' ब्रिटीशांसाठी लढलेल्या या भारतीय वीरपुत्रासमोर आजही इंग्रज नतमस्तक होतात – InMarathi

ब्रिटीशांसाठी लढलेल्या या भारतीय वीरपुत्रासमोर आजही इंग्रज नतमस्तक होतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पहिलं महायुद्ध या घटनेला जागतिक इतिहासात खूप महत्व आहे. १९१४ ते १९१८ या काळात झालेल्या या युद्धात त्यावेळी पारतंत्र्यात असलेल्या भारत देशाचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. पण, त्या काळात उदयास आलेल्या ‘ब्रिटिश इंडियन आर्मीने’ या युद्धाला एक कलाटणी दिली होती हे या युद्धाच्या नोंदी सांगतात.

दुसऱ्या महायुद्धाची नांदी असलेल्या या पहिल्या महायुद्धाने पूर्ण युरोप खंड, आखाती देश, रशिया आणि अमेरीका यांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं.

भारतीय सैनिकांनी या युद्धात आपल्या जीवाची पर्वा न करता इंग्लंडच्या बाजूने हे युद्ध लढलं होतं. भारतीय सैन्याच्या कामगिरीमुळे आर्मी कमांडर सर क्लॉड औचिनेक यांनी एकदा असे उद्गार काढले होते की, “भारतीय सैनिक नसते तर ब्रिटन या युद्धात सहभागी होऊ शकला नसता.”

 

world war 1 inmarathi

 

दिल्लीमधील ‘इंडिया गेट’ हे या सैनिकांच्या सन्मानासाठी बांधण्यात आलं आहे हे आपण जाणतो. पण, या युद्धात आपलं युद्ध कौशल्य दाखवणाऱ्या सैनिकांची नावं फारशी आपल्या ऐकिवात नाहीयेत.

हे ही वाचा पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवणाऱ्या या भारतीय “फायटर पायलट” ची कथा वाचा!

गढवाल चे ‘रायफल मॅन गब्बर सिंग नेगी’ हे अश्याच एका शूर सैनिकाचं नाव आहे ज्यांनी या युद्धात ‘ब्रिटिश इंडियन आर्मी’चं नेतृत्व केलं होतं. रायफल मॅन गब्बर सिंग नेगी यांच्या युद्ध कौशल्याची इंग्लंडने दखल घेत लंडन मध्ये नेगी यांचा एक पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे.

गढवालची भूमी ही भौगोलिक रित्या खूप महत्वाची आहे. कारण, तिथे उत्तराखंड, तिबेट, कुमाऊ अश्या सर्व दिशातून येणाऱ्या वाटा येऊन मिळतात. युद्धाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या भागाला एकेकाळी ‘लॅण्ड ऑफ गब्बर सिंग’ ओळखलं जायचं.

 

gabbar singh negi inmrathi

 

आजही त्यांच्या शौर्याच्या गोष्टी तिथल्या मुलांना इतिहासात शिकवल्या जातात यावरून त्यांच्या कर्तृत्वाची महती लक्षात येऊ शकते.

‘रायफल मॅन गब्बर सिंग नेगी’ यांपासून प्रेरित होऊन गढवाल भागातील कित्येक लहान मुलं हे ‘इंडियन आर्मी’ मध्ये भरती होण्याचं स्वप्न बघत असतात.

गब्बर सिंग नेगी यांचा जन्म २१ एप्रिल १८९५ मध्ये गढवालच्या मंजुद गावात झाला होता. १९१३ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी गब्बर यांनी इंडियन आर्मी मध्ये प्रवेश केला आणि १९१४ मध्ये त्यांना पहिल्या महायुद्धासाठी फ्रांसला पाठवण्यात आलं होतं.

जर्मनीसारख्या बलाढ्य सैन्यासमोर ‘रायफल मॅन गब्बर सिंग नेगी’ यांनी बटालियन २ चं नेतृत्व केलं होतं. ३५० सैनिक असलेल्या या सैन्याच्या तुकडीने जर्मन सैनिकांना कडवी झुंज दिली होती.

जर्मनीच्या ‘न्यू चॅपल लॅण्ड’ या जागेवर ‘ब्रिटिश इंडियन आर्मी’चा झेंडा रोवण्यात गब्बर सिंग नेगी हे यशस्वी झाले होते.

 

british indian army inmarathi

 

गब्बर सिंग नेगी यांनी सलग १ वर्ष या युद्धात स्वतःला झोकून दिलं होतं. जर्मन सैनिकांवर अशी वेळ आली होती की, त्यांना गब्बर सिंग नेगी यांच्यासाठी विशेष सापळा रचावा लागला होता.

१० मार्च १९१५ रोजी रायफल मॅन हे त्या सापळ्यात अडकले आणि त्यांना वीरगती प्राप्त झाली. इंग्लंडला युद्धात वर्चस्व मिळवून देण्याचं श्रेय हे गब्बर सिंग नेगी यांना जातं हे इंग्लंड देश आणि तिथले प्रसारमाध्यमं सुद्धा मानतात.

याच कारणामुळे ‘रायफल मॅन गब्बर सिंग नेगी’ यांना ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ या इंग्लंड च्या प्रतिष्ठित पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात आलं होतं.

लंडनमध्ये असलेल्या नेगी यांच्या स्मारकाला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी २१ एप्रिलला मानवंदना देण्यात येते. दरवर्षी या दिवशी एक रॅली काढण्यात येते आणि गब्बर सिंग नेगी यांची शौर्यगाथा पुढच्या पिढीला सांगण्यात येते.

१९२५ पासून सुरू झालेल्या या प्रथेबद्दल आपल्या प्रसार माध्यमांनी कधीच दखल घेतलेली नाहीये ही खेदाची बाब आहे.

 

gabbar singh 2 inmarathi

 

आपल्यासाठी गढवालची भूमी ही तेव्हाही गब्बर सिंग नेगी यांची भूमी आहे आणि कायमच असेल हे नक्की. गब्बर सिंग नेगी यांच्या या प्रवासात त्यांना मीर दस्त, शहमद खान, लाला दरवान नेगी, खुदाबाद खान सारख्या शूर सैनिकांची सुद्धा मोलाची साथ मिळाली होती.

पहिल्या महायुद्धात भारताचा सहभाग हा आपल्यावर लादण्यात आला होता. कोणत्याही वरिष्ठ नेत्यासोबत चर्चा न करता इंग्रजांनी १९०२ मध्ये ‘ब्रिटिश इंडियन आर्मी’ची स्थापना केली होती.

पहिल्या महायुद्धाच्या वेळी भारतातून जगभरात सैन्य, शस्त्र पाठवण्यात आले होते. हे युद्ध संपल्यावर भारताला स्वतंत्र केलं जाईल ही एक आशा त्यावेळी भारतीयांमध्ये इंग्लंडने निर्माण केली होती. पण, तसं झालं नाही. स्वातंत्र्य हे आपल्याला कमवावंच लागलं होतं.

===

हे ही वाचा या मराठी माणसाने लावलेला शोध दुसऱ्या महायुद्धात हजारो सैनिकांसाठी वरदान ठरला!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?