोड खावंसं का वाटतं? तुमचा मेंदू मोठाच घोळ घालतोय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गोड खायला अनेकांना आवडतं. गोडाधोडाची आवड असणं ही काही वाईट गोष्ट नक्कीच नाही. पण ‘अति तिथे माती’ म्हणतात, तसं गोड सुद्धा अति खाणं वाईटच! मधुमेहासारखे आजार, लठ्ठपणा, किंवा अशाच नकोशा गोष्टींना आमंत्रण देण्यासाठी हा गोडवा पुरेसा असतो.

आवडीने आणि सवडीने गोड पदार्थ खाणं, हा झाला एक भाग; मात्र तुम्हाला हे माहित्ये का, की तणावात असताना किंवा अतीव राग आल्यानंतर गोड खाण्याची इच्छा होते. तुमच्याही बाबतीत हे असं कधी ना कधी घडलं असेलच ना? अशावेळी गोड खाण्याची इच्छा नेमकी का होते, याचा कधी विचार केला आहेत का?

 

sweet cravings IM

 

नको, हा विचार करून तुमचा आत्ताचा तणाव वाढवू नका. गोड खाण्याची इच्छा आत्ता होऊ देऊ नका. आम्ही आहोत ना, या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायला. चला तर मग, जाणून घेऊया.

मेंदू इवलासा असला तरी…

मानवी मेंदू हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव असतो, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. वजनाचा विचार केला, तर शरीराच्या एकूण वजनाच्या मात्र दोन टक्के वजन मेंदूचं असतं. मात्र या मेंदूला आवश्यक असणारी ऊर्जा फार अधिक असते. आपण खात असलेल्या कर्बोदकांमधून मिळणाऱ्या ऊर्जेपैकी निम्मी ऊर्जा एकटा मेंदू वापरत असतो.

एवढंच नाही, तर साखरेतून मिळणारं ग्लुकोज हे मेंदूसाठी ऊर्जेचा सगळ्यात मोठा स्रोत असतं. म्हणजेच मेंदूची थोडी जरी दमछाक झाली, तर तो पहिली मागणी ग्लुकोज किंवा कर्बोदकांची मागणी करणार हे वेगळं सांगायची गरज नाही.

 

human brain inmarathi 2

 

कर्बोदकं म्हणजेच कार्ब्स, शरीराला पटकन ऊर्जा देण्याचं काम करतात. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं, तर ताण किंवा मानसिक स्थिती फारशी ठीक नसताना काम नीट होत नसेल, तर जेवण झाल्यावर किंवा कार्ब्सयुक्त आहार घेतल्यावर तीच व्यक्ती अधिक उत्साहाने काम करायला सुरुवात करेल.

वैज्ञानिक प्रयोगातून सिद्ध झालं आहे की…

तणावाचा आणि गोड खाण्याची इच्छा होण्याचा नेमका काय संबंध आहे, हे समजून घेण्यासाठी मध्यंतरी एक वैज्ञानिक प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात ४० जणांचा सहभाग होता. यातील काही जणांना अनोळखी समूहासमोर उभं करण्यात आलं. त्यांच्यासमोर व्याख्यान देण्याचं काम सांगण्यात आलं.

इतर मंडळींना मात्र असं काहीही सांगण्यात आलं नाही. सगळ्यांचं व्याख्यान संपल्यानंतर, सर्वच्या सर्व ४० जणांना जेवणाचं निमंत्रण देण्यात आलं. तासाभराची वेळ जेवण करण्यासाठी देण्यात आली. या जेवणानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला, की व्याख्यान देण्याच्या ताणामुळे, ज्यांचा मेंदू थकला होता त्यांना ३० ते ४० ग्रॅम अधिक कार्ब्सची गरज भासली. व्याख्यानामुळे मेंदूला आलेला तणाव हे त्याचं महत्त्वाचं कारण ठरलं.

दुपारी काम करताना चॉकलेट खाण्याची इच्छा झाली तर…

ऑफिसच्या वेळात विशेषतः कामाचा ताण फार असेल, तर अनेकांना चॉकलेट खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही फार काही खाल्लेलं नसेल, तर चॉकलेट खायला काहीच हरकत नाही. खरंतर चॉकलेट खायलाच हवं असं म्हटलं, तरी ते चुकीचं ठरणार नाही.

 

girl eating dark chocolate

 

कामाचा तणाव असताना स्ट्रेस हार्मोन्सची निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेली असते. हा तणाव नियंत्रणात आणण्यासाठी मेंदूला अधिक ऊर्जेची आवश्यकता असते. अशावेळी चॉकलेट खाऊन ही आवश्यक ऊर्जा मेंदूला पुरवणं कधीही उत्तम! असं झालं नाही, तर शरीराला हवं असणारं ग्लुकोज मेंदू स्वतःसाठी वापर लागतो.

स्नायुंसाठी आवश्यक असणारं ग्लुकोज मेंदूने वापरायला सुरुवात केली, तर शरीरावर अधिक ताण येतो आणि अशावेळी अधिक स्ट्रेस हार्मोन्सची निर्मिती होऊ लागते. म्हणजेच चॉकलेट खाण्याची इच्छा मारणं अधिक तणावाचं ठरू शकतं.

अर्थात, हे करत असताना, चॉकलेट किंवा इतर कुठलाही गोड पदार्थ खात असाल, तर तो मर्यादेत खाल्ला जाईल आणि अशी स्थिती वारंवार येणार नाही याची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. कारण साखरेचं अति सेवन म्हणजे आजाराला निमंत्रण आहेच.

भावनिक परिस्थिति हेच मुख्य कारण…

ताण-तणाव, राग-चिडचिड, दुःख अशा भावनिक अवस्थांमध्ये आपल्याला गोड खावंसं वाटतं.

 

Business woman headache and stress
theindianexpress.com

 

अशा भावनिक स्थितीत शरीर ऍड्रेनॅलीन आणि स्ट्रेस हार्मोन्सची मोठ्या प्रमाणात निर्मिती करतं. यामुळे ब्लड प्रेशर वाढणं, चयापचय आणि हृदयाची गती वाढणं अशी लक्षणं दिसू लागतात.

एकावेळी या अशा घटना घडू लागल्या की शरीराला थकवा येणं, किंवा तशी भावना निर्माण होणं ही स्वाभाविक बाब आहे. हा थकवा घालवण्यासाठी ग्लुकोज आणि कार्ब्सची गरज असते.

गोड पदार्थांमधून या दोन्ही घटकांचा भरपूर पुरवठा होतो. शरीराला असणारी ऊर्जेची गरज लवकरात लवकर पूर्ण होते. म्हणूनच भावनिक झाल्यानंतर, गोड खाण्याची तीव्र इच्छा अनेकांना होत असते.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?