' या भयंकर घटनांमुळे बिहारमधील तरुण म्हणायचे,”ओ स्री कल आना” – InMarathi

या भयंकर घटनांमुळे बिहारमधील तरुण म्हणायचे,”ओ स्री कल आना”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘स्त्री’ हा हिंदी चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. यामध्ये त्या गावातील तरुणांना एका चेटकिणीची/ भुताची भीती असते. ती ‘स्त्री’ गावातील तरुण पुरुषांना आपल्याबरोबर घेऊन जात असे असे दाखवले आहे. म्हणून तिला घालवण्यासाठी प्रत्येक घराच्या बाहेर “ओ स्त्री कल आना” असे लिहिलेले होते.

 

o stree kal ana inmarathi

 

ही तर काल्पनिक कथा होती पण काही वर्षांपूर्वी बिहारमध्येही अश्याच घटना वास्तवात घडत होत्या आणि तिथेही तरुण या घटनांना घाबरून “ओ स्त्री कल आना” म्हणू लागले होते.

फरक इतकाच आहे की इथे एखादी चेटकीण येऊन तरुणांना घेऊन जात नव्हती तर लग्नासाठी तरुणांचे अपहरण होत होते.

शंभूचं काय झालं?

ऑगस्ट २०१९ मध्ये बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात २७ वर्षीय शंभू यादव आपल्या बहिणीला रक्षाबंधनाच्या दिवशी भेटून घरी परतत असताना अचानक एक SUV त्याच्या जवळ आली. काही सेकंदातच काही अज्ञात व्यक्तींनी त्याला एसयूव्हीमध्ये ओढले आणि अज्ञात स्थळी नेले.

 

kidnap inmarathi

 

तो पळून जाऊ नये म्हणून त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती आणि त्याचे हात देखील बांधलेले होते. त्याला रात्रभर अंधाऱ्या खोलीत ठेवले गेले आणि दुसऱ्या दिवशी त्याला एका मंदिरात नेत त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढली तेव्हा त्याला त्याच्या शेजारी वधूच्या अवतारातध्ये बसलेली एक महिला बसलेली दिसली. त्याला काही कळण्याआधी आणि त्याने काही करण्याआधीच, मंदिराच्या पुजाऱ्याने मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि त्याने विरोध करू नये म्हणून दोन ते तीन बंदुकधारी पुरुष त्यांच्या आजूबाजूला पहारा देत होते.

असे सक्तीचे विवाह किंवा पकडुआ विवाह बिहारच्या बेगुसराय, मुंगेर, बांका, खगरिया, मधेपुरा, पूर्णिया, जेहानाबाद, जमुई येथील परंपरेचा भाग आहेत.

 

pakadua shaadi

 

काय आहे पकडुआ विवाह?

बिहारमध्ये मुलीच्या लग्नासाठी भरपूर हुंडा मागण्याची पद्धत होती. काही ठिकाणी ही प्रथा अजूनही सुरु आहे. म्हणून बर्‍याचदा पात्र पदवीधरांचे अपहरण करून त्यांना लग्न करण्यास भाग पाडले जाते जेणेकरून मुलीच्या लग्नासाठी हुंडा देण्याची वेळ येऊ नये.

१९९० च्या दशकाच्या सुरुवातीस बेगुसरायमध्ये अशी जबरदस्तीने लग्ने इतकी सर्रास सुरू होती की २०१० साली या विषयावर ‘अंतरद्वंद्व’ हा चित्रपट बनवण्यात आला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.

 

anatardwand inmarathi

 

स्टेट क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार बिहार राज्यात जानेवारी ते नोव्हेंबर २०२० ह्या काळात ७१९४ इतकी जबरदस्तीने झालेल्या विवाहाची प्रकरणे नोंदवली गेली, तर २०१९ मध्ये १०९२५, २०१८ साली १०३१०, २०१७ मध्ये ८९७२ इतके विवाह जबरदस्तीने झाले.

लोक पदवीधर वरांचे अपहरण करण्यासाठी आणि जबरदस्तीने विवाह लावून देण्यासाठी गुन्हेगारांच्या टोळ्यांची मदत घेतात. आणि या टोळ्यांच्या भीतीमुळे बऱ्याचदा अशी प्रकरणे नोंदवलीही जात नाहीत.

पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे होते की या गुन्ह्यात कमी जोखीम आणि जास्त नफा असल्यामुळे गुन्हेगारांच्या टोळ्या अशा व्यवसायात प्रचंड पैसा कमावतात.

हे असे सक्तीचे विवाह समारंभांचे नेहमीच चित्रिकण केलेले असतात जेणे करून वराने लग्न झाल्याचे अमान्य करू नये आणि लग्नाचा पुरावा कायमस्वरूपी राहावा.

 

wedding

 

टोळ्या हे सुनिश्चित करतात की अशी लग्ने पूर्णपणे परंपरेनुसार व्हावी आणि वधूंना त्यांच्या सासरच्या घरी पाठवले जावे. अनेकदा असे जबरदस्तीने झालेले विवाह टिकतातही. वर वधू एकमेकांना स्वीकारतात आणि सुखाने संसार करतात अशीही बरीच उदाहरणे आहेत.

दिवाळीनंतर, तुळशीविवाहानंतर आता लग्नाचा मौसम सुरु झाला आहे. तेव्हा हे असे पकडुआ विवाह सुद्धा सुरु झालेत. म्हणून बिहारमधील जुनीजाणती मंडळी तरुणांना सावध करू लागली आहेत की ”बाबा रे सांभाळून राहा! घराच्या बाहेर पडताना सावध राहा. न जाणो तुमच्यावर कुणाची नजर असली तर दोन दिवसात तुमचे दोनाचे चार हात होतील”.

कारण अनेक प्रकरणांमध्ये, जेव्हा मुले अपहरण झाल्यानंतरही विवाहास तयार नसतात तेव्हा त्यांना मारहाण देखील केली जाते. त्यामुळे लग्नसराईच्या काळात बिहारमधील विद्यार्थ्यांना, नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांना घराबाहेर पडू नका आणि बाहेर पडल्यास काळजी घ्या, असा सल्ला कुटुंबीय देतात.

बिहारच्या काही भागात, लग्नाच्या हंगामात, मॅरेज ब्युरोच्या धर्तीवर पकडुआ लग्नाच्या टोळ्या सक्रिय होतात. या टोळ्यांकडे विवाहयोग्य तरुणांचा संपूर्ण बायोडेटा असतो. तो कुठे काम करतो? किती शिकलाय, किती कमावतो? त्याच्या कुटुंबात किती लोक आहेत? ही सगळी माहिती त्यांच्याकडे असते. त्यानंतर ह्या टोळीतील सदस्य इच्छुक व्यक्तीच्या मुलीचे लग्न लावून देण्यासाठी सौदा करतात. त्यांच्याकडून मोठी रक्कम घेऊन लग्न लावून दिले जाते. लग्न झाल्यानंतर दोघांनीही आयुष्यभर एकत्र राहण्याची त्यांना शपथ दिली जाते.

 

pakadua shaadi 1

 

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एकदा लग्न झाल्यानंतर तरुण-तरुणीही लाजेखातर किंवा भीतीमुळे किंवा बळजबरीने एकत्र राहू लागतात. मग हळूहळू त्यांना दोन्ही कुटुंबाकडून आणि समाजाचीही मान्यता मिळते. अशा प्रकारे ‘पदरी पडलं आणि पवित्र झालं’ असं मानून जबरदस्तीने एकत्र आलेले वधू वर नंतर तडजोडीत आनंद मानून एकत्र संसार करू लागतात.

अर्थात एकंदरित हा सगळाच प्रकाक योग्य नाही. लग्नासारखे नाजूक आणि पवित्र बंधन हे कोणाच्याही सक्तीने केले जाऊ शकत नाही किंबहुना तसे करणे योग्य नाही. कायद्यानेही या प्रकाराला कधीही मान्यता दिली नाही. या लग्नांचे प्रमाण काळानुसार कमी झाले असले तरी बिहारच्या काही घरांमध्ये आजही अशा प्रकारच्या ‘भितीदायक लग्नाची’ शहनाई वाजते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?