' शिंदे गोटातील बंडखोरांना संरक्षण द्यायला पुढे आलेल्या छावा संघटनेचा इतिहास रंजक आहे! – InMarathi

शिंदे गोटातील बंडखोरांना संरक्षण द्यायला पुढे आलेल्या छावा संघटनेचा इतिहास रंजक आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाराष्ट्रात सध्या ज्याप्रमाणे राजकारण घडत आहे ते बघून इतके वर्ष राजकारणात रस नसणारे लोक सुद्धा राजकारणावर चढाओढीने बोलतांना दिसत आहेत. मागच्या एक महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षाला काल अखेर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याने पूर्णविराम लागला आणि एकनाथ शिंदे यांचा गट जिंकला असं म्हणावं लागेल.

गुवाहाटीवरून आज ३९ मंत्र्यांचं वक्कल आज मुंबईत दाखल होईल आणि नव्या सरकारचा जन्म होईल यात आता कोणतीही शंका राहिलेली नाहीये.

आधी सुरत आणि मग गुवाहाटीला जाऊन तळ ठोकून बसलेल्या एकनाथ शिंदेंसमोर परत आल्यानंतर ‘ज्यासाठी केला हा अट्टहास’ ते सरकार स्थापन करण्यात मदत करणे आणि मधल्या काळात शिवसेनेकडून मलीन करण्यात आलेली त्यांची प्रतिमा स्वच्छ करणे असं दुहेरी आव्हान असणार आहे.

 

eknath im 1

 

एकनाथ शिंदे गटाला पाठींबा देत त्यांना संरक्षण दिलं अशी मागणी ‘छावा’ या संघटनेने सर्वप्रथम केली होती. छावा हा कोणताही राजकीय पक्ष नसला तरीही त्यांच्याकडे असलेल्या मोठ्या संघटनेचा फायदा हा एकनाथ शिंदे गटाला होऊ शकतो असं राजकीय जाणकार सांगत आहेत.

छावा संघटनेच्या पाठींब्याला का महत्व दिलं जात आहे? कोणी स्थापन केली आहे ही संघटना आणि त्यांचा काय उद्देश आहे? जाणून घेऊयात.

अण्णासाहेब जावळे पाटील हे ‘छावा’ या संघटनेचे संस्थापक आहेत. अण्णासाहेब जावळे पाटील यांना मराठा समाजाने आदराने ‘क्रांतीसूर्य’ ही पदवी बहाल केली आहे. संभाजी महाराजांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या या संघटनेचा प्रमुख उद्देश ‘मराठा समाजाला एकत्र आणणे’ आणि त्यांच्यावर ‘अन्याय न होऊ देणे’ हा आहे.

आपला धर्म आणि मराठा समाजाचा सन्मान राखण्यासाठी संभाजी महाराजांनी दाखवलेलं शौर्य आणि त्याग याची माहिती जनसामान्यांना कळावी यासाठी ‘अखिल भारतीय छावा संघटना’ ही नेहमीच आग्रही राहिलेली आहे.

छावा ही संघटना जरी प्रामुख्याने मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेली असली तरीही आमच्यासाठी देश हा सर्वप्रथम येतो हे संस्थापक अण्णासाहेब पाटील हे आपल्या भाषणातून नेहमीच सांगायचे. सामान्य जनतेला राजकारणाची माहिती देणं आणि वेळीच सतर्क करणे हे देखील ‘अखिल भारतीय छावा संघटना’ आपलं आद्य कर्तव्य मानते.

मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षण मिळवून देणे आणि सामाजिक विषमता कमी करणे हे उद्देश डोळ्यामोर ठेवून सध्या संघटना विविध आंदोलनं करत आहे. ‘मराठा समाजाचा मोठा भाऊ’ अशी प्रतिमा छावा संघटना आपल्या स्थापनेपासून मराठा समाजात निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे.

छावा संघटना ही आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला ‘मावळा’ या नावाने संबोधतात. “आमचा कोणत्याही इतर जातींना विरोध नाहीये.” हे छावा संघटना वारंवार सांगत असते.

 

chawa sanghatana IM

 

“छावा संघटनेचा मेहनत करून आपलं पोट भरणाऱ्या उत्तर भारतीय लोकांबद्दल कोणताही विरोध नाहीये. आमचा विरोध हा केवळ इतरांना त्रास देणाऱ्या परप्रांतीय लोकांना आहे” ही आपली भूमिका अणासाहेब जावळे पाटील नेहमीच मांडायचे.

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळी मराठा आणि दलित समाजात झालेली दंगल बघून ‘अखिल भारतीय छावा युवा संघटना’ स्थापन करावी असा अण्णासाहेब जावळे पाटील यांनी विचार केला होता.

काँग्रेस आणि शिवसेना यांनी मराठा समाजातील मुलांना नेहमीच गृहीत धरलं असं छावा संघटना उघडपणे सांगत असते. सतत बदलणारी सत्ता समीकरणं ही राजकीय पक्षांना केवळ सत्ता प्रिय असते हे अण्णासाहेब यांना आधीच कळलं होतं.

मराठा समाजातील युवक हा दिशाहीन होत चालला आहे आणि प्रत्येक राजकीय पक्ष हा केवळ त्यांचा निवडणूक आली की वापर करून घेत असतो हे थांबवण्यासाठी छावा ही संघटना स्थापन करणं गरजेचं आहे असं अण्णासाहेब जावळे पाटील यांना वाटलं आणि त्यानुसार त्यांनी आपलं कार्य केलं.

अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ‘क्रांतिसूर्याची यशोगाथा’ या कार्यक्रमात सांगताना राजेश जाधव सांगतात की, “अण्णासाहेब जावळे पाटील यांचा जन्म १९८९ मध्ये लातुर जिल्ह्यातील औसा तालुक्यात झाला होता. अण्णासाहेब हे अनाथ होते. आपलं शालेय शिक्षण त्यांनी अनाथाश्रमात राहून घेतलं होतं.

महाविद्यालयात गेल्यावर सायकल स्टॅन्डमध्ये जागा मिळवण्यासाठी केलेलं आंदोलन हे त्यांचं सर्वात पहिलं आंदोलन केलं होतं. अण्णासाहेब जावळे पाटील यांनी नंतर विद्यार्थी संघटन तयार केलं आणि गावागावांत फिरून त्यांनी मराठी समाजाला एकत्र आणण्याचं त्यांनी काम केलं.

 

chawa sanghatana 2 IM

 

२०१३ साली छावा संघटना ही आकार घेत असतांना अण्णासाहेब जावळे पाटील यांना कावीळने ग्रासले होते. पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. या आधी त्यांनी सोलापूर मध्ये देखील त्यांनी आपल्या आजारावर उपचार केले होते. पण, १० फेब्रुवारी २०१३ रोजी वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आणि छावा संघटनेच्या वाटचालीची गती काहीशी मंदावली. त्यांच्या पश्चात, नानासाहेब जावळे पाटील, दत्ता गायकवाड, विलास पांगारकर, करण गायकर सारख्या कार्यकर्त्यांनी त्यांचा वारसा पुढे चालवण्याचा निर्धार करत संघटनेचं काम सुरू ठेवलं आहे.

जिजाऊ ब्रिगेड या संघटनेच्या संस्थापक माधवी पाटील यांनी देखील छावा संघटना आणि अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांना नेहमीच पाठींबा दिला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मराठवाडा आणि खान्देश या भागात छावा संघटनेचं कार्य सध्या सुरू आहे. मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी आपली शाखा सुरू करावी अशी मागणी सध्या मराठा समाजाकडून केली जात आहे.

एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्यात छावा संघटनेच्या पाठींब्याने काय फायदा होईल हे आता सांगणं कठीण आहे. पण, छावा संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहिली तर त्यांना राजकीय निर्णय घेतांना, राबवतांना मदत होईल हे नक्की.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?