' कधीकाळी सुनील दत्त यांनादेखील लोक सांगत होते की “पाकिस्तानात जा..”! – InMarathi

कधीकाळी सुनील दत्त यांनादेखील लोक सांगत होते की “पाकिस्तानात जा..”!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक जुन्याजाणत्या अभिनेते व अभिनेत्रींचा जन्म पाकिस्तानात झाला आहे. देव आनंद, दिलीप कुमार, विनोद खन्ना, प्रेम चोपडा, अमरीश पुरी असे अनेक दिग्गज अभिनेते फाळणीच्या आधी भारताचाच भाग असलेल्या पाकिस्तानात जन्मले होते.

ह्यांपैकीच एक म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या नितांतसुंदर अभिनयाने सर्वांच्या मनावर छाप पाडणाऱ्या सुनील दत्त यांचा जन्मदेखील पाकिस्तानातच झाला होता. पाकिस्तानातील खुर्द येथे जन्मलेल्या सुनील दत्त ह्यांनी एकापेक्षा एक असे सुंदर चित्रपट दिले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सिनेविश्वात सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील दत्त यांच्या खऱ्या आयुष्याची कहाणी एखाद्या चित्रपटाची कथा म्हणून शोभेल अशीच आहे. दिवंगत अभिनेते सुनील दत्त हे नाव राजकीय वर्तुळात देखील आदराने घेतले जात असे.

 

sunil dutt inmarathi

 

मदर इंडिया, मेरा साया, पडोसन, खानदान अशा अजरामर चित्रपटांचा महत्वपूर्ण भाग असलेल्या सुनील दत्तनी ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ या चित्रपटापासून आपल्या चित्रपट करियरची सुरुवात केली होती. पण त्यांचा हा चित्रपट काही विशेष चालला नाही.

त्यांच्या ‘मदर इंडिया’ या चित्रपटाला घवघवीत यश मिळाले आणि तेव्हापासून त्यांना चित्रपटसृष्टीत खरी ओळख मिळाली. १९५७ साली प्रदर्शित झालेल्या मदर इंडिया ह्या चित्रपटात सुनील दत्त त्यांच्या पत्नीबरोबर म्हणजेच अभिनेत्री नर्गिस दत्तसोबत झळकले होते.

 

sunil dutt mother India IM

 

या चित्रपटात काम करताना त्यांचे प्रेम जुळले आणि त्यानंतर १९५८ साली त्यांनी लग्न केले.

सुनील दत्त यांचा जन्म ६ जून १९२९ रोजी एका पंजाबी हिंदू मोह्यल ब्राह्मण कुटुंबात नक्का खुर्द, झेलम जिल्हा, पंजाब प्रांतात झाला. हा भाग आज पाकिस्तानात आहे. सुनील दत्त यांचे मूळचे नाव बलराज दत्त असे होते त्यांच्या वडिलांचे नाव दिवान रघुनाथ दत्त आणि आईचे नाव कुलवंतीदेवी दत्त होते.

सुनील दत्त केवळ पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. सुनील दत्त २१ वर्षांचे असताना भारताची फाळणी झाली आणि संपूर्ण देशभर हिंदू-मुस्लिम हिंसाचार भडकला होता. त्यांच्या वडिलांच्या याकुब नावाच्या मुस्लिम मित्राने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला वाचवले.

त्यानंतर त्यांचे कुटुंब भारताच्या पूर्व पंजाबमधील यमुनानगर जिल्ह्यात असलेल्या यमुना नदीच्या काठावरील मंडौली या छोट्या गावात स्थायिक झाले. त्यानंतर ते त्यांच्या आईसमवेत लखनौ, युनायटेड प्रोव्हिन्स येथे गेले आणि पदवीच्या काळात त्यांनी बराच काळ अमीनाबाद बाजार परिसरात व्यतीत केला.

sunil dutt 2 IM

 

त्यानंतर ते मुंबईत आले व त्यांनी चर्चगेट, साउथ बॉम्बे येथील जय हिंद कॉलेज, बॉम्बे विद्यापीठात प्रवेश घेतला आणि शहराच्या BEST परिवहन अभियांत्रिकी विभागात नोकरी स्वीकारली.

१९५४ साली त्यांनी रेडिओमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांचे उर्दू भाषेवर प्रभुत्व होते त्यामुळे ते दक्षिण आशियातील सर्वात जुने रेडिओ स्टेशन रेडिओ सिलोनच्या हिंदी सेवेवर प्रचंड लोकप्रिय होते. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली.

हिंदी चित्रपटसृष्टीत एक मोठा काळ गाजवल्यानंतर स्वातंत्र्याच्या ५० वर्षांनंतर ते त्यांच्या मूळ गावी गेले. तिथे लोकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. इतकेच नव्हे तर गावकऱ्यांनी सुनील दत्तला परत न जाता तिथेच स्थायिक होण्यास सांगितले.

 

sunil dutt in pakistan IM

 

हा किस्सा एका मुलाखती दरम्यान सुनील दत्त ह्यांनी सांगितला होता. ते म्हणाले होते की ,”मला नेहमीच वाटायचे की पाकिस्तानचे लोक खूप सभ्य आणि आपली काळजी घेणारे आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जेव्हा मी पाकिस्तानमध्ये माझ्या गावी पोहोचलो तेव्हा सर्व गावकऱ्यांनी मिळून माझे स्वागत केले होते.सुरुवातीला मला वाटले की ते असे करत आहेत कारण मी एक अभिनेता आहे आणि म्हणून ते मला ओळखतात.

पण मी मूळचा तिथलाच आहे हे त्यांना माहित होते म्हणून त्यांनी मला प्रेम दिले. तिथल्या तरुणांनी मला मोठमोठे बॅनर दिले, ज्यावर ‘वेलकम टू खुर्द सुनील दत्त’ असे लिहिले होते. ते क्षण माझ्यासाठी खरोखरच भावनिक होते. ते मला त्याच्यासोबत शेतात घेऊन गेले आणि म्हणाले, ‘ये तेरी जमीनें है बल्ला.’ मी त्याला म्हणालो की ,’नाही! हे सगळे फक्त तुमचेच आहे. तर त्यावर त्यांचं उत्तर होतं, ‘नाही. तू इकडे ये, मी या जमिनी तुला देऊन टाकेन.

तब्बल ५० वर्षानंतर पाकिस्तानात गेल्यावर साहजिकच सुनील दत्त भावुक होणार मात्र त्यांच्या पाकिस्तानबद्दलच्या कौतुकामुळे बरीच टीका सुद्धा सहन करावी लागली होती. आधीच मुस्लिम बायको, मुलगा देशद्रोहाच्या आरोपाखाली होता त्यामुळे अनेकांनी सुनील दत्त यांना  पाकिस्तानात जा असा सल्ला देखील दिला होता.

 

sunil dutt sanjay dutt IM

 

सुनील दत्त यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत जवळपास १०० चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी ७ चित्रपट निर्मित केले आणि ६ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांची राजकीय कारकीर्द देखील चांगलीच यशस्वी होती. ते ५ वेळा खासदार होते. २००४ साली त्यांना क्रीडा आणि युथ अफेअर्स मंत्री करण्यात आले.

नर्गिस दत्त ह्यांच्या निधनानंतर त्यांनी नर्गिस दत्त फाउंडेशनची स्थापना केली.नर्गिस ह्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग होता. त्यामुळेच त्यांना अकाली मृत्यू झाला. त्यानंतर कर्करोग रुग्णांच्या उपचारांसाठी त्यांनी नर्गिस दत्त फाउंडेशनची स्थापना केली.

 

nargis dutt Inmarathi

 

त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना १९९५ साली फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. २५ मे २००५ रोजी वांद्रे, पश्चिम मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

भारत व पाकिस्तान ह्या दोन्ही देशांतील चित्रपटरसिकांचे प्रेम मिळवणाऱ्या सुनील दत्त यांचे जुने चित्रपट आजही त्यांचे चाहते आवडीने बघतात.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?