' शास्त्रींनी विनंती केली आणि मनोज कुमारने ट्रेनमध्ये या सुपरहीट सिनेमाची कथा लिहिली! – InMarathi

शास्त्रींनी विनंती केली आणि मनोज कुमारने ट्रेनमध्ये या सुपरहीट सिनेमाची कथा लिहिली!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मनोज कुमार म्हणजे हिंदी सिनेविश्वातील एक महत्त्वाचं आणि प्रसिद्ध नाव आहे. मात्र एखादा कलाकार कठीण परिस्थितीच्या माऱ्यातून तावून, सुलाखून निघतो तेव्हाच तो प्रसिद्ध आणि श्रेष्ठही ठरतो याचं उत्तम उदाहरण म्हणूनही मनोज कुमार यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

चित्रपटात ते भारत कुमार म्हणूनच प्रसिद्ध झाले. सिनेविश्वातील त्यांची ओळख भारत कुमार म्हणूनच अधिक होती आणि आजही ती तशीच आहे, असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये.

 

manoj kumar IM

 

चित्रपटाचं दिग्दर्शन, अभिनय आणि लेखन या तिन्ही क्षेत्रात त्यांनी स्वतःची उत्तम छाप पाडली. हे करत असताना, त्यांचे विचार अतिशय स्पष्ट होते.

प्रेक्षकांना चित्रपट बघितल्यानंतर, काहीतरी वेगळा अनुभव मिळाला असं वाटावं, त्यांना विचार करायला भाग पाडेल अशी कलाकृती निर्माण व्हावी यासाठी ते आग्रही असत.

हल्लीच्या काळातील नव्या दमाच्या कलाकारांनी सुद्धा याची काळजी घेतली पाहिजे असं त्यांचं मत आजही आहे. लाल बहादूर शास्त्री यांच्या सांगण्यावरून त्यांनी चक्क एका अप्रतिम चित्रपटाची निर्मिती केली होती. खरं तर शास्त्रींनी दिलेला एक नारा आणि त्यातून सुचलेली चित्रपटाची संकल्पना असा त्या चित्रपटाचा प्रवास आहे.

 

lalbahadur shastri inmarathi3

मनोज आणि भारत या नावामागचं कारण..

आज मनोज कुमार या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या कलाकाराचं खरं नाव हरिकिशन गिरि गोस्वामी असं होतं. दिलीप कुमार यांचे चाहते असणाऱ्या मनोजजींनी त्यांचा ‘शबनम’ हा चित्रपट पाहिला.

या चित्रपटात दिलीपजींनी साकारलेली मनोज ही भूमिका पाहून त्यांनी आपलं नाव मनोज कुमार असं बदलून घेतलं. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी भारत या नावामागचं रहस्य सुद्धा स्पष्ट केलं आहे.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. गावांमध्ये बहुसंख्य लोकसंख्या पाहायला मिळते. शेतकरी हा राजाचा हा देश, म्हणून भारत हे नाव त्यांना स्वीकारावंसं वाटलं आणि त्यांनी त्याच नावाने अभिनय करण्यास सुरुवात केली.

शास्त्रींच्या बोलण्यातून प्रेरणा मिळाली पण…

१९६५ साली भारत-पाकिस्तान युद्ध सुरु होतं. त्यावेळी लाल बहादूर शास्त्रींनी एक नारा दिला. हा नारा अजरामर ठरला. हा नारा म्हणजेच, ‘जय जवान जय किसान’! याच दरम्यान मनोज कुमार आणि शास्त्री यांची भेट झाली होती.

jai jawan jai kisan IM

 

याच एका भेटीतून एका नव्या चित्रपटाची कथा जन्माला आली. खरं तर शास्त्रीजींनी मनोज कुमार यांना म्हंटलं, की या नाऱ्यावर आधारित एखादा चित्रपट निर्माण करणं शक्य आहे. इथेच एक प्रेरणा मिळाली आणि मनोज कुमार यांनी एका नव्या चित्रपटाला जन्म दिला.

परतीच्या प्रवासात असताना त्यांनी सहकाऱ्यांना सांगितलं की त्यांना दोन डायऱ्या आणि ५-६ बॉलपेन्स आणून द्यावीत. या वस्तू हातात आल्या, एकीकडे गाडी तिच्या गंतव्यस्थानाकडे धावत होती, दुसरीकडे मनोज कुमार यांच्या मनात नव्या चित्रपटाची कथा धावत होती, तर तिसरीकडे लेखणीच्या माध्यमातून ती कागदावर उमटत होती.

‘ये धरती एक ऐसी हथेली है, जिस पर किसान हल चलाकर किसान की तकदीर की लकीरें लिखता हैं’ ही पहिली ओळ काही क्षणातच आकाराला आली आणि गाडी मुंबईला पोचेपर्यंत ‘उपकार’ या चित्रपटाची कथा लिहून पूर्ण झाली होती.

 

upkar IM

 

कथा तर पूर्ण झाली, पण चित्रपट पूर्णत्वास जाण्यासाठीचा खरा संघर्षमय प्रवास तर त्यानंतर सुरु झाला. चित्रपटाचं लेखन तर त्यांनी केलंच होतं, मात्र चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांनी करायचा निर्णय घेतला. एवढंच नाही, तर याच चित्रपटात त्यांनी अभिनय सुद्धा करायचं ठरवलं होतं.

याला मात्र अनेकांचा विरोध होता. सगळ्याच गोष्टी त्यांनी करू नयेत अशी चर्चा घडवून आणली गेली. सगळेच राज कपूर नसतात अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली. खुद्द राज कपूर यांनी सुद्धा मंजू कुमार यांच्या निर्णयावर टीका केली होती.

असं असूनही मनोज कुमार यांनी मात्र आपला निर्णय बदलला नाही. ‘उपकार’ हा एकच सिनेमा नव्हे, तर ‘पूरब और पश्चिम’, ‘शोर’, ‘रोटी कपड़ा और मकान’ आणि ‘क्रांति’ असे चित्रपट त्यांनी बनवले. यातही त्यांनी दुहेरी अथवा तिहेरी भूमिका उत्तमप्रकारे आणि यशस्वीरित्या पार पाडल्या.

 

manoj kumar IM 2

राज कपूर यांनी सुद्धा केली प्रशंसा

उपकार हा सिनेमा प्रदर्शित झाला, नुसताच प्रदर्शित झाला नाही, तर सुपरहिट ठरला. या चित्रपटाने ६ फिल्मफेअर आणि ३ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करत आगळी छाप सोडली. यानंतर मात्र मनोज कुमार यांच्यावर होणारी टीका आपोआपच थांबली.

दोन्ही दगडांवर पाय ठेवायचा प्रयत्न त्यांनी करू नये असं म्हणणाऱ्या राज कपूर यांनी स्वतःदेखील या चित्रपटाची आणि मनोज कुमार यांच्या कामाची प्रशंसा केली.

राज कपूर यांचं तर असं म्हणणं होतं, की मनोज कुमार यांच्या या चित्रपटाच्या आधीचा काळ पाहिला, तर राजजिची स्वतःशीच स्पर्ध होती. मात्र मनोज कुमार यांच्या या उत्कृष्ट कलाकृतीनंतर त्यांच्यासाठी एक नवा स्पर्धक निर्माण झाला होता.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht

tps://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?