' या मोठ्या सणाला काळी वस्त्र का? लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले… – InMarathi

या मोठ्या सणाला काळी वस्त्र का? लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज संक्रांत. घराघरात तिळगुळ देत गोड बोलण्याचा उत्सव साजरा होत असताना त्याच सणाला काळी वस्त्र परिधान करण्यामागील कारण आजही अनेकांना ठाऊक नाही. काळा सण, किंवा एखाद्यावर संक्रात आली अशी म्हणही मराठीत रुजली आहे. एकंदरित या सणाची दुसरी बाजू मांडणारी एक पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. अनामिक लेखकाची ही पोस्ट या निमित्ताने इनमराठीच्या वाचकांसाठी पुनःप्रकाशित करत आहोत.

लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही… याच कारणाने तिळगुळ आजही गोड लागत नाही, याच कारणाने आमच्या आयाबहिणी संक्रांती सारख्या मोठ्या सणाला काळी वस्त्र परीधान करतात. भारतीय इतिहासात अजरामर असलेल्या पानिपतच्या रणसंग्रामाला आज तब्बल २६१ वर्षे पूर्ण झालीत. अहमदशाह अब्दालीच्या प्रचंड फौजेशी मा्वळे प्राणपणाने लढले. स्वराज्य आणि स्वधर्माच्या रक्षणार्थ हजारो मराठा वीर योध्दे या निकराच्या लढाईत कामी आले.

 

panipat im

 

१४ जानेवारी १७६१ हा दिवस कदापि विसरणे शक्य नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

पानिपत… दीड लाख मराठी माणसाच्या तीन पिढ्या एका दिवशी एकाच ठिकाणी खच्ची पडल्या. उभा मराठा कापला गेला. लौकिकार्थाने काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद झाली. ‘पानिपत होणे’ हा वाक्प्रचारही रुजला.

युद्ध म्हटले कि त्याची परिणती विजय किंवा पराभव. पानिपत हा मराठ्यांचा सर्वात मोठा पराभव होता का? मराठ्यांचे सैन्य उभे कापले गेले, म्हणून गारद्यांचा विजय आणि मराठ्यांचा पराभव झाला का? या युद्धानंतर काय झाले? खैबरखिंडीतून झालेले ते शेवटचे आक्रमण. तीन पिढ्या मराठ्यांच्या गेल्या, पण कणा मोडला तो गनिमांचा! शतकानुशतकांची परंपरा एका तडाख्यात थांबली. अब्दालीचे कंबरडे मोडले आणि नशिबही. घरी जाऊन तो मेला. पुन्हा अल्लाह हु अकबरच्या आरोळ्या खिंडीपलीकडून आल्या नाहीत. अर्यावार्ताला पुन्हा त्या सुलतानी आक्रमणाला तोंड द्यावे लागले नाही. हेच तर साधायचे होते या युद्धातून! साधले ही, पराभव कुठे झाला?

 

 

Panipat-inmarathi

 

पानिपत ही मराठ्यांनी देशासाठी दिलेली सवोत्तम आहुती होती. आहुती म्हणजे देशप्रेम! पुन्हा मराठ्यांकडे कोणी देशप्रेमाचे दाखले मागू नयेत. मराठे एकाकी लढले. ‘बचेंगे तो औरभी लढेंगे’ म्हणणारे दत्ताजीचे मराठे भुकेल्या पोटी आणि तहानलेल्या ओठी एकाकी लढले. राजपूत, जाट कोणी-कोणी म्हणून कोणी आले नाही! एकवेळ अब्दाली चालेल पण मरहटे नकोत.

एक होऊन लढले नाहीत सगळे, मराठा एकाकी पडला, पण अडला, नडलाआणि थेट भिडला. पानिपत म्हणजे जाज्वल्य अभिमान! ज्यांच्या मातीत देशप्रेम उगवते म्हणतात त्या पंजाब सिंधच्या मातीत सर्वोच्च देशप्रेमाचा कधीच न मिटणारा ठसा महाराष्ट्राने उमटवलाय, त्याचे नाव पानिपत !

 

panipat war im

 

मराठा का एकाकी पडला? आपल्याविषयी विश्वास निर्माण करायला का कमी पडला? का परक्यांपेक्षा तो आपल्यांना अधिक परका वाटला? आज या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे. महाराष्ट्राला या देशाचे नेतृत्व करायचे असेल, तर अवघ्या देशाचा विश्वास आपण मिळवला पाहिजे. सर्व देशात आदराचे स्थान मिळवले पाहिजे. पानिपत म्हणजे दुसऱ्यांवर विजय, आणि आपल्याकडून पराभव! आपल्याच लोकांमध्ये बेबनाव, आपल्या लोकांमध्ये अविश्वास आणि त्याचा बसलेला खूप मोठा फटका! याअर्थी पानिपत एक शिकवण…

आणि एक गोष्ट तुम्ही नोंद केली असेल, यास लढाई म्हणत नाही, हे युद्ध! महाभारतासारखेच महत्वाचे, मराठ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची गाथा, आपला अभिमान आपले देशप्रेम आपला त्याग, ज्यावर प्रत्येक मराठ्याला गर्व वाटावा, आपण न थकता तो सांगावा, देशाला, जगाला! एक पर्व संपले, आक्रमणाचे, नाचक्कीचे, बलात्कारांचे… इतिहास अभ्यासकांच्या भाषेत, मध्ययुग संपले आणि आधुनिक इतिहासास प्रारंभ झाला, तो दिवस… १४ जानेवारी १७६१! पानिपत!

चला त्या मर्द मराठ्यांच्या हौतात्म्यासमोर नतमस्तक होऊ या! सार्थ अभिमान आहे आम्हास आमच्या पूर्वजांचा; पानिपत युद्धात हुतात्मा शुरवीरांना शतश: नमन!

(whatsApp वरून साभार!)

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?