' नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग महाराष्ट्रासाठी एक महत्त्वकांक्षी प्रकल्प का आहे, जाणून घ्या! – InMarathi

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग महाराष्ट्रासाठी एक महत्त्वकांक्षी प्रकल्प का आहे, जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प मुंबई – नागपुर ” समृद्धी महामार्ग ” हा मराठवाडा-विदर्भाच्या विकासाला आणि वाहतुक, दळणवळण, उद्योग, व्यापार यांना चालना देणारा तसेच असंख्य प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारा प्रकल्प म्हणून अलीकडे खुपच चर्चिला जात आहे.

samruddhi-mahamarg-marathipizza01
mahasamruddhimahamarg.com

सध्या स्थितीत मुंबई ते नागपूर अंतर कापवयास जवळपास १४ तास लागतात. जवळपास ८१२ किमी अंतर पडते. जर समृद्धी महामार्ग झाल्यास अंतर ७०० किमी होईल व फक्त ८ तासात मुंबई ते नागपूर अंतर कापणे शक्य होईल. तसेच औरंगाबादहुन दोन्ही ठिकाणी जाण्यास केवळ ४ तास लागणार. हा महामार्ग आंतरराष्ट्रीय मानकांनूसार उभारण्यात येईल हे विशेष! यासाठी देखरेख एजन्सी म्हणून एम.एस.आर.डि.सी काम पाहणार आहे.

मुंबई येथिल भारताचे सर्वात व्यस्त बंदर जवाहरलाल नेहरु बंदर ते नागपुर स्थित मिहान (multi model international cargo hub and airport nagpur ) यांना  देखील जोडणारा हा महामार्ग आहे. बंदरातून जलद वाहतूक करुन आवश्यक माल भारतभर वेळेवर  पोहचवणे शक्य होणार आहे. त्याच बरोबर प्रवासी वाहतूकीला वेल बचतीचा फायदा होणार आहे.

समृद्धी महामार्ग नागपुर ते मुंबई दरम्यान १२ जिल्ह्यातून जाणार आहे. हे जिल्हे पुढिल प्रमाणे – नागपुर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे व मुंबई! तसेच पाच महसुल विभाग येतात. अप्रत्यक्षपणे काही जिल्हे चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, बिड, धुळे, जळगाव, पालघर व रायगड यांनाही जलद वाहतूकीचा फायदा होणार आहे. जवळपास २६ तालुके व ३९२ गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे.

samruddhi-mahamarg-marathipizza02
esakal.com

औरंगाबाद येथिल प्रस्तावित डि.एम.आय.सी प्रकल्प, कार्गो एअर पोर्ट, जालना येथे प्रस्तावित ड्रायपोर्ट यांच्या साठी जड वाहतुक जलद होण्यास मदत होणार आहे. आजच्या घडीला मराठवाडा-विदर्भातुन मुंबईला भाजीपाला, फळे व इतर नाशवंत माल यांसाठी बाजारपेठ उपलब्ध होत नाही, कारण वेळ व अंतर यामुळे पाहिजे त्यावेळेत पोहचणे शक्य होत नाही. पण समृद्धी महामार्गामुळे जलद वाहतुकीच्या मदतीने मुंबईची बाजारपेठ सहज उपलब्ध होणार आहे. ह्या महामार्गाचा सर्वाधिक लाभ विदर्भाला होणार आहे. विदर्भातून ४०० किमी, मराठवाड्यातुन १६० किमी व उर्वरित महाराष्ट्रातून १४० किमी असा समस्त महाराष्ट्राला हा महामार्ग दिशादर्शक ठरणार आहे.

समृद्धी महामार्गामुळे काही राष्ट्रीय महामार्गही जोडले जाणार आहेत. यात NH 3, NH 6, NH 7, NH 69, NH 204, NH 211, NH 50 यांचा समावेश होतो. महामार्गाची एकुण रुंदी १२० मीटर असणार आहे. प्रत्येक बाजूस चार-चार अश्या आठ पदरी मार्गिका असणार आहेत. मध्य मार्गिका हि २२.५ मिटर आसणार आहे, जी आंतरराष्ट्रीय मानकांनूसार आहे. प्रस्तावित समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा १५० किमी प्रति तास आहे. जर भविष्यात परत महामार्गात वाढ करावयाची झाल्यास ती तरतूद आताच करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीचे परत अधिग्रहण होणार नाही हे विशेष. महामार्गात हॉटेल्स, मॉल्स, दवाखाने इ. उभारण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्गाच्या दोन्हीही बाजूस सर्विस रोड आसणार आहे. तो अंडर बायपास ने जोडला जाईल. जवळपास ५० पेक्षा जास्त उड्डाणपुल, २४ हून आधिक इंटरचेंजेस वे तसेच ५ बोगदे प्रस्तावित आहे.बोगद्यांमध्ये लाईटिंग, पुलांचे सौदर्यिकरण, डिजीटल माहिती फलक इ.प्रस्तावित आहेत. महामार्गाच्या कामासाठी स्थानिक सामान वापरणार असे ऐकिवात आहे. संपुर्ण महामार्गात सिसिटिव्ही कॅमेरा, मोफत फोन केंद्र, मोफत वायफाय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या महामार्गात ४०० वाहनांसाठी व ३०० पादचाऱ्यांसाठी विशेष जागा देण्यात आली आहे. यामुळे महामार्गाला जोडताना स्थानिक वाहतूक सुरळीत व सुरक्षित असणार आहे. तसेच अपघातांचे प्रमाणही कमी होईल, कारण झिरो अॅक्सिडेंटल कॉरिडोर असणारा हा  देशातील पहिलाच महामार्ग ठरणार असे म्हटले जात आहे. हा महामार्ग खाजगी भागिदारीतून होणार असल्यामुळे टोलही पडणार आहे. टोल हा प्रवास केलेल्या अंतरावरच पडणार व तो स्वयंचलित असणार आहे. या महामार्गाचा वापर गॅस पाईप लाईन, इलेक्ट्रिक लाइन वा आप्टिकल फायबर केबलसाठी करण्याचा मानस आहे. युद्धजन्य परिस्थितीत अथवा नैसर्गिक आपत्ति दरम्यान महामार्गावर विमान उतरु शकेल असा रन वे असणार आहे.

samruddhi-mahamarg-marathipizza03
maharashtratoday.in

ग्रिन फिल्ड कॉरिडोर हे एक वैशिष्ट्य या समृद्धी महामार्गाचे असणार आहे. या महामार्गा दरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन साधले जाईल. .महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षणीय स्थळे जोडण्यास हा महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. या महामार्गाचे प्रमुख मध्यवर्ती स्थानक औरंगाबाद असणार आहे. डि.एम.आय.सी मुळे औरंगाबादचे औद्योगीक महत्व वाढत आहे, त्यासाठी जलद दळणवळण आवश्यक आहे. म्हणुन समृद्धी महामार्ग “बूस्ट “देणारा ठरणार यात शंका नाही.

नविन आधुनिक शहरे या महामार्गावर वसवली जाणार आहेत. यांत वीस कृषी समृद्धी केंद्र उभारण्याचे ठरले आहे. या केंदांमुळे शेतकरी – ग्राहक जोडले जातील. जेणेकरून कृषी आधारित अर्थव्यवस्था मजबुत होईल. जालना येथे इंडस्ट्रिअल हब, करमाडला लॉजिस्टिक हब, सावंगी येथे निवासी संकुले, दौलताबाद येथे टुरिझम हब व लासुर येथे आयटी हब उभारण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्ग हा रोजगार निर्मितीचे महत्वाचे काम करणार आहे. तब्बल २५ लाख रोजगाराची संधी उपलब्ध होईल असा दावा आहे.
या प्रकल्पासाठी तब्बल ५० हजार करोड रुपयांचा खर्च येणार आहे. व त्यासाठी पन्नास हजार एकर जमिन लागणार आहे. त्यासाठी २०,४८९ खाते धारकांच्या जमिनीचा भाग हा महामार्गासाठी संपादित केला जाणार आहे. जे शेतकरी भूमिहीन होणार त्यांना पर्यायी जमिन देण्याचे सरकार आश्वासन देत आहे.

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अमरावती पॅटर्नप्रमाणे मोबदला दिला जाणार आहे. लोड पुलिंग व रेडिरेकनरच्या पाच पट भाव देवून सरकार जमिन अधिग्रहण करणार आहे. जोड रस्ते व स्थापन होणाऱ्या वसाहतींसाठी स्वेच्छेने, विनासंघर्ष जमिन घेण्याचे सरकारचे प्रयत्न आहे. कुटुंबातील एका व्यक्तिस मोफत व्यवसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संपादित जमिन पुर्नविक्रीचाही पर्याय देण्यात येत आहे.

एवढे नक्की आहे की मुंबईला जोडणारी कनेक्टिवीटी मराठवाडा-विदर्भासाठी मैलाचा दगड ठरु शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?