' एकमेव भारतीय फलंदाज जो संपूर्ण करियरमध्ये शून्यावर कधीच बाद झाला नाही! – InMarathi

एकमेव भारतीय फलंदाज जो संपूर्ण करियरमध्ये शून्यावर कधीच बाद झाला नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नवे नियम, नवीन फॉरमॅट आणि खेळात तांत्रिकदृष्ट्या घडत असलेले इतर बदल, यामुळे क्रिकेट हा हळू हळू फलंदाज धार्जिणा खेळ होत चालला आहे, असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही.

मात्र कुठल्याही सामन्यावर फलंदाज किंवा गोलंदाज यांच्यापैकी कुणीही हुकूमत गाजवत असलं, तरी फलंदाज शून्यावर बाद होणं ही त्याच्यासाठी काहीशी लाजिरवाणी बाबच ठरते.

 

batsman duck IM

 

म्हणजे अगदी उत्कृष्ट गोलंदाजी सुरु असेल आणि कुठल्याही फलंदाजांचा टिकाव लागत नसेल, तरी शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांवर अधिक टीका झालेली पाहायला मिळते. एवढंच कशाला, बऱ्यापैकी फलंदाजी करू शकणारा एखादा गोलदांजसुद्धा शून्यावर बाद झालेला दिसला, तर चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

थोडक्यात काय, तर फलंदाजी करत असताना भोपळाही न फोडता येणं हे कुठल्याही परिस्थितीत, कुणाकरिताही वाईटच! मग असा एखादा फलंदाज असेल, ज्याच्यावर संपूर्ण कारकिर्दीमध्ये एकदाही ही नामुष्की ओढवली नाही, तर मग विचारायलाच नको.

होय, विश्वास बसत नसला तरी असे काही फलंदाज आहेत. या यादीत चक्क एका भारतीय फलंदाजांचा सुद्धा समावेश आहे. या भारतीय खेळाडूचं नाव आहे यशपाल शर्मा.

भारताच्या विश्वचषक विजयाचा हिरो…

कपिल देव यांच्या कप्तानीच्या काळात, १९८३ साली भारताने पहिल्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला. यशपाल शर्मा हेदेखील या संघाचा एक भाग होते. एवढंच नाही, तर भारताच्या विश्वविजयाचा एक हिरो, असंही त्यांना संबोधलं जातं.

 

yashpal sharma IM

पहिले दोन्ही विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्धची ८९ धावांची दमदार खेळी क्रिकेट चाहते आजही विसरलेले नाहीत.

हीच त्यांच्या वनडे कारकिर्दीमधील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी सुद्धा ठरली आहे. याशिवाय उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळलेली ६१ धावांची मॅचविनिंग इनिंग त्यांना विश्वचषकाचा हिरो ठरवते.

हा विक्रमसुद्धा विस्मरणात :

यशपाल शर्मा यांच्या विश्वचषकातील कामगिरीची चर्चा तशी फारवेळा होताना दिसत नाही. तसाच त्यांचा आणखी एक विक्रम कायमच दुर्लक्षित राहतो. हा विक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्दीत शर्मा कधीही शून्यावर बाद झालेले नाहीत.

४२ वनडे सामन्यांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केलं असून, यातील ४० डावांमध्ये त्यांना फलंदाजी करण्याची संधी मिळाली. झिम्बाबवे सारखा कमकुवत संघ असो, किंवा इंग्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिजसारखे बलाढ्य संघ; त्यांनी एकदाही शून्य या धावसंख्येवर बाद होत तंबूचा रस्ता धरला नाही.

इतके सामने खेळूनही अशी कामगिरी करू शकणारे ते भारताचे एकमेव फलंदाज ठरतात.

यशपाल यांच्याविषयी माहित नसलेली आणखी एक गोष्ट :

अभिनेते दिलीप कुमार यांच्यामुळे यशपाल शर्मा यांना भारतीय संघाकडून क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली, हेदेखील फार कमी लोकांना माहित आहे.

 

yashpal dilip kumar IM

 

रणजी सामन्यातील दोन्ही डावात शतक झळकावलेल्या यशपाल शर्मा यांचं नाव तत्कालीन निवडसमिती सदस्य आणि बीसीसीआयचे अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर यांना दिलीप कुमार यांनी सुचवलं आणि शर्मा यांना भारतीय संघात स्थान मिळालं.

शून्यावर बाद न झालेले इतर फलंदाज :

दक्षिण आफ्रिकेचे पीटर क्रिस्टन हेदेखील या यादीत आहेत. ४० वनडे सामने खेळूनही एकदाही शून्यावर बाद होण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली नाही. ४५ वनडे सामने खेळलेले जेक्स रुडॉल्फ यांनी ११७४ धावा जमवल्या. मात्र त्यांनीही शून्यावर बाद न होण्याहची करामत केली आहे.

केप्लर वेसल्स यांनी याहूनही भारी कामगिरी करून दाखवली आहे. १०० हुन अधिक सामने खेळणाऱ्या वेसल्स यांनी एकदाही शून्याची धावसंख्या धावफलकावर लागू दिली नाही. १०९ सामन्यांमध्ये ३३६७ धावा त्यांनी आपल्या नावे केल्या आहेत.

यशपाल शर्मा या भारतीय नावाच्या बरोबरीनेच ही तीन नावं सुद्धा हा अनोखा पराक्रम मोठ्या दिमाखात मिरवतात.

 

yashpal 3 IM

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?