' ‘जय भीम’ या शक्तिशाली नाऱ्याचा इतिहास थेट चवदार तळ्याच्या सत्याग्रहापर्यंत जातो…! – InMarathi

‘जय भीम’ या शक्तिशाली नाऱ्याचा इतिहास थेट चवदार तळ्याच्या सत्याग्रहापर्यंत जातो…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘जय भीम’ – हे दोनच शब्द आहेत. पण त्यांच्यात लोकांना एकत्र आणण्याची एक वेगळीच ताकद आहे हे यापुर्वी अनेकदा सिद्ध झालंय.

दलित समाजाच्या संवर्धनासाठी आपलं तन, मन, धन आणि ज्ञान देऊन आयुष्यभर मेहनत घेतलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन म्हणून हे दोन शब्द वापरले जातात हे आपण सर्वच जाणतो.

घटनेचे शिल्पकार, भारतरत्न अशा कित्येक सार्थ उपाधींनी सन्मानित असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजकार्याच्या कौतुकासाठी खरं तर शब्द अपुरे पडतील. पण, ‘जय भीम’ या एकाच नाऱ्यात त्यांच्या संपूर्ण योगदानाला त्यांचे कार्यकर्ते सलाम करतात हे विलक्षण आहे.

 

 

jay bhim im

 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जय भीम’ या मूळच्या तामिळ सिनेमामुळे हे सिद्ध झालं की, हा नारा केवळ महाराष्ट्रापुरता सीमित नाहीये, तर पूर्ण देशात त्यांचे अनुयायी, समर्थक त्यांची आठवण रहावी, आंबेडकरी चळवळीला समर्थन म्हणून हेच शब्द वापरले जातात.

डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांच्या नावाच्या आधी सर्वप्रथम कोणी ‘जय’ लावलं असेल ? आज मिरवणुकीत, एकमेकांची भेट झाल्यावर नेहमीच वापरले जाणारे हे दोन शब्द कोणी व कधी एकत्र आणले असतील ? जाणून घेऊयात.

१९३५ मध्ये ‘जय भीम’ हे शब्द आंबेडकरी चळवळीचे वरिष्ठ कार्यकर्ते बाबू हरदास एल यांनी सर्वप्रथम ‘जय भीम’ हा नारा दिला होता. बाबू हरदास हे त्यावेळी लोकसभा खासदार होते आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या कट्टर अनुयायांपैकी एक होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बाबू हरदास यांनीच ‘जय भीम’ हा नारा महाड येथील ‘चवदार तळे’ सत्याग्रहानंतर तयार केल्याची माहिती रामचंद्र क्षीरसागर यांच्या ‘दलित मूव्हमेंट इन इंडिया अँड इट्स लिडर्स’ या पुस्तकात देण्यात आली आहे.

 

jai bhim 1 im

 

समाजातील सर्व जातीतील लोकांना समान वागणूक मिळावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ‘समता सैनिक दल’ स्थापन केला होता. बाबू हरदास हे या संघटनेचं ‘सचिव’ म्हणून काम बघायचे.

नागपूर शहरातून या संघटनेत सर्वाधिक कार्यकर्ते होते. संघटनेच्या एका कार्यक्रमात संबोधतांना बाबू हरदास यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ही सूचना केली होती की, “आजपासून कोणीही एकमेकांना भेटल्यावर नमस्कार, राम राम किंवा जोहार मायबाप असे शब्द वापरायचे नाहीत. समाजात जर आपलं स्थान कमवायचं असेल तर आपल्यापैकी प्रत्येकाने एकमेकांना भेटल्यावर ‘जय भीम’ असं म्हंटलंच पाहिजे.”

समता सैनिक दलाचे कार्यकर्ते असलेले व्ही. एस. पवार यांनी एका मुलाखतीत असं सांगितलं की, ” ३० डिसेंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील मकरंदपूर गावात झालेल्या एका सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील उपस्थित होते. या सभेत सर्वप्रथम त्यांच्या समक्ष ‘जय भीम’चा नारा देण्यात आला होता.

३० डिसेंबर हा दिवस आजही कन्नडच्या मकरंदपूर येथे ‘जय भीम’ दिवस म्हणून साजरा केला जातो.

बाबू हरदास कोण होते?

‘जय भीम प्रवर्तक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बाबू हरदास’ यांचा जन्म ६ जानेवारी १९०४ रोजी नागपूर येथे झाला होता. नागपूरच्या पटवर्धन माध्यमिक शाळेतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर वयाच्या १६ व्या वर्षी १९२० मध्ये त्यांनी आपल्या सामाजिक कार्यास सुरुवात केली.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी नागपूरच्या ‘कामठी’ भागात १९२४ मध्ये ‘संत चोखामेळा वसतिगृह’ स्थापन केलं होतं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नागपूरमध्ये आल्यावर राहण्याची आणि इंग्रजी शिकण्याची सोय व्हावी या उद्देशाने हे वसतिगृह सुरू करण्यात आलं होतं.

 

babasaheb im

 

१९२५ मध्ये त्यांनी विदर्भातील दलित आणि आदिवासी जमातीतील बिडी कामगारांना एकत्र आणून त्यांनी त्यांच्या हक्काचे पैसे मिळावेत यासाठी ‘युनियन’ तयार करून आंदोलन केलं होतं. १९३० मध्ये त्यांनी ‘मध्यप्रदेश मजदूर संघ’ची स्थापना केली होती. १९३२ मध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा नागपूरच्या कामठी भागात आले होते तेव्हा त्यांचं स्वागत बाबू हरदास यांनीच केलं होतं.

१९३७ मध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘इंडिपेंडेंट लेबर पार्टी’ मधून लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि त्यामध्ये ते मोठ्या फरकाने जिंकले होते. पण, १९३९ मध्ये वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी त्यांना ‘ट्युबरक्यूलॉसिस’ हा आजार झाला आणि त्यातच त्यांचं निधन झालं.

“बाबू हरदास यांच्या जाण्याने माझा उजवा हात गेला” अशी प्रतिक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केली होती. सुबोध नागदेवे यांची निर्मिती असलेला ‘बोले इंडिया जय भीम’ हा मराठी चित्रपट बाबू हरदास यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे.

 

movie poster im

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ नाव भीमराव असल्याने ‘जय भीम’ हा नारा त्वरित लोकप्रिय झाल्याचं वरिष्ठ पत्रकार, लेखक उत्तम कांबळे यांनी म्हटलं आहे. ‘जय भीम’ हे शब्द सर्व कार्यकर्त्यांना उत्साह देणारा आणि त्यांना परिस्थिती बदलण्याचा आशावाद निर्माण करणारा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हे वाक्य आपल्या भाषणात वापरले होते. ‘जय भीम’ या सर्व विचारांचा सारांश आहे असं उत्तम कांबळे यांचं मत आहे.

‘जय भीम’ हा नारा आज राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये सुद्धा ऐकायला येतो. ‘गिनी माही’ या पंजाबी गायिकेने तयार केलेलं आणि गायलेलं हिंदी गाणं ‘जय भीम , बोलो जय भीम’ हे त्याची लोकमान्यतेची साक्ष देणारं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?