' मजूर म्हणून गेले आणि राज्यकर्ते झाले : भारताबाहेरचा असाही छोटा भारत! – InMarathi

मजूर म्हणून गेले आणि राज्यकर्ते झाले : भारताबाहेरचा असाही छोटा भारत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

जगात फारच मोजकी हिंदूराष्ट्रं आहेत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण सातासमुद्रापलिकडेही एक भारत आहे, ज्याचं नाव आहे सुरीनाम. या देशात खूप मोठ्या प्रमाणात हिंदूधर्मीय रहातात. इतिहास शेकडो वर्षांचा मात्र स्वातंत्र्याचं अवघं चाळीस वयोमान असणारा हा देश दक्षिण अमेरिकेत आहे.

भारताच्या पलिकडे मिनी इंडिया अर्थात भारताचं एक छोट रुप आहे हे आज अनेकांना ठाऊक नाही.

 

suirname inmarathi

 

मॉरिशस, त्रिनिनद, फ़िजी, गियाना आणि सूरीनाम यांना लघुभारत म्हणून ओळखलं जातं. सूरीनामोची राजधानी आहे, पारामारिबो. याचा अर्थ आहे फ़ुलांचे शहर. हे नाव भिल्लांकडून दिलं गेलं आहे, ज्यांची संस्कृती आणि परंपरा भारतीय आहे.

यामुळेच त्यांच्या भाषेत अनेक संस्कृत शब्दही आढळतात. सूरीनाममधे राहणारे भारतीय हे प्रामुख्यानं उत्तर भारतातून याठिकाणी कायमचे स्थलांतरीत झालेले असल्यानं सूरीनामोमधे मुख्यत्वये भोजपूरी आणि अवधी भाषा बोलल्या जातात.

याशिवाय या देशाची अधिकृत भाषा आहे, डच. यशिवाय इथे हिंदी, गुजराती, उर्दू, पंजाबी, बंगाली आणि मराठीही मोठ्या प्रमाणात बोलली जाते. हिंदी बोलीचे पाच प्रकार आहेत, पहाडी ,राजस्थानी, पश्चिम हिंदी, पूर्वेकडील हिंदी आणि बिहारी.

सर्व भाषांची एक वेगळीच अशी सरमिसळ झालेली दिसून येते या भाषेला,” सरनामी हिंदी” म्हणून ओळखलं जातं. याशिवाय पुरूषवर्ग आणि विशेषत: युवा वर्गात बोलली जाणारी भाषा आहे, सरनन टोंगो.

सुरीनाम हे दहा जिल्ह्यात विभागलं गेलेलं छोटसं गणराज्य आहे. भारताप्रमाणेच येथेही विविध जाती धर्माचे लोक रहातात. या देशातील एक चतुर्थांश जनता दिवसाकाठी दोन डॉलरहून कमी खर्चात जगते. याचं कारण आहे, मुळातच हे सगळे मजूर, कष्टकरी या वर्गातले आहेत.

१८७३ साली या ठिकाणच्या डच शासनानं ब्रिटनसोबत एक समझोता करार करून उत्तर प्रदेश आण बिहारमधून मोठ्या प्रमाणावर कामगार भरती केली होती. त्याचा परिणाम म्हणजे, या देशाची आजची ओळखच लघु भारत अशी बनली आहे.

 

suriname inmarathi

हे ही वाचा – एका देशात जेवायचं आणि दुसऱ्या देशात झोपायचं… अजब गावाची गजब गोष्ट…!

गुलाम प्रथा कायद्यानं नाहिशी झाल्यानंतर ब्रिटिश आणि डच यांची राजवट असणार्‍या मॉरिशस, गुयाना, जमैका, फ़िजी आदी डझनभर बेटांवर शेतीसाठी मजुरांचा तुटवडा जाणवू लागला. त्यावेळेस भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. त्यांनी भारतातून मोठ्या प्रमाणात मजूर भरती करत ती या बेटांवर पाठवली.

त्या काळात भारतात ब्रिटिशांचा जुलूम वाढला होता. जमिनदारांच्या जाचाला कंटाळूनही अनेकजण स्वत:हून सातासमुद्रापलिकडे नेणार्‍या जहाजांत जाऊन बसू लागले. त्याकाळात जागोजागी मजूर डेपो उभे केल गेले होते.

स्थानिक जमिनदार लोक गोरगरीब आणि कामगार वर्गाला गुरासारखं राबवून घेत असे कर्जांचे डोंगर पिढ्यान्पिढ्या संपत नसत. या सगळ्या त्रासातून सुटका करवून घ्यायला म्हणून मजूर वर्ग घरदार, कुटुंब, आपली माणसं यांच्यापासून दूर सातासमुद्रापलिकडे जात असे.

या मजुरांसोबत साधारणपणे पाच वर्षांचा करार केला गेला होता आणि त्यांना ऊस, कॉफी, कापसाच्या शेतांत मजुरीसाठी पाठवले जात असे. हे लोक अशिक्षित होते त्यामुळे कॉंट्रॅक्टचा उल्लेख ते गिरमिट असा करत. या कारणामुळेच त्यांना गिरमिटिया हे संबोधन प्राप्त झालं.

१९१७ मधे भारतातून अशा प्रकारे जहाजं भरभरून मजूर नेण्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि ही मजूर भरतीची प्रथा बंद झाली. पाच वर्षांचा करार संपल्यावरही हे मायदेशी परतू शकले नाहीत कारण प्रवासाला लागणारा पैसा त्यांच्याकडे नव्हता.

नाईलाजानं हे लोक तिथलेच रहिवासी बनले मात्र एक अख्खी पिढी डोळ्यात, एक ना एक दिवस मायदेशी परतण्याचं स्वप्न घेऊन गेली.

 

boat inmarathi

 

काहीजण परतले मात्र आपलं गाव, घर शोधू शकले नाहीत तर काही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत नशिबवानांना त्यांचं इथलं कुटुंब परत मिळालं.

आकडेवारी असं सांगते की, १८७३ मधे पाच वर्षांचा करार संपल्यानंतर भारतातून सुरीनाम येथे गेलेल्या चाळीस हजार मजुरांपैकी केवळ एक तृतियांश मजूरच परतले. यातीलही बरेचजण त्रिनिनाद, मॉरिशस, गियाना आदी देशांत गेले.

त्या काळात हे गिरमिटिया लोक रेल्वेनं कलकत्त्याला जात असत आणि तेथून सूरीनामच्या जहाजात बसत असत. गिरमिटिया मजुरांशी करार झाल्यानंतर त्यांना कलकत्त्याला एका लेबर डेपोत आणून दोन तीन आठवडे ठेवलं जात असे. त्यांच्या प्रवासासाठीच्या सगळ्या औपचारिकता पूर्ण करून जहाज येण्याची ते वाट बघत असत.

प्रवासाला निघताना घरून आणलेलं सगळं सामानसुमान त्यांना या डेपोतच ठेवावं लागायचं कारण ब्रिटिश स्वच्छतेच्याबाबतीत अत्यंत शिस्तीचे होते. जहाजावरची स्वछता सांभाळण्यासाठी म्हणून त्यांना त्यांच्या सामानाशिवाय जावं लागाचंय.

 

indian

 

हा समुद्री प्रवासही त्या काळात खडतर होता. दोन तीन महिने प्रवास केल्यानंतर सुरीनामला जाता यायचं. बरेचजण या प्रवासादरम्यान मरण पावत असत. अशांचे मृतदेह समुद्रात टाकून दिले जात असत.

हजारो जणांच्या भारतातल्या कुटुंबियांना दीर्घकाळ तर कधी कायमच याचा पत्ताही लागत नसे. आपला नवरा पाच वर्षांनी का होईना परत येईल या आशेवर अनेक गरीब बायाबापड्यांनी मरेपर्यंत वाट बघितली. ज्यांचे नवरे कधी सूरीनामला पोहोचूच शकले नव्हते. मात्र तिकडे जाणार्‍यांची संख्याही रोडावत नव्हती.

अशा लाखो भारतीयांना सुरीनामसाठी रेल्वेत बसताना बघून कोणा हळव्या कवीनं ‘रेलिया बैरन पिया को लिए जाए रे’ गाणं लिहिलं जे आजही सूरीनाममधे मोठ्या प्रमाणावर ऐकलं आणि गायलं जातं.

सूरीनाम येथील लोकप्रिय गायक राजमोहन ज्यांचे पणजोबा आणि पणजी आपल्या कुटुंब कबिल्यासहित सुरीनामला शेतात मजूरीसाठी म्हणून आले ते इकडचेच झाले. आज त्यांची तिसरी, चौथी पिढी याठिकाणी रहाते आहे.

राजमोहन आपल्या कार्यक्रमांत हे गाणं अगदी आवर्जून गातात आणि लोकांतून त्याची मागणीही होत असते.

१९७८ साली सूरीनाममधे भारतीय सांस्कृतिक केंद्राची स्थापना झाली. कथ्थक, योग, लोककला यांचं शिक्षण याठिकाणी दिलं जातं.

 

dance inmarathi

हे ही वाचा – अकबराची पूजा करणारे हे गाव परदेशातील पर्यटकांना इतके का आवडते, जाणून घ्या…

आज भारताचे सूरीनामसोबत आर्थिक सलोख्याचे संबंध आहेत. या देशात जी एकमेव नदी वहाते तिला श्रीराम म्हणून ओळखलं जातं. पाच लाख लोकसंख्या असणार्‍या या देशात बहुसंख्य भारतीय वंशाचे आहेत.

भारतासारख्या भाषांसह पोषाख, खाद्यपदार्थातील वैविध्य घरोघरी साजरे होणारे धार्मिक उत्सव, सण – समारंभ पाहिल्यानंतर आपण भारताबाहेर आहोत हे सांगूनही खरं वाटणार नाही.

 

surinam 1 inmarathi

 

इतकंच कशाला, तर भारताचं आणखी एक वैशिष्ठ्य असणारा कुंभमेळा सूरीनाममधेही आयोजित केला जातो.

 

suriname kumbh inmarathi

 

सुरिनाममध्ये भारतीय नागरिकांची संख्या अधिक असल्याने येथिल सेलिब्रिटी, खेळाडु यांसह राजाकारणात सक्रीय असलेल्या व्यक्ती या सर्व भारतीय वंशाच्याच आहेत.

भौगोलिकदृष्ट्या भारतात नसूनही भारताचंं हे छोटंसं रुप पाहण्याची संधी प्रत्येक भारतीयाला मिळाली तर कदाचित या दोन्ही देशांमध्ये अधिक जिव्हाळ्याचं आणि विकासाचं नातं तयार होऊ शकेल.

 

india surinam

 

भारताबाहेरील हा लहान भारत पाहण्याची संधी तुम्हाला मिळाली तर आवडेल का?

हे ही वाचा – या देशात पुरुषांना गुलामीच करावी लागते… जाणून घ्या या अजब देशाची गोष्ट!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?