' “गेल्या ७ वर्षांत राज ठाकरेंची खिल्ली उडवण्यातच मराठी माणसाने धन्यता मानली!” – वाचा परखड मत – InMarathi

“गेल्या ७ वर्षांत राज ठाकरेंची खिल्ली उडवण्यातच मराठी माणसाने धन्यता मानली!” – वाचा परखड मत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक : ओमकार जामसंडेकर

===

राजसाहेबांवर ही वेळ नेमकी कुणी आणली? उत्तर आहे- दुर्दैवाने, मराठी माणसानेच!

मनसे-भाजप संभाव्य युतीची चर्चा होत आहे, चंद्रकांत दादा कृष्णकुंज या Power House वर तसा प्रस्तावच घेऊन गेलेले, राजसाहेबांनी ही मंदिरे उघडली नाहीत तर घंटानाद आंदोलन करू असे सांगितले.

 

bjp mns inmarathi

 

खरंतर राज ठाकरेंसारखा Sensible नेता म्हणा किंवा व्यक्ती म्हणा दुसरी नाही, Absolute No Nonsense tolerance हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सुंदर भाग आहे.

असा माणूस जेव्हा कोरोना काळात मंदिरे उघडा अन्यथा घंटानाद आंदोलन वगैरे बोलतो तेव्हा खरंच सांगतो, ते ओठातील शब्द खरंच त्यांच्या हृदयातील अथवा मनातील नसतात. ते काहीसे मैत्री खात्यात वा दोस्तीखातीर वदवून घेतल्यासारखे वाटतात.

काय नाही केलं या माणसाने महाराष्ट्रधर्मासाठी. मुळात महाराष्ट्रधर्म हा समर्थांचा शब्दसूर्यच मुळी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर काहीसा दिसेनासा झाला, आचार्य अत्रेंनी या शब्दाला एक वेगळी झळाळी आणि धार मिळवून दिलेली होती, नंतर आदरणीय बाळासाहेबांनी मराठीचा मळवट ललाटी भरत या धर्मासाठी यळकोट भरला.

 

atre and balasaheb inmarathi

 

मग १९९०-२००५ हा शब्द, मऱ्हाटी अस्मिता, मराठी शारदा काहीशी म्लान झालेली विशेषतः २००० नंतर जेव्हा नेटक्रांतीमुळे जिथे तिथे call centers open झालेले, परराज्यातील शिक्षित लोंढा महाराष्ट्रावर चारी बाजुंनी आदळू लागलेला, चित्रपटात हमखास मराठी व्यक्तिमत्व दुय्यम, नोकर, गावठी भाषेत बोलत असलेले हवालदार, भ्रष्टाचारी नेता अशा स्वरूपात होत चित्रित होत होते.

काँग्रेसच्या पुढाकाराने विलासरावांच्या Under गिरण्यांच्या जमिनींचे तीन हिस्से करून झालेले, पावसाळ्यात उगवणाऱ्या अळू सारख्या जिथे तिथे उगवलेल्या कंपन्या, त्यात लखनौ-चंदिगढ-bangalore-दिल्ली-आग्रा-नोएडा भागातून Direct hire केलेली गोरे-गोमटी-उंच पोरं-पोरी इंग्रजीचा बडेजाव मिरवत बिनधास्त ‘घाटी लोग’चा उद्धार मांडत होती.

Radio Jockies नी उच्छाद मांडलेला-आम्ही सांगू ती पूर्व- असा attitude असणारी जमात पंजाबी-तेलगू गाणी लागोपाठ लुपवर वाजवायची. पण मराठी गाने बडे देहाती beats वाले होते हैं | असं म्हणत खुशाल नाकारायचे.

मुंबईतील मराठी माणूस Identity crisis मध्ये अडकलेला, त्याचा आवाज काहीसा क्षीण होत होता, याच बिंदूला एक युवानेता सर्व काही पणाला लावून मैदानात आला होता, ह्या क्षेत्रातल्या रथी-महारथी लोकांनी त्यावर टीका केली, त्याची निंदानालस्ती केली, टवाळी मांडली.

 

raj thackrey inmarathi

 

नव्या नवलाईचे नऊ दिवस ते सकाळी लवकर उठावे लागते वगैरे. पण हा नेता तेच ते चालत आलेले राजकारण करणारा नव्हता, तो आला एक नवाच झेंडा-नवा विचार घेऊन.

मुंबईतील मराठी माणसाचा कोंडमारा, कॉर्पोरेट्स मध्ये काम करणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांचा होणारा उपमर्द, बड्या सोसायटीतला मराठी लोकांना sidetrack करणारा attitude या माणसाने जाणला आणि आहे त्या शिलेदारांनिशी, आहे त्या स्थानावरून मराठीसाठी रण शिंग फुंकले,

महाराष्ट्र रसात न्हाऊन सोडणाऱ्या आपल्या अमोघ वाणीने मराठी मने संमोहित झाली, आपल्यावरील अन्यायाची त्यांना जाणीव झाली, मराठी मनामनातील स्फुल्लिंग चेतले गेले.

मराठी पाट्या लागल्या, मराठी मुले रेल्वे-विमानतळात कामाला लागली, बँकेत मराठी टक्का वाढला, office मधील मराठी माणसाची थट्टा बंद झाली.

अहो खर सांगतो, मी तेव्हा आठवीला होतो, या नेत्याच्या भाषणाने शाळेतही मराठीधर्मरक्षक-महाराष्ट्र सैनिक आपोआप तयार झालेले, शाळेतील शिक्षकांनाही आपले प्रतिनिधीत्व करेल, मराठी भाषेला तिचा अभिजात दर्जा मिळवून देईल असा सुसंस्कृत योद्धा लाभल्याचे समाधान झाले होते, बरं त्या शिक्षकवृंदात सर्व जातीय शिक्षक राज ठाकरे या व्यक्तीचे समर्थक झाले होते.

काय केलं नाही ह्या माणसाने, उभ्या…. उभ्या भारताला मराठी माणसाची मराठी भाषेची दखल घायला भाग पाडले, मराठी माणसाचा, मुंबईतील मराठी भाषेचा एक terror या माणसाने पुन्हा प्रस्थापित केला,

 

raj thackrey 2 inmarathi

 

याने आणि याच्या लाखो सहकाऱ्यांनी स्वतःवर शेकडो भयंकर केसेस घेत, मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी सण, मराठी संस्कृतीला मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला!

त्याबदल्यात मराठी माणसाने या माणसाला परत काय दिले? १३ आमदारांच्या नंतर मात्र याच्या पदरात उपेक्षा आणि अवहेलनाच टाकली. मराठी अस्मितेवर काही हल्ला होताच, त्या हल्ल्याला परतवून लावण्यासाठी यांचेच महाराष्ट्रसैनिक बिबट्यासारखे चालून येतात.

अवघ्या देशातील विरोधी पक्ष जेव्हा शेपूट घालून गायब झाला होता तेव्हा ह्या देशातील सर्वात जास्त पॉवरफुल असलेल्या जोडगोळीला बिनधास्तपणे शिंगावर घेण्याचा भीमपराक्रम या पठ्ठयाने करून दाखवलेला, त्यासाठी छातीत हिंमत लागते, ते काळीज या माणसाकडे होतं.

पण मराठी माणसाने गेल्या ७ वर्षांत याची खिल्ली उडवण्यातच धन्यता मानली. ज्यांच्यासाठी आपण इतका आटापिटा करतोय त्यालाच त्या गोष्टीची किंमत नसेल तर का करावा हा त्रागा आणि त्रास.

त्यामुळे जरी त्याना भाजपने आपल्या गोटात घेणे आणि यांनी त्यांचे शब्द बोलणे हे प्रकार माझ्यासारख्या असंख्य लोकांना जरी काहीसे पटले नसले तरी राजसाहेबांना ही भुमिका घ्यायला मराठी जनतेनेच भाग पाडले आहे, अश्या स्पष्ट मताचा मी आहे.

 

bjp and mns inmarathi

कधी कधी असं वाटतं हा माणूस दक्षिणेत जन्माला आला असता ना तर तिथल्या जनतेने ह्याला पेरियार-करुणानिधी आणि जयललिता वैगरे प्रभूतींच्या पंगती बसवून याला दक्षिणेचा द्राविडी अस्मितेचा आवाज बनवले असते.

आणि विंध्यांचला पर्वतश्रेणी या भौगोलिक सीमारेखेखाली “दक्षिणीयांची पातशाही दक्षिणीयांच्याच हाती राहो दे” हा शिवछत्रपतींचा उत्कट ध्येयवादासाठी या माणसाने थोरली मसलत मांडली असती. असो….

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?