' ‘जय भीम’ चित्रपटाबाबत घडलीये अभिमानास्पद गोष्ट, सिनेमाप्रेमींना तर माहिती हवीच – InMarathi

‘जय भीम’ चित्रपटाबाबत घडलीये अभिमानास्पद गोष्ट, सिनेमाप्रेमींना तर माहिती हवीच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अनेक महत्त्वाचे आणि गंभीर विषय या कोरोना काळात मोठ्या पडद्यावर आणता आले नाहीत ते ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित झालेल्या सिरीज आणि सिनेमांमधून हाताळले गेले. जितक्या आवडीने आपण हलकेफुलके सिनेमे पाहतो तितक्याच आवडीने अनेक गंभीर आशयाचे सिनेमेही पाहतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सामाजिक समस्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं चित्रपट हे एक प्रभावी माध्यम आहे. आपल्याला ज्ञात- अज्ञात असलेल्या अनेक सामाजिक समस्या चित्रपटाच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतात.

आतापर्यंत अनेक भारतीय चित्रपटांमधून वेगवेगळ्या गंभीर सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली गेली आहे. वेळोवेळी असे चित्रपट रसिकांच्या आणि समीक्षकांच्या कौतुकाला पात्र ठरलेत. मात्र आजवर कुठल्याही भारतीय चित्रपटाला ऑस्करच्या विशेष सन्मानाचं स्थान मिळालेलं नव्हतं.

गेले ३ महिने अमेझॉन प्राईमवर गाजणाऱ्या आणि सातत्याने चर्चेत असलेल्या ‘जय भीम’ या तामिळ चित्रपटातल्या एका महत्त्वाच्या प्रसंगाची थेट ऑस्करच्या ऑफिशियल युट्युब चॅनेलवर वर्णी लागलीये.

 

jai bhim 3 inmarathi

 

आजही जातीयवाद समाजात मूळ धरून आहे. ‘जय भीम’ हा चित्रपट एक हार्ड हीटिंग कोर्टरूम ड्रामा आहे. भारतातले एक नामांकित वकील आणि मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के चंद्रू यांनी १९९३ साली तामिळ नाडू मधील एका जमातीतल्या एका व्यक्तीच्या झालेल्या शोषणाविरुद्ध न्यायालयात लढा जो दिला होता त्यावर हा चित्रपट बेतलेला आहे.

साऊथ इंडियन सुपरस्टार सुरिया याने या चित्रपटात के. चंद्रू यांची भूमिका साकारली आहे आणि या चित्रपटाची निर्मितीही केली आहे. दिग्दर्शक टीजे ग्नानावेल यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय. के. चंद्रू यांनी पीडित लोकांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी एक पैदेखील न घेता आपलं आयुष्य वेचलं.

१९९३ साली जी घटना घडली होती त्यात तामिळनाडू मधल्या एका जमातीतल्या राजाकन्नू नावाच्या माणसाला चोरी न करतादेखील चोरीच्या गुन्ह्याअंतर्गत अटक झाली होती. कस्टडीत असताना त्याचं इतकं शोषण झालं की त्यापायी त्याला त्याचे प्राण गमवावे लागले. त्याची पत्नी सेंगनी के चंद्रू यांच्याकडे मदत मागायला आली.

 

jai bhim 2 inmarathi

 

हा कायदेशीर लढा के. चंद्रू यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि आव्हानात्मक होता. के चंद्रू यांनी त्यावेळी या जमातीवर झालेल्या अन्यायाविरोधात रॅलीही काढली होती. ऑस्करच्या ऑफिशियल युट्युब चॅनेलवर या चित्रपटासंदर्भात जो १२ मिनिटांचा व्हिडियो प्रसिद्ध केला गेलाय त्यात चित्रपटातला एक महत्त्वाचा प्रसंग दाखवला गेला आहे.

याशिवाय, चित्रपटाचे दिग्दर्शक ग्नानावेल हे चित्रपटाचं कथानक सांगताना आणि चित्रपट कसा घडला याची अभ्यासपूर्ण पद्धतीने माहिती देताना दिसत आहेत.

या व्हिडियोत चित्रपटातला जो प्रसंग दाखवलाय त्या प्रसंगात काही लोकांना तुरुंगातून सोडलंय आणि त्यांचे कुटुंबीय त्यांना न्यायला आलेत असं दाखवलंय, पण सगळ्या जाचातून ते मोकळे होतात न् होतात तोच त्यांना त्यांची जात विचारली जाते. जे खालच्या जातीतले असतात त्यांना अजून बाकी असलेल्या काही केसेसअंतर्गत ताब्यात घेतलं जातं आणि अधिकारी त्यांना घेऊन जातात. हा प्रसंग मन हेलावून टाकतो

‘अमेझॉन प्राईम’वर हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर चाहत्यांनी जितका हा चित्रपट डोक्यावर घेतला तितकीच समीक्षकांची वाहवाही या चित्रपटाला मिळाली. IMDb वर त्याला १० पैकी ९.३ इतकं रेटिंग मिळालं. या प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाला ‘हाय्येस्ट युजर रेटिंग’ मिळालेलं असून “शॉशांक रेडेम्पशन’ आणि ‘फाईट क्लब’च्याही वरचा क्रमांक या चित्रपटाने पटकावला आहे.

 

jai bhim inmarathi

 

ऑस्करच्या युट्युब चॅनेलवरच्या व्हिडियोमधून दिसलेली चित्रपटाची झलक पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. हा व्हिडियो पाहून “‘जय भीम’ हा चित्रपट सगळीकडे पोहोचतोय. काय छान बातमी आहे ही!”, असं ट्विट एका व्यक्तीने केलंय. तर “सुरिया हा भारतीय सिनेसृष्टीचा अभिमान आहे.”, असं कुणीतरी लिहिलंय.

या चित्रपटाला ‘बेस्ट नॉन इंग्लिश लँग्वेज फिल्म’ या श्रेणीअंतर्गत या महिन्याच्या सुरुवातीला ‘गोल्डन ग्लोब’ चं २०२२ सालचं नामांकनही मिळालं आहे.

आपण या भूमिकेची निवड का केली आणि या चित्रपटाची निर्मिती का केली यासंदर्भात सुरियाने यापूर्वी एक ट्विट केलं होतं. न्याय मिळवण्यासाठी दाखवलेल्या धैर्याची आणि दृढ विश्वासाची कथा फार अभिमानाने आपण लोकांसमोर आणली आहे असं मत त्याने या ट्विटमधून व्यक्त केलं होतं.

सुरियाने दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला, “चित्रपटांमधून आपण वीरतेची कायम एक वेगळीच व्याख्या बघत आलोय. न्यायाधीश चंद्रू यांचं एक पुस्तक वाचल्यानंतर सामान्य माणसंही कशी हिरो ठरू शकतात, तीदेखील लोकांच्या प्रश्नांसाठी कसा समर्थपणे लढा देऊ शकतात हे माझ्या लक्षात आलं.”

केवळ एक सिनेमा म्हणूनच नाही पण समाजतल्या पीडितांसाठी, तळागाळातल्यांसाठी मोठं कार्य केलेल्या भारतीयांची कहाणी सातासमुद्रापार पोहोचणे ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचीच गोष्ट आहे, पण थेट ऑस्करने आपल्या सिनेमाची दाखल घेणं ही बाब आपली मान अधिकच उंचावते.

खुद्द बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवांपासून के.चंद्रू यांच्यासारख्या अनेकांनी आजवर जातीयवादाविरोधात लढा देऊनही समाजातून जातीयवाद अजूनही समूळ नष्ट झालेला नाही याची निश्चितच खंत वाटते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?