' महाराष्ट्राला शिवसेनेचे भविष्य असलेल्या आदित्य ठाकरेंबद्दलच्या “या” गोष्टी माहित असायलाच हव्यात – InMarathi

महाराष्ट्राला शिवसेनेचे भविष्य असलेल्या आदित्य ठाकरेंबद्दलच्या “या” गोष्टी माहित असायलाच हव्यात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मोठ्या वृक्षांच्या सावलीत त्यांचे नवे अंकुर कोमेजतात ते जारी कटू सत्य असले तरी प्रत्येक नियमाला अपवाद असतोच की! काही वेळा हे अंकुर वाटेतल्या अडचणी शिताफीने बाजूला सारत स्वबळावर मोठे होताना दिसतात. ते आपल्या पूर्वजांच्या पुण्याईचे पॉलिश न वापरता स्वत:च्या कौशल्याने स्वत:ला पैलू पाडतात. आदित्य उद्धव ठाकरे हे त्यापैकी एक आहेत.

आपल्या अखेरच्या दिवसांमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी तमाम शिवसैनिकांना उद्देशून एक भावनिक साद घातली होती ‘उद्धव आणि आदित्य ला मी तुमच्या हवाली करत आहे, त्यांना सांभाळून घ्या’…आणि खरेच तसेच झाले.

शिवसैनिक आजवर बाळासाहेबांच्या शब्दाला जागले आहेत. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी शिवसेनेने ‘विद्यार्थी सेना’ बदलून युवा सेना निर्माण करत त्याची सगळी सूत्र नव्या विचारांच्या, नव्या रक्ताच्या आदित्य ठाकरेंच्या हातात दिली.

फार कमी वयात पक्षात आलेल्या आदित्य ठाकरें विषयी अनेक मतं व्यक्त करण्यात आली होती पण आपल्या कामाच्या पद्धतीने आणि सर्वांना सोबत घेऊन मार्गक्रमण करण्याच्या वृत्तीने त्यांनी शिवसैनिकाच्या मनात जागा निर्माण केली आहे.

 

uddhav and aditya inmarathi

 

आजच्या घडीला शिवसेनेचे ‘भविष्य’ म्हणून त्यांच्याकडे पहिले जात आहे. पण शिवसेनेचे कार्याध्यक्ष असण्याबरोबरच आदित्य ठाकरे हे एक कवि, इतिहासाची आवड असणारे संवेदनशील मनाचे एक छायाचित्रकार आणि वकील आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? याबरोबरच आदित्य यांच्याबद्दलच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बर्‍याच जणांना माहिती नाहीत ,त्या आपण जाणून घेवू.

१. शिवसेनची जवाबदारी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर येणार याचं भाकीत उद्धव ठाकरेंनी २००८ सालीच वर्तवलं होतं. ज्यावेळी महाराष्ट्रात २००९ साली निवडणुका पार पडल्या त्यावेळी पक्षाच्या प्रचाराची जवाबदारी आदित्य ठाकरे पार पाडतांना आपल्याला दिसले होते.

उद्धव यांच्यावरील शस्त्रक्रियेनंतर आदित्य यांनी पक्षाची धुरा सांभाळली आहे. आताच्या सरकारमध्ये ते पर्यटन आणि पर्यावरण, वातावरणीय बदल, आणि राजशिष्टाचार खात्याचे मंत्री म्हणून काम पाहतात.

 

aditya im 2

 

२. आदित्य यांनी पदवी पर्यंत शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज मधून पूर्ण केलं आणि ‘केसी लॉ कॉलेज’ मधून एलएलबी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. कवि आणि गीतकार असलेल्या आदित्य यांना कलेचा वारसा घरातूनच मिळाला आहे. आदित्य यांचा ‘my thoughts in black and white’ हा इंग्रजी भाषेतील कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे.

हाच संग्रह मराठी आणि हिंदीतून देखील प्रकाशित झाला असून ‘प्रितिश नंदी’ यांनी पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे जिथे ते म्हणतात की “आदित्य ज्या प्रकारे त्याच्या सभोवतालच्या जगाचा शोध घेतो आणि त्याच्या स्वतःच्या अनुभवाच्या प्रकाशात त्याचा अर्थ लावतो ते त्याला आवडते.

महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ठाकरेंच्या चौथ्या पिढीतील आदित्य आपल्या कवितेत अनेकदा राजकीय विषय हाताळतात यात आश्चर्य नाही.” आदित्य यांच्या गीतांचा ‘उम्मीद’ नावाचा अल्बम प्रकाशित झाला आहे. ज्यातील आठ गाणी त्यांनी लिहिली आहेत. ‘उम्मीद’ मधील गीतांना शंकर महादेवन, सुरेश वाडकर, सुनिधी चौहान, कैलाश खेर यांनी स्वरसाज चढवला आहे.

३. आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा २०१९ साली विधानसभेची निवडणूक लढवली. निवडणूक लढवणारे आणि वैयक्तिकरित्या निवडणूक न लढवण्याची कौटुंबिक परंपरा खंडित करणारे ते ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य ठरले. १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना त्यांचे आजोबा बाळ ठाकरे यांनी केल्यापासून निवडणूक लढवणारे आदित्य हे कुटुंबातील पहिले व्यक्ती आहेत.

 

aditya im 1

 

४. आदित्य ठाकरे हे शिवसेनेची युवा शाखा असलेल्या युवा सेनेचे अध्यक्ष ही आहेत. १७ ऑक्टोबर २०१० रोजी युवा सेनेची स्थापना झाली होती ज्याची महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, बिहार आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये युनिट्स आहेत.

५. आदित्य ठाकरे यांनी अनेक लोकप्रिय उपक्रम राबवले आहेत- ज्यामध्ये BEST (बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट) बस च्या वतीने शालेय गणवेशातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवास पास दिले जातात.

मॉल्स आणि रेस्टॉरंट्स रात्रभर सुरू ठेवण्याची परवानगी देऊन मुंबईच्या नाइटलाइफचे पुनरुज्जीवन आणि रूफटॉप हॉटेल सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी राज्यसरकारला दिला आहे. ते म्हणतात की यामुळे शहर खुले होईल, राज्याचा महसूल वाढेल आणि मुंबई अधिक ‘पर्यटक अनुकूल’ होईल.

६.२०१० साली ’सच अ लाॅंग जर्नी’ पुस्तकाच्या प्रती जाळुन त्यांनी केलेले पहिले आंदोलन (या पुस्तकामुळे मराठी माणसाचा अपमान होत असल्याचा त्यांनी आरोप केला होता.) आजही अनेकांना आठवत असेल. याबरोबरच मुंबई विद्यापीठाचे आणि विद्यार्थ्यांच्या संबंधातले अनेक प्रश्न सोडवण्यात त्यांचा सहभाग आहे.

७. शिवसेना पक्ष आणखीन मजबूत करण्यासाठी आदित्य जनसंपर्क वाढवण्यावर भर देतांना दिसतात. कुठलाही मुद्दा अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यावर त्यांचा भर असतो. त्यांच्या वर्तनात सुसंस्कृतपणा जाणवतो, शिक्षणाची साथ असल्याने विषयातले बारकावे ते जाणून असतात.

८. पर्यटन खात्याचे मंत्री असल्याने, पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक स्त्रोत वाढावेत यासाठी अनेक पर्यटन स्थळांचा विकास व्हावा यासाठीच्या योजना त्यांनी सुरू केल्या आहेत. यामध्ये राजगडावरील रोप-वे तसेच मुंबईतल्या प्रसिध्द ‘राणी च्या बागेत’ पेंग्विन यावेत म्हणुन त्यांनी प्रयत्न केले आहेत. तसेच त्यांच्यावर बांधकाम खात्याचा भार देखील आला आहे.

 

penguin im

संजय राऊत आणि पत्राचाळ प्रकरण; नेमकं कनेक्शन आणि इतिहास जाणून घ्या!

शरद पवारांनी गळ टाकला आणि छगन भुजबळांनी ठोकला शिवसेनेला रामराम!

९. २०१५ च्या सुरुवातीला, आदित्य ठाकरे यांनी नेट न्यूट्रॅलिटी मोहिमेला पाठिंबा दिला. त्यासंदर्भात त्यांनी TRAI ला एक पत्र लिहिले होते.
ठाण्याजवळ असलेल्या जव्हार, मोखाडा येथील कुपोषणाचा आणि पाणी टंचाई चा मुद्दा उचलुन धरत त्यांनी आदिवासी भागातील मूलभूत प्रश्नांना सरकारसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

आजवर ‘व्हेलेंटाईन डे’ ला असणारा शिवसेनेचा विरोध आदित्य ठाकरेंमुळे मवाळ झाला. अधिकृतपणे निवडून येण्यापूर्वी, आदित्य यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात काही प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती , ज्यात प्रामुख्याने महाराष्ट्रात एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकवर बंदी होती,

१०. आदित्य यांना ब्रिटीश राजेशाहीचा इतिहास वाचायला आवडते आणि त्यांना क्रिकेट देखील आवडते. लाखो लोकांचे जीवन बदलेल असे काहीतरी सकारात्मक करण्यासाठी ते उत्सुक आहेत. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ते सर्वाधिक चर्चिले गेलेले नेते आहेत.युवासेनेच्या माध्यमातून हजारो तरुण स्वयंसेवकांना त्यांनी शिवसेनेत आणले.आहे.

३२ वर्षीय आदित्य अनेकदा चर्चेत असतात . कधी लव्ह लाईफमुळे तर कधी वादांमुळे. आदित्य यांचे नाव बॉलीवूड तारका दिशा पटानी आणि एका महिला राजकारण्याची नात यांच्याशीही जोडले गेले होते, परंतु आदित्य यांनी यावर मौन सोडले नाही.

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणातही त्यांचे नाव आले होते मात्र, तपासात हे सिद्ध होऊ शकले नाही. स्वभावाने ते आपले आजोबा बाळ ठाकरे यांच्या अगदी उलट आहेत. बाळ ठाकरे हे खूप आक्रमक होते, तर आदित्य त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखले जातात.

तर मित्रांनो हे होते शिवसेनेचे भविष्य म्हणून ओळखले जाणारे ‘आदित्य उद्धव ठाकरे.’

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?