' स्वामी दयानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर : हिंदुहित आणि इस्लाम चिकित्सेचे दोन अंग – InMarathi

स्वामी दयानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर : हिंदुहित आणि इस्लाम चिकित्सेचे दोन अंग

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – अभिराम दीक्षित

===

सावरकर स्वतःला दयानंदांचे मानसपुत्र म्हणत असत . स्वामी दयानंद सरस्वती हे पारंपारिक भारतीय शिक्षण आणि व्यवस्थेतून आले होते . सावरकर आधुनिक शिक्षण घेतलेले आणि मॅझिनी, मिल, स्पेन्सर या आधुनिक विचाराचा पगडा असलेले होते .

स्वातंत्र्य पूर्व काळी हिंदू समाजासमोर दोन आव्हाने होती .

१) हिंदूं समाजातला जातीभेद, विषमता, वाईट रूढी अंधश्रद्धा याने समाज खिळखिळा आणि अशक्त झाला होता .

२) मुसलमान अव्वाच्या सव्वा राजकीय हक्क मागत होते आणि नाही दिले तर इस्लामी दंगलीची भीती दाखवत होते .

हे दोन प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत असे दयानंद स्वामी आणि सावरकर या दोघांनाही वाटत होते आणि स्वतःच्या आकलनानुसार त्यांनी उत्तरे शोधली .

 

muslim sa inmarathi

हे ही वाचा – आदरणीय सावरकर, आम्हांस क्षमा करा…तुमचा सेक्युलॅरिझम समजू शकलो नाही!

स्वामीजी भारतीय पारंपारिक व्यवस्थेचे अपत्य असल्याने , त्यांचे उपाय म्हणजे वैदिक धर्माचा पुन्हा नव्याने आधुनिक अर्थ काढणे आणि इस्लाम धर्माची कठोर चिकित्सा करणे हे होते .

स्वामीजींनी स्वतःचे संस्कृत ज्ञान आणि वाद विवादातील जबरदस्त प्रतिभा वापरून वेदांचा नव्याने अर्थ लावला . स्वामीजींचा अर्थ पारंपारिक धर्माला अमान्य होता पण धर्माचाच नवा अर्थ लावणे हि पारंपारिक पद्धत वापरून —- स्त्री पुरुष समता , जाती भेदाला विरोध , बाल विवाहाला विरोध, अवनत मूर्तीपूजेला विरोध असे सर्व मुद्दे वेदातच असल्याचे प्रतिपादन केले .

स्वामीजींनी इस्लाम ची कठोर चिकित्सा करून तो खोटा असल्याचे आणि वाईट धर्म असल्याचे प्रतिपादन केले . ( सत्यार्थ प्रकाश १४ वा समुल्लास )

स्वामीजींना या कामी खूप यश मिळाले. चंद्रशेखर आझाद, लाला लाजपतराय, रामप्रसाद बिस्मिल असे क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानी आर्य समाजाचे होते . छत्रपती शाहू महाराजांसारख्या समाजसुधारकाने देखील आर्य समाजाची वाट चोखाळली .

सावरकर स्वामीजींना उत्तरकालीन, त्यांनी स्वामीजींचेच मुख्य काम पूढे चालवले. त्यांचे आधुनिक शिक्षण आणि आधुनिक विचार असल्याने सावरकरांची धर्म विषयक भूमिका अशी होती –

” सर्व धर्म ग्रंथ वंदनीय पूजनीय आदरणीय असतील… पण आज अनुकरणीय नाहीत. आचरणीय नाहीत “

ही आधुनिक समाज सुधारकांची भूमिका आहे. धर्मग्रंथात अस्पृश्यता आहे की  नाही ही  चर्चा सावरकरांना महत्वाची वाटत नव्हती, अस्पृश्यता जाणे महत्वाचे वाटत होते.

 

savarkar inmarathi

 

वेदात काहीही लिहिले असुद्या, स्मृती पुराणे काहीही सांगूद्या … आधुनिक विज्ञान निष्ठ विचारावर हिंदूंचे राष्ट्र उभे राहिले पाहिजे यावर सावरकरांचा भर होता.

“वेद जर पाच हजार वर्ष जुने ग्रंथ असतील तर ते पाच हजार वर्ष मागासलेले ग्रंथ आहेत. आजचा समाज कसा घडवायचा? ते आजचे अद्ययावत ज्ञान ठरवेल ” असे सावरकर म्हणत.

हा या दोघातला मुख्य फरक आहे. सर्व धर्माचे ग्रंथ हजारो वर्ष जुने आहेत. परिस्थिती आणि ज्ञान विज्ञान सतत बदलत रहाते, त्यामुळे :-

“जुन्या धर्माचा अर्थ काय याचा काथ्याकूट करत न बसता, नुसत्या धर्मचर्चा करत न बसता – हिंदूंनी अद्ययावत ज्ञान, विज्ञान आणि त्यायोगे मिळणारे बळ संपादावें” हा सावरकर विचार आहे.

सावरकर आणि दयानंद यांचे हेतू एकच असले तरी एकाची शैक्षणिक पार्श्वभूमी पारंपारिक भारतीय आणि दुसऱ्याची आधुनिक पाश्चात्य असल्याने साध्य जरी एकच असले तरी आकलनात आणि विचारात फरक आहे.

===

हे ही वाचा – स्वा. सावरकर आणि हेडगेवार-गोळवलकरांचा हिंदुत्व-विचार एकच : डॉ. श्रीरंग गोडबोले

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?