' तुम्ही तुमच्या एक्स-पार्टनरच्या प्रेमात पुन्हा का पडता? वाचा यामागची कारणं! – InMarathi

तुम्ही तुमच्या एक्स-पार्टनरच्या प्रेमात पुन्हा का पडता? वाचा यामागची कारणं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

माणूस आयुष्यात कुणाच्यातरी प्रेमात पडतोच. काही लोक लग्नाच्या आधी प्रेमात पडतात तर काही लोक घरच्यांनी लग्न ठरवल्यावर आपल्या होणाऱ्या जीवनसाथीच्या प्रेमात पडतात. काही नशिबवान लोकांची लव्ह स्टोरी अडथळ्यांची सगळी शर्यत पार करून लग्नाच्या टप्प्यापर्यंत पोहोचते तर बऱ्याचश्या लव्ह स्टोरीजचा ब्रेकअपमध्ये करुण अंत होतो.

 

Lovely couple Inmarathi

 

नव्या नवलाईचे दिवस संपले की एकमेकांच्या बऱ्याचश्या गोष्टी खटकू लागतात आणि मग सुरु होतात भांडणं, वादविवाद आणि रुसवेफुगवे! ह्यातून जो तरतो त्यांचे नाते अधिक घट्ट होते पण काही कारणांमुळे तसं झालं नाही तर मग ब्रेकअप होणे अटळ असते.

आजकाल तर हे ब्रेकअप्स सुद्धा सेलिब्रेट केलेलं बघायला मिळतं. पण नातं कसंही असलं तरी आपण त्या व्यक्तीवर प्रेम केलेलं असतं त्यामुळे ब्रेकअपचं दुःख होणे साहजिक आहे.

काही लोक ह्यातून पटकन बाहेर पडतात तर काही लोक मात्र आपल्या एक्सच्या आठवणींत झुरत राहतात. त्यांचे मन ते ब्रेकअप स्वीकारु शकत नाही आणि ब्रेकअप झाल्यावरही हे लोक एक्सवर प्रेम करत राहतात.

 

sai tejashree inmarathi

 

कधी कधी अश्याही केसेस घडतात की लोक ब्रेकअप करतात आणि एक्स परत भेटली /भेटला की परत त्यांच्या प्रेमात पडतात. कालांतराने अनेक जुनी जोडपी एकत्र आलेली आपल्याला दिसतात. असं का होतं? एकदा त्या व्यक्तीपासून वेगळे झाल्यानंतर सुद्धा लोकांना एक्सचा मोह का पडतो?

ब्रेकअप झालं म्हणजे मनातल्या भावना संपल्या असे होत नाही. ब्रेकअप केल्याने, एकमेकांशी संपर्क तोडल्याने दोघांनाही एकमेकांपासून थोडा ब्रेक मिळतो.

आपण कसे वागलो, आपलं कुठे चुकतंय, काय बदल करायला हवेत, समोरच्याचं कुठे चुकलं या सगळ्याचा शांतपणे विचार करायला वेळ मिळतो. तसेच ती व्यक्ती आयुष्यात किती महत्वाची आहे, तिच्याशिवाय आयुष्य चांगले आहे की वाईट ह्या सगळ्याची स्पष्ट कल्पना येते.

 

plantonic love article

 

ते नातं जर खरंच तितकं महत्वाचं असेल आणि त्या नात्याला जर दुसरा चान्स मिळत असेल तर लोक वेगळे झालेले असले तरी परत एकत्र येतात. कारण एक्स जर परत आयुष्यात आला/आली तर त्याबरोबर ती प्रेमाची सुप्त भावना देखील परत जागृत होते आणि ही भावना दोघांच्याही मनात जागृत झाली तर वेगळी झालेली जोडपी परत एकत्र येतात.

यात दुसरा मुद्दा असा की जुन्या नात्यात परत प्रवेश करताना आपल्याला समोरच्या माणसाच्या वागण्याची कल्पना असते. त्याचा स्वभाव माहिती असतो. त्या व्यक्तीच्या गुण दोषांची माहिती असते. म्हणूनच “नोन डेव्हील इज बेटर दॅन अननोन एंजल” या उक्तीप्रमाणे लोक परत नव्या व्यक्तीबरोबर शून्यापासून सुरुवात करण्याऐवजी जुन्याच व्यक्तीबरोबर परत नातं जोडणं सोपं आहे असं समजतात.

 

live in relationship inmarathi

 

याच विषयावर अभ्यासाअंती असाच निष्कर्ष निघाला आहे की “जुन्या नातेसंबंधांना दुसरा चान्स देताना त्या व्यक्तीशी आपली चांगली ओळख असते त्यामुळे ह्या नात्याला पुन्हा संधी देण्याचे खरंच फायदे होतात असे तज्ज्ञ मायकल नॅकनल्टी यांचे मत आहे.

मायकल नॅकनल्टी हे शिकागोमध्ये जोडप्यांचे थेरपिस्ट म्हणून काम करतात. तसेच ते गॉटमान इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षक म्हणून देखील काम करतात.

वादविवाद आणि मतभेद प्रत्येकच नात्यात असतात. मग ते नाते आई मुलाचे असो, बहीणभावाचे असो कि मित्रांचे! दोन भिन्न स्वभावांची माणसे एकत्र आली की मतभेद होणे अटळ असते. हे मतभेद काही बाबतीत कायमस्वरूपी असतात.

साधारणपणे राहण्याची जागा, पैसे, शारीरिक संबंध, मुलं सांभाळणं, मित्रपरिवार हे वादाचे मुद्दे असतात. हेच दीर्घकाळ टिकणारे मुद्दे पुढे नात्यासाठी विषारी ठरतात. पण ब्रेकअपनंतर जेव्हा नात्याबद्दल शांतपणे विचार करायला वेळ मिळतो आणि दोघांनाही आपलेच म्हणणे लावून न धरता समोरच्याचे मुद्दे देखील पटतात तेव्हा जुनी तुटलेली नाती परत नव्याने जुळण्याची शक्यता असते.

 

 

relationship inmarathi '
eharmony.com

 

पण जुनी नाती परत जोडताना आपण हा निर्णय का घेतो आहोत हा त्रयस्थपणे विचार करणे आवश्यक आहे. कुठल्या इन्सिक्युरिटीमुळे तुम्ही परत तुमच्या एक्सकडे आधारासाठी म्हणून जाताय का? किंवा तुम्हाला त्या नात्याची सवय झाली आहे आणि आयुष्यात मोठा बदल करण्याची भीती वाटते म्हणून तुम्ही तुमच्या एक्सकडे परत जाण्याचा विचार करताय का? किंवा तुम्हाला खरंच त्या व्यक्तीविषयी आणि नात्याविषयी ओढ वाटतेय का? हे सगळे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून त्याची खरी उत्तरे शोधणे आवश्यक आहे.

या सगळ्या बाबतीत तुम्ही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तसेच जर नातेसंबंध टिकवण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करणे आवश्यक असतील तर ते बदल करणे तुम्हाला शक्य होणार आहेत का हे देखील तुम्ही विचारपूर्वक ठरवले पाहिजे.

नाहीतर वेगळं होण्यासाठी कारणीभूत ठरलेली कारणे परत उद्भवली तर परत येरे माझ्या मागल्या होऊन मतभेद होऊन प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?