' डाएटिंगचे विचित्र पाश्चात्य परिमाण : वाचा पचनशक्तीनुसार आयुर्वेदाचा मौलिक सल्ला – InMarathi

डाएटिंगचे विचित्र पाश्चात्य परिमाण : वाचा पचनशक्तीनुसार आयुर्वेदाचा मौलिक सल्ला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखिका : वैद्य तनुजा गोखले 

“मैद्याला नावे ठेवली जातात, पण त्यात डाळीइतकेच प्रोटिइन्स असतात” हे मी नाही द प्रिंट मध्ये छापून आलेल्या एका लेखात म्हटले आहे. (लेखाची लिंक)

आता काय करणार लोकहो? अजूनही प्रोटिन्सच्या नावाखाली भरपूर कडधान्यं, डाळी, उसळी, त्यांची पिठं, थालिपीठं यांचा भडिमार चालू ठेवणार? की मैद्याचे प्रमाण वाढवणार? हो म्हणजे आता मैद्याचे पदार्थ खाताना टोचणी लागणार नाही ना?

रोज यांची नवी संशोधने नी नवे नियम..

कडधान्ये आयुर्वेदानुसार कुधान्य म्हणजे नियमित खाऊ नयेत अशी आहेत. कडधान्यं पचण्यासाठी पचनशक्ती चांगलीच असावी लागते. कडधान्यं वातूळ, विष्टम्भ (मलावष्टंभ / दोष शरीरातून सहजगत्या बाहेर न पडू देणारी), आयुष्य कमी करणारी असतात असे आमचे ग्रंथ सांगतात.त्यांचे जडत्व कमी व्हावे म्हणून त्यांची टरफले काढून त्यांच्या डाळी करून खातात, तरी त्या पचायला जडच असतात, पण कडधान्यांच्या तुलनेत कमी उपद्रवी.

ही धान्य कोरडी व वातूळ असल्याने, त्यांच्यावर स्नेहसंस्कार करायलाच हवा, पण तेल/तूप/लोणी हे सर्व वजन वाढू नये म्हणून तुम्ही टाळणार असाल ना? मूग हे एकमेव कडधान्य पथ्यकर आहे पण म्हणून त्याचा अतिरेक नको.
काय पचतंय, झेपतंय ते बघून, नि वैद्यांना प्रकृती दाखवून काय नि कसे खावे / खाऊ नये याचा सल्ला घ्या.

 

dali inmarathi

हे ही वाचा – छोट्याशा घरातून सुरु झाली भारतातील सर्वात जुनी आणि मोठी आयुर्वेदिक औषध कंपनी!

मी शुद्ध आयुर्वेदाची अभ्यासक व चिकित्सक आहे त्यामुळे मी स्वतः कधीही कॅलरी, प्रोटिन्स, कार्ब्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांची माहिती असूनही या भाषेत कधीही रुग्णासल्ला / पदार्थांचे वर्णन करत नाही. कारण तो अशास्त्रीय आहे असं माझं स्पष्ट मत आहे.

अनेक वैद्यही या घटकांचा उल्लेख करून बोलतात, लिहितात, पण माझ्यामते ते आयुर्वेदाच्या पैठणीला ठिगळ लावण्याचे प्रकार आहेत. का ते या लेखावरून स्पष्ट होईलच.

maida inmarathi

माझे आक्षेप असण्याचे मुद्दे खालीलप्रमाणे –

१. Diet / nutritional chart म्हणजे पदार्थानुसार कोणत्या पदार्थांत काय घटक आहेत यांचे नुसते ठोकताळे असतात. आणि सब घोडे बारा टक्के असा प्रकार.

२. प्रत्येक धान्य/कडधान्य/फळं/भाज्या/दुग्धजन्य पदार्थ इ. यांच्या अनेक जाती-प्रजाती / प्रकार / स्रोत आहेत. त्यांच्यानुसार या value कमी जास्त व्हायला हव्यात हे साधं logic आहे, तरीही ते तसा उल्लेख करत नाहीत.

उदा. Fat असेल तर 9 कॅलरी(किंवा किलोकॅलरी! = होय! दोन्ही एकच म्हणे! इतका अशास्त्रीय मापनप्रकार तरी म्हणे हेच केवळ शास्त्र! नि इतर सगळी … असो.)तर कोणतेही तेल / तूप / लोणी तुम्ही वापरलंत तर ते सर्व समान ऊर्जा देतील हे शक्य नाही.
डालडा पचायला जड, अग्नि मंद करणारे आहे, तर साजूक तूप पचायला सोपे (प्रमाणात खाल्लेत तर हं!), अग्निदीपन करणारे आहे.

३. पुन्हा आपल्या भारतीय पाकशास्त्र व परंपरेनुसार एकाच पदार्थावर अनेक प्रक्रिया करता येतात नि त्यानुसार त्याचे गुणदोष कमी जास्त होतात.
उदा – तांदूळ.. त्याच्या असंख्य प्रजाती आहेत, अगदी लवकर पचणाऱ्या साठीसाळीपासून ते बासमतीपासून ते आंबेमोहोर-इंद्रायणी इ. ज्यासाठी जास्त पाणी लागतं, भात चिकट होतो, असा भात मधुमेहींना त्रासदायक असतो.तांदूळ जुना झाला की पथ्यकर होतो. भाजला की हलका होतो.म्हणूनच साळीच्या लाह्या पथ्यतम आहेत. पण हेच उकडलेल्या भाताचे चूरमुरे पथ्यकर नाहीत.

आता सांगा – इथे तुम्ही सर्व जाती व संस्कार यांना एकच कॅलरी व घटकांचा नियम लावणार का?

या उलट आयुर्वेदानुसार वर्णन केलेले जे गुणदोष आहेत, ते त्या पदार्थाच्या प्रत्येक धान्यात आहेत, त्यांच्या संस्कारानुसार, जातीनुसार बदलतात.
भाजणे, उकडणे इतकेच नव्हे तर नवे जुने, साठवायची पद्धत, कोणत्या भूमीत, हवामानात, ऋतूत उत्पन्न झाले आहे, त्याला खतं / रसायनं वापरली कि नाही? इ. अनेकोनेक घटकांचा व संस्कारांचा विचार त्यानुसार आहारमूल्य ठरवले जायला हवे.

भारतीय आहारशास्त्र हे या सर्व गोष्टींचा विचार करून, प्रयोग करून, वारंवार तपासून मग तयार झालेले आयुर्वेद शास्त्रावर आधारीत आहे.

४. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दाज्या शरीरात हे पदार्थ जातील त्या शरीरात त्याचे पचन कसे होईल, त्यातून गुण दोष किती निघतील म्हणजे त्या शरीराला फायदे-तोटे कसे होतील याचा विचार फार महत्त्वाचा आहे. सरसकट कृश-स्थूल-मध्यम शरीरयष्टी बघून / कामकरी की बैठे काम हे बघून कॅलरी चार्ट design करणे म्हणजे अर्धवट प्रयत्न आहे.

आता राजमा, गहू, मोठा ग्लास भरून लस्सी इ. हे जसा पंजाबी हरियाणवी, हिमाचली माणसाला पचेल तसा तो दक्षिणेकडे राहणाऱ्या माणसाला पचेल का?

आयुर्वेदानुसार पचनशक्ती / अग्नि :- मंद – तीक्ष्ण – विषम, कोष्ठ :- क्रूर- मृदू- मध्यम आहे का?

vaat inmarathi

प्रकृती :- वातज, पित्तज, कफज, द्विदोषज, त्रिदोषज, वय, स्त्री-पुरुष, देश- पाणथळ/किनारपट्टीलगत / वाळवंटी रूक्ष / साधारण, काल / ऋतू, सध्याच्या तब्येतीच्या तक्रारी, आनुवंशिक आजार (जे टाळता येऊही शकतात योग्य काळजी घेतली तर), घरातील खाण्याच्या पद्धती (उदा. सर्व सहा चवींचे पदार्थ / मिठाचे / मसाल्यांचे/ तेलाचे प्रमाण, पदार्थ करायच्या पद्धती, शिळे / बाहेरचे / विकतचे पदार्थ इ. इ. तसेच खाण्याच्या बारीकसारीक सवयी, व्यवसाय/नोकरीचे स्वरूप जसे की जागरण / आगीजवळ / पाण्याजवळ काम, जेवतानाची मनःस्थिती, एरवीचे ताण-तणाव इ. इ.)

या सर्वांचा विचार करून वैद्याने आहार व विहाराचे (दिनक्रम- ऋतुचर्या) पथ्यापथ्य सांगून ते सुधारणे नि लागेल तेव्हा, तसे अवस्थेनुसार औषध देणे अपेक्षित आहे.

थोडक्यात हे सल्ले केवळ सरसकट तक्ते स्वरूपात न देता, personalized – व्यक्तीसापेक्ष देणे अपेक्षित आहे.
प्रोटीन्स जास्त जावीत म्हणून घरातील सरसकट सर्वांना उदा. सोयाबीन/ मोडवलेली कडधान्ये / पनीर / अंडी इ. इ. खायला घालणे हेही असेच अशास्त्रीय आहे कारण प्रत्येकाची त्यापदार्थाबद्दलची प्रतिक्रिया वेगवेगळी असू शकतेच / असतेच.

६. हल्ली प्रोटीन सप्लिमेंट्सचे खूळ इतके आहे की त्यासाठी हजारो रुपये मोजून पावडरींचे डबे आणले जातात. त्यात नक्की किती सत्त्व आहे आणि किती fillers/अनावश्यक/त्रासदायक रासायनिक घटक आहेत हे बघाच एकदा.

७. प्रोटीन्सच्या अतिरेकाने किडनीवर वाईट परिणाम होतात हे लक्षात असू द्या.

८. आहारात प्रोटिन्सचे प्रमाण किती हवे याचा तक्ता बघाल तर हे इतके धान्य-कडधान्य खाणे शक्य नाही. उदा. वजनाच्या दुप्पट प्रोटिन्स म्हणजे वय ५० वर्षे असेल तर ४५ ग्रॅम प्रोटीन (म्हणजे दिवसाला ४०० ग्राम डाळ! (यातही मतभेद आहेत) खाल्ली पाहिजे पण तेवढे कोणीच खाऊ शकत नाही, म्हणून मागल्या दाराने पावडरींचा शिरकाव. त्यातून नक्की तेवढेच प्रोटीन मिळते का हा संशोधनाचा विषय आहे.
बरं, वय वाढेल तसे प्रोटिन्स जास्त घ्यायचे का दुप्पट खाण्यासाठी?

प्रत्यक्षात तर वय वाढेल तसे विशेषतः पन्नाशीनंतर शरीरात रुक्षता वाढते, केस त्वचा कोरडे पडतात, कडधान्य वातूळ होतातच म्हणजे हाही नियम तकलादूच की.

९. आपण पदार्थ खातो ते उदा. पोळी, भात, इ. त्यातून निव्वळ प्रोटीन्स वेगळे काढतो, कार्ब्स वेगळे काढतो, इतर vitamins minerals वेगवेगळे करून खातो कि तो पदार्थ एकसंध खातो? शरीर तो पूर्ण पदार्थ पचवते, मग त्यातून नेमके तेवढेच प्रोटिन्स प्रत्येकाला तेवढ्याच प्रमाणात मिळतील का? प्रत्येकाची पचनशक्ती वेगवेगळी असते.

हे ही वाचा – तारुण्य व आरोग्य टिकवण्याचा रामबाण उपाय आयुर्वेदाने कित्येक शतकांपूर्वीच देऊन ठेवलाय!

 

aaurved 1 inmarathi

 

इथे सर्व इंधन, वेग, tyre मधील pressure, रस्ता, इ. variables constant ठेवले तरी दोन गाड्यांचे average सारखेच असेल असे सांगता येत नाही. शरीर ही तर इंजिनापेक्षा complex जडणघडण व प्रक्रिया असणारा जिवंत विचार आहे. तिथे सब घोडे बारा टक्के तत्त्व कसे लावता येईल?

खुलासा- ही माझ्या व्यवसायाची जाहिरात नाही, पण मी स्वतः असे सर्व जाणून घेऊन, परीक्षण करून मगच सर्व चांगले वाईट काय हे त्यामागचे शास्त्र समजावून देऊन मग गरज असल्यास औषध हे सूत्र अवलंबते. माझे रुग्ण त्यांच्या पिढ्यानपिढ्या सुदृढ राहाव्यात, औषधांवर कमीत कमी अवलंबून असावे असे मला वाटते नि तसे दिसतेही.

तर तात्पर्य काय? अति तेथे (आयुष्याची) माती.
नुसत्या आकडेवारीवर लक्ष देऊन फसू नका – त्यातील गमक – सार जाणून घ्या.

तसेही statistics नुसार कोणतेही निष्कर्ष हे अगदी चूक पासून अगदी बरोबरपर्यंत फिरवता येऊ शकतात आणि अन्नधान्य उत्पादक कंपन्या, औषधी कंपन्या हे सर्रास करतात हे लक्षात असू द्या. या शास्त्रांचे नियम / निर्देशही बदलत असतात – उदा. कोलेस्टेरॉल, खोबरेल तेल, रिफाईंड तेल, सफरचंद, ओट्स, नि अनेक यांव नि त्यांव पदार्थांचे बदलते निकष व सल्ले.

aaurved old inmarathi

 

यानुसार सोबतची बातमीही उद्या खोटी ठरू शकते पण आयुर्वेदानुसार सर्व नियम हे कालानुरूप सत्य ठरले आहेत.
अगदी रामायण-महाभारत काळीही आयुर्वेद होताच, आजही आहे नि उद्याही राहील कारण पदार्थ बदलले, शरीर बदलले तरी तत्त्व शाश्वत आहेत जे आजही ग्रंथांत दिल्याप्रमाणे काम करताना दिसतात. पण म्हणजे ग्रंथात दिलेलं असलं की वैद्य फक्त तेवढ्यावरच सल्ले देतात का? तर नाही.

या तत्त्वांचे सध्याच्या बदलत्या परिस्थितीत application प्रत्यक्षात कसे फायदा देणारे, तोटे कमी करणारे असेल याचा पूर्ण विचार वैद्याने करायचा असतो.
उदा. गायीचे दूध, साजूक तूपच घ्यावे हे बरोबर पण सध्या मिळणारे जर्सी गायी(?!)चे दूध-तूप हे ग्रंथात दिलेल्या गुणधर्मानुसार काम करत नाहीत त्यामुळे हे लक्षात घेऊन त्यानुसार पदार्थाचे प्रमाण, घ्यावे की टाळावे, संस्कार काय करावेत इ. वैद्यच सांगू शकतो.

म्हणूनच आपल्या आयुर्वेद तज्ञांचा सल्ला घ्या नि पाळा, बस इतकंच..

हे ही वाचा – झोप येत नाहीये? या आणि इतर ७ त्रासांवर आयुर्वेदातला हा “खास” उपाय करून बघा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?