' पांडवपुत्रांच्या हत्येपोटी भळभळती जखम घेऊन हिंडणाऱ्या ‘अश्वत्थामाच्या’ ६ अज्ञात गोष्टी – InMarathi

पांडवपुत्रांच्या हत्येपोटी भळभळती जखम घेऊन हिंडणाऱ्या ‘अश्वत्थामाच्या’ ६ अज्ञात गोष्टी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

अश्वत्थामा बलिव्र्यासो हनुमांश्च विभीषण:।
कृप: परशुरामश्च सप्तएतै चिरजीविन:॥
सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।
जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित॥

सप्त चिरंजीवांचा हा श्लोक अजूनही काही लोक त्यांच्या नित्य पाठामध्ये म्हणतात. ह्यात जगातील सात चिरंजीवांची म्हणजेच जे अमर आहेत त्यांची नावे सांगितलेली आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्या पुराणांमध्ये अश्वत्थामा, दैत्यराज बलि, वेद व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम आणि मार्कण्डेय ऋषि ह्यांना चिरंजीव मानले गेले आहे.

ह्यापैकी एक अश्वत्थामा सोडल्यास बाकी सर्वांना वर म्हणून अमरत्व मिळाले आहे. पण कौरवांच्या सेनेचे नेतृत्व करणाऱ्या, कौरव पांडवांचे गुरु असणाऱ्या ऋषी द्रोणाचार्य ह्यांचा पुत्र असलेला अश्वत्थामा ह्याला चिरंजीवत्व म्हणजे वर नसून शाप मिळाला आहे.

 

ashwathama-marathipizza01

महाभारताच्या युद्धात महाभयंकर सर्वनाश झाला होता. अनेक कुळांचे अस्तित्वच ह्या पृथ्वीवरून नष्ट झाले होते. परंतु द्वापार युगात कुरुक्षेत्रावर झालेल्या महाभारत युद्धानंतर कौरवांचा शेवटचा सेनापती अश्वत्थामा हा अजूनही जिवंत आहे असे म्हणतात.

खरं तर वैज्ञानिक दृष्ट्या असे होणे अशक्य आहे आणि हे सिद्ध करायला कुठलाही पुरावा नाही. पण पायी नर्मदा परिक्रमा केलेल्यांना तो दिसला आहे किंवा आपल्या गाठीशी तेवढे पुण्य असेल तर तो आपल्याला दिसतो अशी लोकांची श्रद्धा आहे.

 

ashwathama-marathipizza02

हे ही वाचा – मोरांची गुरुदक्षिणा ते गूढ हिंदू अध्यात्म: कृष्णाच्या मोरपीसामागील रंजक कथा

काही लोकांनी त्याच्या पायांचे ठसे बघितल्याचा दावा केला आहे तर काही लोक तो कसा दिसतो, त्याची उंची किती आहे, त्याच्या कपाळावर कशी एक भळभळणारी जखम आहे आणि त्या जखमेवर लावायला तो कसं तेल मागतो हे वर्णन करून सांगतात.

हरियाणाच्या कुरुक्षेत्र या गावी किंवा काही तीर्थक्षेत्री तो दिसतो असेही काही लोक म्हणतात. तर मध्यप्रदेश च्या बुरहानपुर मध्ये असलेल्या किल्ल्यात काही लोकांना तो दिसला होता हा समजसुद्धा प्रचलित आहे.

आपले पिता द्रोणाचार्य ह्यांच्या वधाचा बदल घेण्यासाठी अश्वत्थामाने पांडवांवर नारायण अस्त्राचा प्रयोग केला. ह्या अस्त्रापुढे पांडवांच्या सेनेचे काही चालले नाही. युद्ध सुरु असताना एका रात्री तो पांडवांच्या सैन्यात शिरला आणि त्याने दृष्टद्युम्नाचा वध केला. पांडव सेनेतील शिखंडी, युद्धमन्यु आणि उत्तमौजस सह अनेकांना त्याने मारून टाकले.

पांडव झोपले आहेत असे समजून त्याने पाच झोपलेल्या व्यक्तीवर हल्ला केला आणि त्यांचा शिरच्छेद केला. पण ते पांडव नसून त्यांची म्हणजेच द्रौपदीची पाच मुले होती.

 

ashwathama-marathipizza03

 

अश्वत्थाम्याच्या ह्या कृत्याची प्रत्यक्ष दुर्योधनाने सुद्धा निंदा केली असे म्हणतात. हा हल्ला झाला तेव्हा पांडव व भगवान श्रीकृष्ण दुसरीकडे होते. त्यांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांच्या राजकुमारांच्या मृत्यूचे त्यांना भयंकर दु:ख झाले आणि अश्वत्थाम्याचा राग आला. त्यांनी त्याचा शोध घेऊन त्याच्यावर हल्ला केला असताना त्याने परत ब्रह्मशीर्ष अस्त्राचा प्रयोग केला. ह्याचे उत्तर म्हणून अर्जुनाने सुद्धा अश्वत्थाम्यावर ब्रह्मशीर्ष अस्त्र सोडले.

 

ashwathama-marathipizza04

 

पण ह्या दोन अस्त्रांची टक्कर झाल्यास पृथ्वी नष्ट होईल म्हणून वेद व्यासांनी आपल्या योगशाक्तीने त्यांची टक्कर होणे थांबवले व दोघांनाही हे अस्त्र मागे घेण्याविषयी आज्ञा केली. अर्जुनाने अस्त्र मागे घेतले. पण अश्वत्थाम्यास हे अस्त्र मागे घेता येत नव्हते. मग त्याला ते अस्त्र एखादा निर्मनुष्य ठिकाणी नेण्यास सांगण्यात आले.

पण द्वेषाने विवेक नष्ट झालेल्या अश्वत्थामाने पांडवांचा निर्वंश व्हावा म्हणून हे अस्त्र उत्तरेवर म्हणजेच अभिमन्यूच्या पत्नीवर सोडले. तेव्हा ती गर्भवती होती.

भगवान श्रीकृष्णाने तिचे व तिच्या गर्भातल्या पुत्राचे म्हणजेच परिक्षीताचे रक्षण केले व अश्वत्थाम्याला शाप दिला की,

तो मरणासाठी भीक मागेल पण त्याला कधीही मृत्यू येणार नाही. त्याच्या दुष्कर्मांची शिक्षा म्हणून त्याला कधीही मृत्यू येणार नाही व त्याच्या जखमा कायम त्याला त्याच्या कुकर्माची जाणीव करून देत राहतील. तो एकटाच वर्षानुवर्ष भटकत राहील.

 

ashwathama-marathipizza05

 

द्रौपदीने त्याला शाप दिला. त्याच्या डोक्यावरील मणी काढून घेऊन त्याची जखम अखंड भळभळत राहील असाही शाप दिला. तेव्हापासून ते आजातागायत अश्वत्थामा एकटाच जंगलात फिरतो आहे आणि आपल्या कर्मांचे फळ भोगतो आहे असे म्हणतात. इथपर्यंत तर बरेच लोक जाणतात. पण अश्वत्थाम्याविषयी काही गोष्टी अजूनही बऱ्याच लोकांना माहित नाहीत.

 

ashwathama-marathipizza06

 

१. बुरहानपुरच्या शिवमंदिरात आजही रोज ताजी फुले देवाला वाहिलेली सापडतात.

मध्यप्रदेशातील बुरहानपुरच्या जवळ असीरगढ येथे एक किल्ला आहे. त्या किल्ल्यात एक शिवचे मंदिर आहे. त्या मंदिरात जाणे अतिशय कठीण आहे तरीही तिथे रोज ताजी फुले वाहिलेली असतात असे म्हणतात.

 

ashwathama-marathipizza07

 

ह्याबद्दल एक घटना अशीही सांगितली जाते की,

मध्य प्रदेशातील एका गावात एक वैद्य राहतात. त्यांच्याकडे एकदा एक रुग्ण आला होता ज्याच्या शरीरातील जखमांतून रक्त वाहत होते. त्याच्या डोक्याला सुद्धा जखम होती. वैद्यांनी त्या माणसाचे परीक्षण केले आणि म्हटले की तुमच्या जखमा तर अनेक वर्षांपूर्वीच्या आहेत आणि बऱ्या होण्यासारख्या नाहीत. तुम्ही अश्वत्थामा आहात का? तर त्या रुग्णाने काहीच उत्तर दिले नाही. वैद्यांनी जेव्हा औषध देण्यासाठी पाठ फिरवली आणि नंतर परत त्या रुग्णाकडे बघितले असता तिथे कुणीही नव्हते.

असे म्हणतात की तो अश्वत्थामाच होता. पायलट बाबा सारख्या योग्यांनी पण सांगितले आहे की त्यांची अश्वत्थाम्याशी भेट झाली आहे आणि तो हिमालयाच्या पायथ्याशी राहतो.

२. द्रोणाचार्यांनी इतर शिष्यांपेक्षा अश्वत्थाम्याला जास्त विद्या देण्याचा प्रयत्न केला होता.

 

ashwathama-marathipizza08

 

जेव्हा गुरु द्रोणाचार्य पांडव व कौरवांना शिकवत होते तेव्हा त्यांचा एक नियम होता. त्या नियमाप्रमाणे द्रोणाचार्य ह्यांनी सर्व शिष्यांना पाणी भरण्यासाठी एक एक पात्र दिले होते. जो त्या पात्रात पाणी भरून आणेल त्याला ते गुप्त विद्या देत असत. ह्यापैकी स्वत:च्या पुत्रावर त्यांचे विशेष प्रेम होते आणि त्याला सर्वात जास्त विद्या मिळावी ह्यासाठी त्यांनी त्याला पाणी भरण्यासाठी छोटे पात्र दिले होते. त्यामुळे तो सर्वांपेक्षा आधीच पाणी घेऊन यायचा. तेवढ्या वेळात त्याला जास्त विद्या शिकण्यास मिळत असे.

ही बाब अर्जुनाच्या लक्षात आली. तेव्हापासून तो वरुणास्त्राचा प्रयोग करून स्वतःचे पात्र लवकर भरत असे आणि विद्या ग्रहणास अश्वत्थाम्याबरोबर बसत असे. म्हणूनच अश्वत्थामा आणि अर्जुन तोडीस तोड होते.

हे ही वाचा – कुरुक्षेत्रात पांडवांचा निर्णायक विजय होण्यामागची, कृष्णनीतीची अशी ही एक कथा!

३. त्याने नारायण अस्त्राचा प्रयोग पांडवांवर केला होता.

 

ash inmarathi

 

युद्धात जेव्हा दृष्ट्द्युम्नाने कपट करून गुरु द्रोणाचार्यांचा वध केला तेव्हा अश्वत्थामाला भयंकर क्रोध आला. त्याने पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पांडवांच्या सेनेवर नारायण अस्त्र सोडले. ह्या अस्त्रापुढे कोणाचे काहीही चालले नाही तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितले की, सर्वांनी आपापली शस्त्रे खाली ठेवून ह्या अस्त्राला शरण जा.

हे अस्त्र शांत करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. सर्वांनी तसे केल्याव नारायण अस्त्राचा प्रकोप शांत झाला व पांडवांचा जीव वाचला.

४. भगवान श्रीकृष्ण व अर्जुनावर आग्नेय अस्त्राचा परिणाम झाला नाही

 

ashwathama-marathipizza10

 

नारायण अस्त्र विफल झाल्यानंतर अश्वत्थामाने आग्नेय अस्त्राचा प्रयोग केला. ह्या महाभयंकर अस्त्राने पांडव सैन्याची अपरिमित हानी झाली. त्यांचे एक अक्षौहिणी सैन्य नष्ट झाले. ह्या अस्त्रामुळे हवा गरम झाली आणि सैन्यातले हत्ती सैरावैरा पळू लागले. तेव्हा अर्जुनाने ब्रह्मास्त्राचा प्रयोग करून वातावरण पूर्ववत केले.

परंतू ह्या अस्त्राचा भगवान श्रीकृष्ण व अर्जुनावर काहीही प्रभाव झाला नाही ह्याचे अश्वत्थामाला आश्चर्य वाटले. तेव्हा महर्षी वेद व्यासांनी तिथे येऊन अश्वत्थामाला सांगितले की भगवान श्रीकृष्ण व अर्जुन हे नर-नारायणाचा अवतार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही अस्त्राचा परिणाम होणार नाही.

 

५. अश्वत्थामाने भगवान श्रीकृष्णाकडे त्यांचे सुदर्शन चक्र मागितले होते.

 

ashwathama-marathipizza11

असे म्हणतात की, एकदा अश्वत्थामा द्वारकेला जाऊन भगवान श्रीकृष्णांना भेटला व त्यांना म्हणाला की, माझे अजेय ब्रह्मास्त्र घ्या व मला तुमचे सुदर्शन चक्र द्या. तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणाले की, माझ्या शस्त्रांपैकी तुला हवे ते शस्त्र उचल व घेऊन जा. त्या बदल्यात मला काहीही नको.

तेव्हा अश्वत्थामाने सुदर्शन चक्र उचलण्याचा प्रयत्न केला पण त्याच्याने ते तसूभर सुद्धा हलले नाही. ह्यामुळे अश्वत्थामाला लाज वाटली व तो निघून गेला.

 

६. अश्वत्थामा कौरवांचा अंतिम सेनापती होता.

 

ashwathama-marathipizza12

 

गदायुद्धात जेव्हा भीमाने दुर्योधनाच्या मांड्या फोडून त्याला मरणासन्न अवस्थेत सोडून दिले होते तेव्हा तिथे अश्वत्थामा, कृतवर्मा व कृपाचार्य आले. दुर्योधनाची ती अवस्था पाहून तो खूप क्रोधीत झाला व ह्याचा पांडवांकडून बदल घ्यायची त्याने प्रतिज्ञा केली आणि दुर्योधनाच्या आज्ञेने कृपाचार्यांनी अश्वत्थामाला सेनापती केले.

तेव्हा अश्वत्थामाने विचार केला की रात्री पांडव त्यांच्या शिबिरात आराम करत असतील तेव्हाच तिथे जाऊन झोपेतच त्यांचा वध करणे शक्य आहे. त्याचे हे बोलणे ऐकून कृपाचार्यांनी त्याला सांगितले की रात्री झोपलेल्या वीरावर हल्ला करणे नियामांच्या विरुद्ध आहे. पण अश्वत्थामाने त्याचे ऐकले नाही. शेवटी अश्वत्थामाच्या ह्या कटात कृतवर्मा आणि कृपाचार्य सुद्धा सामील झाले.

ह्यानंतर वर दिल्याप्रमाणे अश्वत्थामाने पांडवांच्या शिबिरावर हल्ला केला आणि दृष्ट्द्युम्नासकट पांडवांच्या पुत्रांनाही मारले. त्यानंतर ब्रह्मशीर्ष अस्त्र सोडून पांडवांनाही मारण्याचा प्रयत्न केला व नंतर उत्तरेवर सुद्धा अस्त्र सोडले.

 

ashwathama-marathipizza13

त्याच्या ह्या अधर्मासाठी भगवान श्रीकृष्णांनी त्याला शाप दिला की हजारो वर्ष तू पृथ्वीवर एकटाच भटकत राहशील. तुझ्या जखमा कधीही बऱ्या होणार नाहीत व तू कोणाशीही बोलू शकणार नाही. तेव्हापासून तो एकटाच रानावनात हिंडतो आहे. मृत्यूची आराधना करतो आहे पण त्याला मृत्यू सुद्धा त्याच्या कर्माचे फळ भोगण्यापासून मुक्त करू शकणार नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – श्रीकृष्णाची प्राणप्रिय द्वारका नगरी पाण्यात का बुडाली? वाचा ही रंजक कथा

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?