' दुधातील साखरेप्रमाणे भारतात सामावलेल्या पारसी समाजाचा इतिहास! – InMarathi

दुधातील साखरेप्रमाणे भारतात सामावलेल्या पारसी समाजाचा इतिहास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पारसी समाज हा संख्येने लहान असला तरी समाजाच्या प्रत्येक विधायक कार्यात त्यांचा मोठा सहभाग आढळून येतो. अतिशय प्रेमळ आणि शांतताप्रिय असा हा समाज शांतपणे कुणाच्या अध्यात मध्यात न येता आपले काम करीत असतो आणि समाजासाठी काहीतरी करत असतो.

त्यांच्या समाजोपयोगी कार्यामुळे ते नेहेमी गर्दीत उठून दिसतात. अग्निउपासक असलेला हा पारसी समाज निसर्गाच्या संवर्धनासाठी सुद्धा अतिशय प्रयत्नशील आहे.

 

parasi-community-marathipizza
blogs.wsj.com

 

इसवी सन सातव्या शतकाच्या शेवटी शक्तिशाली Sassanian साम्राज्यावर अरब लोकांनी हल्ला करून तिथल्या लोकांना पराभूत केले व त्यांच्या देशावर ताबा मिळवला. झोराष्ट्रीयन धर्माच्या लोकांना त्यांनी ठार मारले.

ज्यांनी ज्यांनी अरब लोकांना लढा देण्याचा किंवा त्यांचा हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला अशा सर्वांना संपवून टाकले गेले. मग उरलेले झोराष्ट्रीयन इराणच्या पर्वतरांगांमध्ये जीव वाचवून पळून गेले. तिकडे सुद्धा त्यांच्यावर हल्ले झाले. त्यांना तिथूनही निघून जाण्यास परावृत्त केले गेले.

 

parasi-community-history-marathipizza
historyofjihad.org

 

शेवटी होमरूज शहरात काही काळ वाट बघितल्यानंतर शेवटी त्यांनी भारतीय समुद्रकिनाऱ्याकडे येण्याचा प्रवास सुरु केला कारण त्यांना माहित होते की भारतात त्यांचे नक्की स्वागत केले जाईल. भारतातील लोक सहिष्णू आहेत व संकटात असलेल्याला मदत करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. म्हणून त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला.

ते बोटीतून भारताकडे येत असताना त्यांची बोट समुद्रात असताना वादळात सापडली. बोटीचे खूप नुकसान झाले. पण त्यांनी हिम्मत आणि आशा सोडली नाही. वादळ शांत होई पर्यंत ते प्रार्थना करत राहिले आणि अचानक त्यांच्या लक्षात आले की ते गुजरात मधील नार्गोलच्या समुद्रकिनारी पोचले होते.

 

parasi-community-history-marathipizza01
quora.com

 

त्यानंतर एका कथेप्रमाणे त्यांचा नेता दस्तूर जो एक पारसी साधू होता त्याने आपल्या लोकांना संजनच्या राजाकडे म्हणजे जाधव राणाच्या दरबारात आणले. द्स्तुरने राजाकडे संजन गावात राहण्याची परवानगी मागितली.

तेव्हा राजाने एक रिकामे भांडे व थोडे दुध मागवले आणि सर्व दरबारा समोर ते दुध त्या भांड्यात ते भांडे पूर्ण काठोकाठ भरेपर्यंत ओतले आणि ते दस्तूर कडे दिले. ह्याचा अर्थ असा होता की राज्यात नवीन लोकांसाठी जागा नाही.

तेव्हा दस्तूरने त्या भांड्यात साखर घालून ते भांडे राजाकडे परत दिले. तेव्हा ते दूध सांडले नाही पण त्याची चव गोड झाली. ह्याचा अर्थ असा की दस्तूर आणि त्याचे लोक संजन च्या लोकांमध्ये दुधात साखरे सारखे विरघळून जातील.

राजाला दस्तूर चे हे उदाहरण बघून आनंद झाला व त्याने आनंदाने त्या लोकांना आपल्या राज्यात राहण्याची परवानगी दिली. तेव्हाच जगाने बघितले कि दोन समाज कसे एकत्र एकमेकांत मिसळून गेले आहेत.

ज्या नार्गोल किनाऱ्यावर पारसी पहिल्यांदा उतरले तिथे आजही जुनी घरे आहे, तिथे केअरटेकर त्या घरांची देखभाल करतात. हा बीच अतिशय शांत आहे आणि सुंदर आहे. ह्या बीच वर casuarina ची हजारो झाडे आहेत.

 

surat_nargol_beach-marathipizza
gujarattourism.com

 

ह्या संजन गावात काही वर्ष राहिल्यानंतर पारसी लोकांनी राजाला अग्यारी बांधू देण्याची विनंती केली. राजाने हि विनंती मान्य केली. त्यांच्या धर्मात अग्नीला अतिशय पवित्र मानले गेले आहे. ते अग्नीचे उपासक आहेत. त्यांच्या धर्मात अग्नीला प्रकाशाचा पुत्र किंवा Ahura Mazda चा पुत्र मानले गेले आहे.

हा पवित्र अग्नी १६ प्रकारच्या अग्नीने तयार झालेला असतो. ह्यातील १५ अग्नी हे पृथ्वीवर तयार होतात.

 

parasia-agyari-narathipizza01
pinterest.com

 

जसे वीट तयार होण्याच्या भट्टीतला अग्नी, सोनाराकडील अग्नी, बेकरच्या ओव्हन मधील अग्नी, मेंढपाळाच्या घरचा अग्नी, राजाच्या घरातील अग्नी, स्मशानातील अग्नी आणि इतर.

१६वा अग्नी मात्र स्वर्गातून आलेल्या विजेतून तयार झालेला असतो. हे १६ प्रकारचे अग्नी एकत्र होऊन मग त्यांच्या पवित्र अग्यारीमधील गर्भ गृहात विराजमान होतात.

 

parasia-agyari-narathipizza
heritageinstitute.com

 

पारसी लोकांना हा अग्नी तयार करण्यास ३ वर्ष लागले आणि नंतर त्यांनी ह्या अग्नीची संजनच्या अग्यारीमध्ये स्थापना केली. हा अग्नी ६६९ वर्षांपर्यंत त्या मंदिरात विराजमान राहिला. त्यानंतर १३व्या शतकात सुलतान महमूदच्या नेतृत्वाखाली मुघलांनी संजनवर आक्रमण केले.

राजाच्या सैन्याबरोबर पारसी लोकांनी सुद्धा अर्देशीरच्या नेतृत्वाखाली मुघलांशी युद्ध केले. परंतु मुघलांनी त्यांचा पराभव केला. इतिहासात झालेल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पारसी लोक बहरोत पर्वताकडे निघून गेले जो तिकडून २० किमी लांब होता.

त्यांच्याकडे बाकी काही नव्हते, फक्त त्यांच्या देवाला म्हणजे पवित्र अग्नीला मात्र त्यांनी आपल्या बरोबर घेतले होते.

 

parasia-agyari-narathipizza02
mid-day.com

पारसी लोक ज्या अग्निची उपासना करतात त्या अग्नीचा भारतातील प्रवास रंजक आहे. ह्या प्रवासातून पारसी समाजाची जबरदस्त इच्छाशक्ती आणि अचाट बुद्धिमत्ता दिसून येते. त्यांचा हा पवित्र अग्नी त्यांनी बहरोत पर्वताच्या गुहेमध्ये १२ वर्ष लपवून ठेवला होता.

त्यानंतर हा अग्नी त्यांनी वांसदा येथे नेला. तेथे तो १४ वर्ष स्थापित होता. त्यानंतर त्यांनी अग्नी नवसारी येथे नेला. येथे ३१३ वर्षांसाठी अग्नी सुरक्षित राहिला. त्यानंतर हा अग्नी सुरत येथे आणल्या गेला तिथे तो ३ वर्ष स्थापित केल्या गेला त्यानंतर परत नवसारी येथे नेऊन तिथे तो ५ वर्षांसाठी ठेवला गेला.

त्यानंतर वलसाड येथे तो एक वर्ष ठेवण्यात आला. त्यानंतर १७४२ साली हा अग्नी उदवाडा येथे आणण्यात आला आणि तेव्हापासून तो तिथे स्थापित करण्यात आला आहे.

गेली २७० वर्ष तो तिथे अखंड प्रज्वलित आहे. ह्या ठिकाणी Iranshah Atash Behram ह्या अग्नीमंदिरात म्हणजेच अग्यारी मध्ये ह्या अग्नीची उपासना करण्यासाठी जगभरातले पारसी लोक येतात. त्यांच्या साठी हे जगातील सर्वात महत्वाचे ठिकाण आहे.

 

Udwada_atash_behram-marathipizza
en.wikipedia.org

 

१२० कोटींच्या लोकसंख्येमध्ये पारसी लोकांची संख्या फक्त ६०,००० आहे. तरीही त्यांचे समाजासाठी योगदान अत्यंत मोठे आहे. त्यांच्या समाजातूनच भारताला अनेक निष्णात डॉक्टर्स , वकील, न्यायधीश, आर्मी ऑफिसर, लेखक व उद्योगपती मिळाले आहेत.

 

ratan-tata-marathipizza
firstpost.com

समाजकार्य , लोकोपयोगी कार्य करणे हे त्यांच्या रक्तातच आहे आणि भारतातल्या मोठ्या धर्मादाय संस्था तेच चालवतात. त्यांच्या समाजातील वृद्ध लोक कधीही एकटे किंवा हलाखीच्या परिस्थितीत तुम्हाला दिसणार नाहीत.

कारण त्यांच्या समाजतल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी अत्यंत चांगल्या ठिकाणी राहायची सोय केलेली असते.

 

parasi-community-marathipizza01
bbc.com

मुंबई, माथेरान,लोणावळा, महाबळेश्वर ह्यातील चांगल्या भागात त्यांचे वृद्धाश्रम आहेत. जगातील इतर सर्व लोकांपेक्षा त्यांच्या धर्मात निसर्गाविषयी जास्त आस्था आणि निसर्ग संवर्धनासाठी कळकळ व मोलाचे प्रयत्न दिसून येतात.

पारसी लोकांचे पूर्वज भारतात पहिल्यांदा ज्या ठिकाणी आले त्या ठिकाणी म्हणजेच संजन गावात पारसी लोकांचे ओरिजिनल अग्नीमंदिर आज नाहीये. परंतु त्यांच्या आगमनाचे प्रतिक म्हणून व भारतीयांनी त्यांना प्रेमाने आपलेसे करून घेतले ह्याच्या स्मरणार्थ तिथे मागच्या शतकात एक स्तंभ उभारण्यात आला आहे.

 

parasi-community-marathipizza02
parsikhabar.net

पारसी लोक अनेक संकटांना तोंड देत आज ठामपणे उभे आहेत. अनेक क्षेत्रात पारसी लोकांनी यशाच्या शिखरावर कष्टाने स्थान प्राप्त केले आहे. ह्या सगळ्या परीक्षेच्या काळात त्यांनी त्यांची श्रद्धा डळमळीत होऊ दिली नाही.

ज्या भूमीने व ज्या लोकांनी त्यांना आपलेसे करून घेतले आहे त्या भूमीसाठी आणि माणसांसाठी सुद्धा ते झटत आहेत.

 

parasi-community-history-marathipizza03
outlookindia.com

खरच त्यांचे पूर्वज दस्तूर ह्यांनी राजाला सांगितल्याप्रमाणे ते भारतभूमीमध्ये व भारतीय लोकांमध्ये दुधात साखर विरघळून जावी असे सामावून गेले आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?