' सद्दामशी हातमिळवणी करणाऱ्या या अणूशास्त्रज्ञाने पाकिस्तानचीच प्रतिमा मलिन केली! – InMarathi

सद्दामशी हातमिळवणी करणाऱ्या या अणूशास्त्रज्ञाने पाकिस्तानचीच प्रतिमा मलिन केली!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

पाकिस्तान सारखा विश्वास घातकी देश पूर्ण जगात नाहीये हे आपल्याला माहीतच आहे. अतिरेकी संघटनांना पाठीशी घालणाऱ्या या देशातील काही लोक हे इतकं चुकीचं वागतात की, त्यांचं वागणं बघून आपण शेवटी हेच म्हणतो, “तो पाकिस्तानचा आहे ना, मग बरोबर आहे. जसा देश, तसे लोक.”

‘अब्दुल कादिर खान’ या भारतात जन्मलेल्या आणि पाकिस्तानात वाढलेल्या बुद्धिवान शास्त्रज्ञाबद्दल आज सांगत आहोत ज्याला पाकिस्तानचे लोक हिरो मानतात.

१० ऑक्टोबर २०२१ रोजी या शास्त्रज्ञाचा कोरोनामुळे पाकिस्तानमध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर पंतप्रधान इम्रान खानने अब्दुल कादिर खानचं ‘राष्ट्र रत्न’ म्हणून संबोधन करून आपल्या बुद्धीची उंची दर्शवली आहे.

 

abdul qadir inmarathi

 

कारण, हा तोच अब्दुल कादिर आहे ज्याने काही पैशासाठी आपल्या देशासोबत आणि मानवतेसोबत गद्दारी करून अणूचाचणीची माहिती लिबिया सारख्या देशांना विकली होती. अतिरेकी संघटनांच्या हाती जर ही माहिती पडली असती तर जगाचं काय झालं असतं?

इतका साधा विचार पण त्याने केला नाही. अशा लोकांना पाकिस्तान मध्ये हिरोचा दर्जा मिळतो हे त्या देशाची बौद्धिक पातळी संगण्यासाठी पुरेसं उदाहरण आहे.

कोण होता अब्दुल कादिर खान?

अब्दुल कादिर खानचा जन्म १ एप्रिल १९३६ रोजी भोपाळ मध्ये झाला होता. फाळणी नंतर १९५२ मध्ये अब्दुल कादिर यांचा परिवार पाकिस्तानमध्ये रहायला गेला. कराची मध्ये आपलं शिक्षण पूर्ण करून तो उच्च शिक्षण घेण्यासाठी जर्मनीला गेला होता.

‘न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी’ या विषयात शिक्षण घेण्यासाठी तो बेलजियमला गेला. शिक्षण पूर्ण केल्यावर त्याला तिथेच नोकरी मिळाली.

१८ मे १९७४ रोजी भारताने ‘पोखरण’ मध्ये अणूचाचणी केली होती. या ऑपरेशनला ‘स्माईलिंग बुद्धा’ हे नाव देण्यात आलं होतं. १९७१ मध्ये भारताने पाकिस्तानला युद्धात हरवून त्यांची चांगलीच जिरवली होती. भारताने अणूचाचणी केल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला होता.

 

pokhran inmarathi

 

पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधान ‘झुल्फिकार अली भुट्टो’ यांनी हे वाक्य वापरलं होतं की, “जर भारताने अणूचाचणी केली असेल तर आम्ही पण ती करणारच. त्यासाठी लागणारा पैसे आम्ही कसेही उभे करू. गरज पडली तर आम्ही झाडाची पानं, गवत खाऊन दिवस काढू. पण, आम्ही अणूचाचणी करणारच.”

बेलजियममध्ये काम करणाऱ्या अब्दुल कादिर खान पर्यंत हे वाक्य पोहोचलं आणि त्याने त्वरित भुट्टोला पत्र पाठवून या कामात मदत करू देण्याची विनंती केली. भुट्टोने ही विनंती मान्य केली. अब्दुल कादिरने पुढील दोन वर्ष अणूचाचणीचे तंत्रज्ञान चोरण्यात आणि त्यासाठी आवश्यक ती सामुग्री गोळा करण्यासाठी दिले.

१५ डिसेंबर १९७५ रोजी बेलजियम मधील नोकरीत काहीच न सांगता तो पाकिस्तानला निघून गेला.

एप्रिल १९७६ मध्ये अब्दुल कादिर खानने रावळपिंडी येथे खान रिसर्च लॅब ही गुप्तहेर संस्था सुरू केली. इंजिनियर आणि पाकिस्तान आर्मीमधील काही लोकांनी मिळून इथे अणूचाचणी करण्यासाठी संशोधन सुरू झालं.

मे १९९८ मध्ये भारताने परत एकदा पोखरण येथे पाच अणूचाचण्या केल्या. दोन आठवड्यानंतर लगेच पाकिस्ताननेसुद्धा अणूचाचण्या केल्या. डॉक्टर अब्दुल कादिर खान हा या कार्यक्रमाचा सूत्रधार होता.

त्या प्रित्यर्थ, त्याला ‘निशान-ए-इम्तियाज’ या पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ‘पाकिस्तानचा रक्षणकर्ता’ म्हणून अब्दुल कादिरचे फोटो शहरभर लागत होते.

 

abdul qadir 2 inmarathi

उतरती कळा

एकीकडे डॉक्टर अब्दुल कादिर खान हे नाव मोठं होत होतं आणि दुसरीकडे तो आपण ‘पाकिस्तानी’ आहोत हे दाखवून देत होता. त्याने पाकिस्तानच्या बाहेर आपल्या कंपन्या सुरू केल्या होत्या. अणूचाचणीसाठी लागणारे सामुग्री, शस्त्र, डिझाईन यांचा ‘काळाबाजार’ अब्दुलने सुरू केला होता.

इराण, उत्तर कोरिया, लिबिया या देशांनी ही सर्व मालमत्ता अब्दुलकडून मोठी किंमत देऊन खरेदी केली. या सर्व देशांमध्ये त्या काळात राजेशाही होती.

या देशांच्या हातात अणुबॉम्ब तयार करण्याचा फॉर्म्युला गेला आणि जगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला. आज हेच देश त्यांच्या शत्रू देशांना अणूबॉम्ब वापरण्याची भीती घालत असतात.

इराणच्या हुकूमशहा सद्दाम हुसेनलासुद्धा अब्दुल कादिर खानने अणूबॉम्ब विकत घेण्याची ऑफर दिली होती. पण, सद्दामला यामध्ये काही कारस्थान असल्यासारखं वाटलं म्हणून त्याने ही खरेदी केली नाही. अन्यथा, काय झालं असतं ही कल्पनासुद्धा भीतीदायक आहे.

 

saddam hussain

 

डॉ. अब्दुल कादिर खानला त्यामुळेच लादेनपेक्षाही मोठा धोका म्हणून घोषित करण्यात आलं होतं. एक शास्त्रज्ञ पैशांसाठी इतकं दुष्कृत्य करू शकतो यावर विज्ञान जगताचा विश्वास बसत नव्हता. त्याने केलेलं हे कृत्य केवळ देशाविरुद्ध नव्हतं तर जगाविरुद्ध, मानवतेविरोधी केलेलं हे दुष्कृत्य होतं.

फेब्रुवारी २००४ मध्ये अब्दुल कादिरला आपल्या कुकर्माची जाणीव झाली होती. त्याने पाकिस्तानी टीव्हीवर येऊन देशवासीयांची माफीसुद्धा मागितली होती. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. २००३ मध्येच त्याने अणूबॉम्बची माहिती लिबिया मध्ये पोहोचवली होती.

डिसेंबर २००३ मध्ये लिबियाचा हुकूमशाह मोहम्मद गद्दाफीने अमेरिकेशी जवळीक साधली आणि देशात पोहोचलेली ती अणुबॉम्बची माहिती नष्ट केली आणि मोठा धोका टळला होता.

पश्चिम देशातील सर्व सुरक्षा संस्था कित्येक वर्ष अब्दुल कादिर खानकडे संशयित म्हणून बघत होत्या. ११ डिसेंबर २००३ रोजी अमेरिकेचं एक पोलीस पथक लिबियामध्ये दाखल झालं होतं. तिथे त्यांना अब्दुल खानच्या बॅगमध्ये ‘न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी’च्या नावाने डिझाईन सापडलं आणि त्यांची खात्री पटली की लिबियाला ही माहिती अब्दूलनेच विकली आहे.

परवेझ मुशर्रफ यांनी तेव्हा अमेरिकेची साथ दिली आणि डॉ. अब्दुल कादिर खानला पाकिस्तानमध्ये आजन्म गृह कैदेची शिक्षा सुनावली. “तुझ्यामुळे पाकिस्तानची प्रतिमा जगभरात कायमसाठी मलिन झाली आहे” हे वाक्य ऐकून त्यांच्यासमोर खूप रडला होता. पण, पाकिस्तान ते शेवटी पाकिस्तानच.

२००९ मध्ये इस्लामाबादच्या उच्च न्यायालयाने अब्दुल कादिर खानला या ‘गृहकैदेतून’ सुद्धा मुक्त केलं.

 

abdul qadir jail inmarathi

 

पाकिस्तानचे अणुबॉम्ब तयार करण्याचे तंत्र हे त्या सरकारच्या संमतीशिवाय दुसऱ्या देशांना विकले जाऊच शकत नाहीत हे सांगायला कोणी तज्ञाची गरज नाहीये. झालं ही तसंच. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांनी काही दिवसातच परवेझ मुशर्रफ वर हे आरोप केले की, “मुशर्रफच्या संमतीशिवाय एक अणूशास्त्रज्ञ १३ ते १४ वेळेस उत्तर कोरिया, लिबिया मध्ये प्रवास करूच शकत नाही” आणि हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता.

२०१३ मध्ये अब्दुल कादिर खानने चौकशी दरम्यान हे सांगितलं की, “बेनझीर भुट्टो यांनी सुद्धा अणूचाचणीची माहिती उत्तर कोरियाला विकण्यासाठी संमती दिली होती.” पण, या आरोपावर उत्तर देण्यासाठी बेनझीर भुट्टो हयात नव्हत्या. त्यांचा २००७ मध्ये अतिरेकी हल्ल्यात खून झाला होता.

अब्दुल कादिरच्या निधनाने जगावरचा धोका कमी झाला आहे असं जगातील प्रमुख सुरक्षा संस्था सांगत आहेत. दुटप्पी पाकिस्तानने अब्दुल कादिरचा दफनविधी हा शासकीय इतमामात करून या अतिरेकी व्यक्तीबद्दल आपला आदर पुन्हा दाखवून दिला आहे.

एखाद्या देशाचे दाखवायचे दात आणि खायचे दात इतके वेगळे असू शकतात हे सांगण्यासाठी केवळ ही माहिती सादर करण्यात आली आहे.

 

pakistan jinnah inmarathi

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?