हवेतून रसगुल्ला काढून देत ‘या’ जादुगाराने सत्यसाई बाबांचा फोलपणा उघड केला होता
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतात वलयांकित अध्यात्मिक गुरूंची कमतरता कधीच नव्हती, आजही नाही. मात्र वेळोवेळी या वलयांकित गुरूंची लबाडी, खोटेपणा समोर येत गेला आणि त्यांचे खरे चेहरेही सामान्यांसमोर आले.
सत्तरच्या दशकापासून मोठं होत गेलेलं एक नाव म्हणजे सत्यसाईबाबा! यांचे अनेक चमत्कार भल्या भल्यांनाही चकीत करत असत. अगदी पंतप्रधानांपासून बॉलिवुड कलाकार आणि सामान्यांपर्यंत लाखो भक्त असणार्या साईबाबांची लबाडीही जगासमोर आली आणि त्यांच्या अध्यात्मिक करियरला उतरती कळा लागली.
एकेकाळी भारतातलं पुट्टूपर्थी हे गाव तमाम भारतीयांचं श्रध्दास्थान होतं. माणसाच्या सर्व निराशांवर, अडचणींवर इथे हमखास उत्तर मिळायचं. सत्यसाईबाबांच्या विभूतीनं अनेकांची आयुष्यं मार्गी लागली. न सुटणार्या समस्या क्षणात सुटल्या आणि पुट्टूपर्थी हे जगभरातल्या अडल्या नडल्यांचं हक्काचं मदतीचं स्थान बनलं.
सत्य साईबाबा प्रचंड मोठ्या स्टेडियमच्या प्रांगणात हजारो लाखो भक्तांना दर्शन देण्यासाठी, त्यांच्या अडचणी चुटकीसरशी सोडविण्यासाठी येत असत. मात्र ते सामान्यांप्रमाणे चालत येत नसत, तर रथात बसून येत. त्यांच्या रथासमोर पोलिसातले वरिष्ठ अधिकारीही असत.
भक्तगणांत आतुरतेनं वाट बघणार्यात राष्ट्रपतींपासून, पंतप्रधानांपर्यंत भारतातले सर्वोच्च स्थानावरचे लोकही असत. इतकं असताना त्यांच्या महिम्यावर कोणी शंका घेण्याचं काही कारणच नव्हतं. जोवर बंगालचे प्रसिध्द जादुगार पी.सी. सरकार आश्रमात गेले नव्हते तोवर सगळं सुरळीत चाललं होतं. बाबांचे चमत्कार सरकार यांनीही केले आणि हा इश्वरीय महिमा प्रश्नांकीत बनला.
सत्यसाई बाबा यांच्याविषयी थोडंसं…
असा हा वलयांकित महिमा सत्यसाईबांबाना एका रात्रीत प्राप्त झाला नव्हता. खरंतर सत्यसाईबाबांची गोष्ट सुरू होते पुट्टूपर्थीमधील एका गरीब कुटुंबातून. सत्यनारायण राजू या मुलाचे आईवडिल मजुरी करून कसंबसं घर चालवत असत. लहानपणापासूनच सत्यनारायण राजूनं अठराविश्वे दारिद्र्यच पाहिलं.
सत्यनारायणला एक भाऊ आणि दोन बहिणीही होत्या. शाळकरी वयात अचानकच त्याच्या स्वभावात बदल घडला आणि तो टोकाचा धार्मिक बनला. वयाच्या अवघ्या चौदव्या वर्षी त्याने जाहीर केलं, की तो शिर्डीच्या साईबाबांचा अवतार असून जगाला मार्गदर्शन करायला त्याने पुन्हा जन्म घेतला आहे.
या घटनेनं प्रचंड खळबळ माजली. सुरवातीच्या काळात केवळ भजन किर्तन करणारा सत्यनारायण लवकरच अध्यात्मिक गुरु बनून लोकांना उपदेश करू लागला. १९५० पर्यंत त्याचा प्रभाव इतका वाढला की पुट्टुपर्थीमध्ये त्यानं त्याच्या प्रशांती निलायम आश्रमाची स्थापना केली.
हवेतून महागडी घड्याळं, दागिने, विभूती, प्रसाद काढणार्या या चमत्कारी गुरूचे देशात आणि परदेशातही भक्तगण तयार होऊ लागले होते.
जसा आश्रमाचा व्याप वाढत गेला तसं पुट्टूपर्थी जगाच्या नकाशावार ठळक होऊ लागलं. सत्यसाईबाबांनी या ठिकाणी हॉस्पिटल, महाविद्यालय, स्टेडियम आणि एअरपोर्ट बांधलं.
हवेतून येणारी एक चिमुट विभूती सत्यसाईबाबा भक्ताच्या कपाळी लावत आणि भक्ताच्या सर्व हाल अपेष्टा दूर होत असत. सगळं जग सुखी होण्याच्या मार्गावर असतानाच काही बुध्दीजीविंना मात्र हे सुख बघवत नव्हतं. त्यांनी हवेतून निघणार्या या प्रसादाला चक्क बुवाबाजीचे चमत्कार म्हणण्यास सुरवात केली.
त्याकाळातले बंगालचे सुप्रसिध्द जादुगार पी. सी. सरकार यांनी थेट आश्रमात जाऊन हवेतून रसगुल्ला काढून सत्यसाईबाबांच्या चमत्काराला आव्हान दिलं. या घटनेनं चांगलीच खळबळ माजली. सत्यसाईबाबांच्या आश्रम कर्मचार्यांनी पी. सी. सरकारना तातडीनं आश्रमाबाहेर काढलं. यानंतर थोड्याच वेळात प्रशांती निलायमच्या कर्मचार्यांनी चार तरूणांची हत्या केली.
बाबांच्या बेडरुममध्ये घुसून त्यांची हत्या करण्याचा त्यांचा कट असल्याचं सांगितलं गेलं मात्र याबाबतची सत्यासत्यता कधीच बाहेर आली नाही.
बाबांचा संपर्क मंत्र्यांशीही असल्यानं हे प्रकरण उघडकीस आलं नाही. अर्थात या दोनही घटना बाहेर जायच्या त्या गेल्याच आणि बाबांच्या चमत्कारांना हादरे बसण्यास सुरवात झाली. त्यांच्या दैवी शक्तीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं.
हे प्रश्नचिन्ह हळूहळू इतकं मोठं बनलं की बाबांचं करियर संपलं, त्यांच्या आश्रमावर धाड घातली गेली, कोट्यवधींची बेहिशोबी मालमत्ता हस्तगत केली गेली आणि सत्यसाईबाबा हे प्रकरण इतिहासजमा झालं.
पी सी सरकार यांनी हवेतून, तोंडातून गोष्टी कशा काढल्या जातात याचं शास्त्रीय विवेचन लोकांसमोर मांडलं आणि या चमत्कारांमागची हातचलाखी समोर आली. त्यानंतरही अनेकजण बाबांच्या भक्तीतत लीन होते मात्र काहींनी त्यांचे हे दैवी चमत्कार नाकारले.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
- बाबा राम रहीम सारखे ९ वादग्रस्त गुरू!
- संतकवी तुलसीदास यांनी सांगितलेले हे गुण तुम्हाला कोणत्याही संकटातून वाचवू शकतात
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.