' रयतेच्या राजाचं स्वप्न भंगलं…एक तह झाला नि स्वराज्य दुभंगलं…! – InMarathi

रयतेच्या राजाचं स्वप्न भंगलं…एक तह झाला नि स्वराज्य दुभंगलं…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मुघलांविरूध्द शेवटच्या श्र्वासापर्यंत लढून स्वराज्य स्थापन करणार्‍या शिवाजी महारांच्या पश्चात्त हे स्वराज्य दीर्घकाळ त्यांचे वंशज एकसंध ठेवू शकले नाहीत हे मराठी स्वराज्याच्या इतिहासातलं कटू असलं तरीही वास्तव आहे.

शेवटी वेळ अशी आली की दोन गाद्या कराव्या लागल्या आणि त्यासाठी तहदेखिल करावा लागला. नंतर या दोन्ही गाद्यांनी आपापली प्रतिष्ठा जपत कारभार केला असला तरिही वारणेचा तह एकसंध स्वराज्याच्या दोन गाद्या करणारा ठरला.

जिथे सत्ता तिथे राजकारण आणि जिथे राजकारण तिथे दुही हा अटळ असा खेळ आहे. भल्या भल्या राज्यकर्त्यांना हा खेळ टाळता आला नाही. मराठी स्वराज्यही याला दुर्दैवानं अपवाद ठरलं नाही.

 

shivaji maharaj war inmarathi

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य छत्रपती संभाजी राजेंनी नऊ वर्षे राखले. त्यांच्या पश्चात झुल्फ़िकार खानानं रायगडाला वेढा दिला होता.

संपूर्ण राजपरिवार शत्रूच्या ताब्यात पडू नये यासाठी महाराणी येसूबाईसाहेबांनी स्वराज्याच्या हिताचा निर्णय घेतला आणि त्या बाल शहाजीराजांसोबत औरंगजेबाच्या कैदेत गेल्या. जाण्यापूर्वी त्यांनी राजाराम महाराज यांचे मंचकारोहन करून त्यांना सहपरिवार जिंजिला जाण्यास सांगितले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्यानुसार राजाराम महाराज महाराणी ताराराणी, अंबिकाबाई, राजसबाई प्रल्हाद निराजी आणि खंडो बल्लाळ यांच्यासमवेत जिंजिला गेले. जिंजिला जाणं सोपं नव्हतं.

 

varna inmarathi

हे ही वाचा – मुघलांच्या कचाट्यातून हे राज्य एकहाती वाचवणारा एक दुर्लक्षित योद्धा!

मुघल राजाराम महाराजांच्या मागावर होतेच. छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांनी प्राप्त परिस्थितीत धीरोदत्तपणे संकटांचा सामना करत राज्य राखले. १७०० साली छत्रपती राजाराम महाराज यांचेही निधन झाल्यावर पुढे आत वर्षे ताराराणी बाईसाहेबांनी औरंगजेबाशी झुंज दिली.

औरंगजेबाच्या मृत्युनंतर शाहू महाराज मुघलांच्या कैदेतून सुटले आणि स्वराज्यात परतले. कैदेतून सुटून आल्यावर त्यांनी स्वराज्याच्या गादीवर आपला हक्क सांगितला.

१७०७ साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या अझम नावाच्या पुत्रानं शाहूची सुटका केली आणि त्यांना राजपदाची वस्त्रे दिली. मात्र चौथाई आणि सरदेशमुखीसाठी त्यांना १७१३ पर्यंत वाट पहावी लागली. याचं कारण होतं अंतर्गत सत्ता संघर्ष.

१२ जानेवारी १७०८ रोजी विधीवत राज्याभिषेक करवून घेत त्यांनी मराठी स्वरायाचे अधिपती आपण असल्याचं जाहिर केलं. अष्टप्रधान मंडळ स्थापन करुन सातारा ही शाहूंची राजधानी बनली. अनेक गुणी आणि पराक्रमी माणसं पारखून निवडत त्यांनी राज्यविस्तार करायला सुरवातही केली.

 

varna 1 inmarathi

 

यात त्यांना बाळाजी विश्र्वनाथ,बाळाजी बाजीराव हे कर्तबगार पेशवे तसेच कान्होजी आंग्रे, तघुजी भोसले, दाभाडे, उदाजी चव्हाण यांच्यासारखे कर्तबगार, निष्ठावंत सरदार, सेवक लाभले.

दक्षिण हिंदुस्थानातील मुघल सुभेदार सय्यद हुसैन अली याच्याशी तह करून छत्रपती शाहूंनी दक्षिण मुलखावर चौथाई, सरदेशमुखीचे हक्क घेऊन त्याबदल्यात मराठ्यांनी बादशहास दहा लाख खंडणी द्यावी तसेच १५ हजाराची फौज बादशहाच्या दिमतीस ठेवावी. त्याचप्रमाणे शाहूंच्या मातुश्री आणि इतर स्वकियांची सुटका केली जावी, असे ठरले.

स्वराज्याची घडी बसविण्याचे प्रयत्न चाललेले असतानाच घरातला संघर्ष मात्र संपण्याची चिन्हं नव्हती. महाराराणी ताराबाईंनी स्थापन केलेली करवीरची गादी की सातार्‍याची शाहूंची गादी हा संघर्ष केवळ एका कुटुंबाचा सत्ता संघर्ष नव्हता तर तो संपूर्ण स्वराज्याच्या संघर्ष होता.

मोघलांच्या जबड्यातून एक एक किल्ला, सुपा लढून, रक्त सांडून छत्रपतींनी काबिज करत जे एकसंध स्वराज्य उभं केलं होतं ते दुहीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं होतं. करवीर गादीच्या संभाजीराजेंनी सातार्‍याच्या गादीविरूध्द निजामाच्या मदतीनं मोहिम उघडली. या दोन गाद्यांतला संघर्ष संपून एकच गादी रहावी आणि छत्रपतींचं एकसंध स्वराज्याचं स्वप्न जपावं यासाठी पेशव्यांनी खूप प्रयत्न केले.

 

Bajirao Peshwa InMarathi

 

शाहू महाराजांच्या खास मर्जीतले असलेले पेशवे या दोहोतला दुवा बनू पहात होते मात्र दोन्ही गाद्यांच्या अस्तित्वाचा हा संघर्ष असल्यानं पेशव्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. धन्याशी प्रामाणिकपणा हा वसा घेत पेशव्यांनी छत्रपतींना पूर्ण साथ दिली.

संभाजीराजेंनी उघडलेली ही मोहिम थोडीथोडकी नाही तर आठ दहा वर्षं चालली. अखेर दुसरा पेशवा आणि पहिला बाजीराव याने पालखेड युध्दात निजामाचा परावभव करून त्याच्याशी ६ मार्च १७२८ या दिवशी तह केला. मुंगी-शेगाव याठिकाणी झालेल्या या तहात छत्रपती शाहू महाराज हेच मराठ्यांचे एकमेव छत्रपती असून चौथ आणि सरदेशमुखीचे तेच खरे धनी आहेत हे निजामाकडून मान्य करवून घेतले.

निजामाचा पाडाव केल्यानंतर संभाजी आणि शाहू या दोन बंधूतही १३ एप्रिल १७३१ रोजी वारणेचा तह झाला. या तहानुसार वारणा नदीही दोन्ही राज्यांची सीमा म्हणून मान्य करण्यात आली. अनेक अटी शर्तींनी झालेल्या या तहामुळे अनेक वर्षं चाललेला सत्तासंघर्ष अखेर मिटला होता.

 

varna 3 inmarathi

 

छत्रपतींच्या गादीची दोन गाद्यात विभागणी होऊन सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्यांना मान्यता देण्यात आली. पुढे यातील काही अटी दोहोबाजूंनी पाळल्या तर काही अटींचं पालन झालं नाही.

सुरवातीचा कालखंड आपापल्या सत्ता केंद्रात दोन्ही गाद्यांनी घालविला असला तरीही नंतरही पुन्हा एकदा हा संघर्ष छत्रपती शाहू महाराजांच्या पश्चात उफाळून आला होता. ताराराणी बाईसाहेबांनी जवळपावससर्व सूत्रं हाती घेऊन सातारच्या गादीचे वंशज असणार्‍या राजाराम दुसरे यांना नामधारी बनवलं. मात्र तोवर मराठी मुलखाचं केंद्रस्थान पेशव्यांचं पुणे बनलं होतं.

 

lesser known places in pune inamrathi

हे ही वाचा – शाहु महाराज आणि टिळकांमधील ‘या’ वादानंतर ब्राह्मणेतर चळवळींची ठिणगी पडली…

वारणेचा तह इतिहासातलं महत्वाचं पान यासाठी आहे कारण, या तहानं छत्रपती शिवाजी महाराजांचं एकसंध स्वराज्य भौगोलिकदृष्ट्या विभागलं गेलं, मराठी साम्राज्याच्या क्षितीजावर पेशवे नावाची जरब उगवली जिनं छत्रपतींच्या जरीपटक्याचं पुढे अनेक पिढ्या चाकर म्हणूनच राहून रक्षण केलं. मराठ्यांच्या इतिहासाची कुस बदलणारा ठरलेला असा हा वारणेच तह.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?