' वेळीच सावरलं नाही, तर आपल्या शेजारील आणखीन एका राष्ट्रावर ओढवेल आपत्ती – InMarathi

वेळीच सावरलं नाही, तर आपल्या शेजारील आणखीन एका राष्ट्रावर ओढवेल आपत्ती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोविडने केवळ माणसांचेच जीव घेतले नाहीत तर सर्वार्थानेच जग हलवून सोडलं. सगळ्याच देशांना कोविडचे विपरीत परिणाम भोगावे लागले. काही देश यातून तरुन वर येत असले तरी चोख व्यवस्थापनाच्या अभावामुळे काही देशांचं मात्र या सगळ्यात कमालीचं नुकसान झालंय. भारतीयांना त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब ही की इतर देशांच्या मानाने भारत देशाची बऱ्यापैकी नुकसानभरपाई झालीये.

कुठलाही देश कठीण काळात कशाप्रकारे सामना करतो त्यावरून त्याची एकूण ताकद लक्षात येते. देशाचं नेतृत्त्व दुरदर्शी असणं यासाठी अत्यावश्यक असतं. भारताच्या शेजारील राष्ट्रांची सध्याची एकूण परिस्थिती मात्र बिकट झाली आहे. श्रीलंकेची सध्याची अत्यंत डबघाईला गेलेली आर्थिक स्थिती पाहून सगळीच राष्ट्रं खडबडून जागी झाली आहेत.

 

sri lanka im 4

 

श्रीलंकेतल्या महागाईला सीमाच राहिलेली नाही. स्वातंत्र्य मिळालं त्या काळापासूनच पॉवर ब्लॅकआउट्स आणि अन्न, इंधन आणि औषधोत्पादनांच्या तीव्र चणचणीमुळे श्रीलंका अतिशय बिकट आर्थिक परिस्थितीशी झुंजत आलेली आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थितीदेखील बरी नाही. अशात आता श्रीलंकेपाठोपाठ नेपाळमध्येदेखील अस्थिरता निर्माण झाली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तिथे नेमकी काय परिस्थिती आहे आणि डबघाईला आलेली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी तिथल्या सरकारने कुठले प्रयत्न सुरू केले आहेत याचा थोडक्यात आढावा घेऊ.

श्रीलंकेची अर्थव्यवस्था नेपाळच्या अर्थव्यवस्थेच्या दुप्पट असली तरी ही दोन्ही राष्ट्रं अभूतपूर्व अशा आर्थिक संकटातून जात आहेत. पँडेमिकमुळे श्रीलंकेप्रमाणेच नेपाळच्या पर्यटन क्षेत्रावर वाईट परिणाम झाला. या क्षेत्रातल्या नुकसानभरपाईची चिन्ह दोन्ही देशात दिसू लागली मात्र रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे पुन्हा एकदा दोन्ही देशातली आर्थिक समीकरणं विस्कळीत झाली.

 

russia im

 

CPN-UML या नेपाळच्या मुख्य विरोधी पक्षाने असा दावा केलाय की, येत्या काही दिवसांत जर काही ठोस उपाय केले गेले नाहीत तर नेपाळच्या अर्थव्यवस्थेची अवस्था आणखीनच वाईट होऊ शकते.

बिष्णू पौडेल, सुरेंद्र पांडे आणि नेपाळचे माजी वित्तमंत्री डॉ. युबराज खाटीवाडा या ‘युनिफाईड मार्कझिस्ट-लेनिनीस्ट’ या नेपाळमधल्या कम्युनिस्ट पार्टीच्या ३ नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत रविवारी म्हटलं की, देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे सकारात्मक हस्तक्षेप करून ती पुन्हा योग्य मार्गावर आणणं गरजेचं आहे.

याशिवाय, पीटीआयच्या वृत्तानुसार, CPN-UML या पार्टीचे व्हाईस-चेअरमन असलेल्या पौडेल यांनी अर्थशास्त्रज्ञ, पत्रकार आणि बाकी संबंधित अधिकाऱ्यांनी आर्थिक संकटापासून देशाला वाचवण्यासाठी सरकारवर दबाव आणावा असं म्हटलंय.

राजकीय संकटानंतर नेपाळमधलं केपी शर्मा ओली सरकार पडलं आणि त्यानंतर काही काळातच वाढत्या आयातीमुळे, वित्तप्रेषणाच्या ओघात आणि पर्यटन आणि निर्यातीतून मिळणाऱ्या कमाईत घट झाल्यामुळे जुलै २०२१ पासून नेपाळच्या परकीय चलन साठ्यात घट दिसू लागली.

 

nepal living goddess inmarathi
bbc.com

जुलै पासूनच तिथलं नवं आर्थिक वर्ष सुरू होतं. केंद्रीय बँकेच्या आकड्यानुसार, जुलै २०२१च्या मध्याच्या तुलनेत फेब्रुवारीच्या मध्यात नेपाळचा एकूण परकीय चलन साठा १७ टक्क्यांनी घटून ९.७५ बिलियन USD वर आला.

रविवारी नेपाळच्या केंद्रीय बँकेचे गव्हर्नर असलेल्या महा प्रसाद अधिकारी यांना वित्तमंत्री जनार्धन शर्मा यांच्याशी झालेल्या कथित मतभेदामुळे आणि देशाला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी पुरेसे प्रयत्न न केल्यामुळे काढून टाकण्यात आलेलं आहे.

महाप्रसाद अधिकारी यांनी नेपाळ श्रीलंकेच्याच मार्गावर असल्याचा इशारा दिला आहे. मात्र नेपाळचे वित्तमंत्री जनार्धन शर्मा यांनी हा इशारा फेटाळून लावला असून देशाची अर्थव्यवस्था श्रीलंकेसारखी होणार नाही असं आश्वासन दिलं आहे.

नेपाळ श्रीलंकेसारखा कर्जाच्या ओझ्याने दबून गेलेला नाही असं त्यांनी म्हटलंय. याखेरीज नेपाळच्या अर्थव्यवस्थेतली उत्पादन आणि महसूल प्रणालीची स्थिती श्रीलंकेपेक्षा खूपच चांगली आहे हेही त्यांनी सांगितलं.

 

nepal im 2

 

एकूणच गंभीर परिस्थिती बघून नेपाळच्या केंद्रीय बँकेने केंद्रीय वित्त मंत्रालयाला पत्रं लिहून त्यात पेट्रोलियम उत्पादनाची आयात नियंत्रित करा असं म्हटलंय. पेट्रोलियमच्या आयातीसाठी नेपाळ सरकार भारताला दर महिन्याला २४-२९ अरब रुपये इतकी रक्कम देतं. नेपाळच्या केंद्रीय बँकेने याचबरोबरीने लोकांना अकारण कर्ज देऊ नये असा आदेश बँकांना दिला आहे.

२७ व्यावसायिक बँकांच्या बैठकीत एनआरबीने विशेषतः वाहनासाठी आणि गरज नसताना लोकांना कर्ज देऊ नका असं सांगितलंय. बुडती अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी नेपाळच्या केंद्रीय बँकेने हा निर्णय घेतला असण्याचं समजतंय.

काठमांडूच्या ‘माय रिपब्लिका’ या वृत्तपत्राने ७ एप्रिलला एनआरबीचे प्रवक्ते गुनाकर भट्टा यांच्याशी साधलेल्या संवादावरून जे वृत्त प्रकाशित केलं गेलंय त्यानुसार परकीय चलन साठ्यात होणारी घट थांबवण्यासाठी नेपाळ सरकारने चैनीच्या वस्तूंच्या आयातीवर, वाहनांच्या आयातीवर कायदेशीर बंदी घातली आहे.

 

bhutto im

 

परकीय चलन साठ्यात सातत्याने घट होत असल्यामुळे हे करून आम्ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत असं भट्टा यांनी म्हटलंय. परकीय चलन साठ्याचं व्यवस्थापन करणं हे सध्याच्या घडीला नेपाळ सरकारसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी काही वस्तूंची आयात थांबवली असल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र, भट्टा यांच्या म्हणण्यानुसार आर्थिक संकटामुळे ही पावलं उचलली गेली नाहीयेत.

अर्थव्यवस्थेच्या बाबतीत खूप अफवा पसरवल्या गेल्या आहेत. लोकांनी त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही असंही त्यांनी म्हटलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून अर्थव्यवस्थेचं चित्र सकारात्मक दिसतंय.

नेपाळ सरकारने यंत्रसामग्री आणि सुटे भाग, मोपेड आणि आवश्यक मोटार उपकरणं, सायकल, डिझेल वाहनं, तांदूळ, कापड उत्पादन, विजेची उपकरणं, सोनं, चांदी, धागे, रेडिमेड कपडे यांच्या आयातीवर बंदी घातली आहे. त्याचबरोबरीने, खेळणी, खेळाशी निगडित सामान आणि वस्तू, चांदी आणि चांदीची नक्षीदार सामग्री, सीमेंट, जार, फर्निचर आणि त्यासंबंधित वस्तू,

खड्याच्या सजावटीची सामग्री यांच्यावर पतपत्र जारी न केल्यामुळे पुढच्या आदेशापर्यंत या वस्तूंच्या आयातीवर बंदी राहील. आणखीनही बऱ्याच गोष्टींच्या आयातीवर बंदी असणार आहे. नेपाळ बऱ्याच गोष्टी भारताकडूनच आयात करतो.

 

rice crop inmarathi1

चीनशी वाढती जवळीक नडली आणि पाकिस्तान श्रीलंकेत अस्थिरता निर्माण झाली

भारतातील या ११ ठिकाणी फिरायला जाण्यासाठी लागते सरकारची परवानगी..!

या सगळ्या परिस्थितीविषयी केवळ माहिती मिळवू शकणारे आपण नेपाळच्या राष्ट्रीय बँकेच्या प्रवक्त्यांनी जनतेला दिलेलं आश्वासन खरं ठरो इतकंच म्हणू शकतो. असं असलं तरी या सगळ्या परिस्थितीत नाहकच भरडल्या जाणाऱ्या श्रीलंकेच्या आणि नेपाळच्या सामान्य नागरिकांना कशाकशाला तोंड द्यावं लागतंय याची कल्पना आपल्याला येणं शक्यच नाही. तूर्तास, आपल्यावर इतकी कठीण वेळ आलेली नाही म्हणून देवाचे आणि देशाचे आभार मानू!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?