' पत्रकार प्रसन्न जोशींनी रंगवलेला “पुरोगामी-प्रतिगामी” खेळ…! – InMarathi

पत्रकार प्रसन्न जोशींनी रंगवलेला “पुरोगामी-प्रतिगामी” खेळ…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एबीपी माझाचे पत्रकार प्रसन्न जोशी कुणाला माहीत नाहीत. “सावरकर नायक की खलनायक” असो किंवा नुकतीच केलेली गांधीजींवरची पोस्ट असो, प्रसन्न हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि त्यांच्या विचारधारेमुळे कायम चर्चेत असतात.

पण सध्या त्यांचीच एक जुनी पोस्ट फेसबुकवर प्रचंड व्हायरल झाली आहे. ही २०१३ सालची पोस्ट असून, त्यावर लोकांनी प्रसन्न यांना पुन्हा ट्रोल करायला सुरुवात केली आहे. पाहूया तर नेमकी काय आहे ही पोस्ट!

 

prasanna-joshi-inmarathi

===

चला खेळूया पुरोगामी-प्रतिगामी…

(खेळाचे थम्ब रूल्स: या खेळात राष्ट्रीय पातळीला सर्व हिंदू प्रतिगामी आहेत, जातीय पातळीला सर्व सवर्ण प्रतिगामी आहेत (सवर्ण प्रतिगामी असले तरी ब्राह्मणेतर सवर्ण हे बामनीकरणामुळे प्रतिगामी झाले असून त्यांना पुरोगामी होण्याचा मार्ग सदैव खुला असेल), आर्थिक पातळीला सर्व मध्यमवर्ग व श्रीमंत प्रतिगामी आहेत.

लिंग पातळीला सर्व पुरूष प्रतिगामी आहेत. हे थम्ब रूल्स मान्य असल्यास पुरोगामी आणि प्रतिगामी छावण्यांमध्ये एकमेकांना ढकलायचा हा खेळ आहे. पण खरा खेळ हा मुळात आपलीच छावणी ती फक्त पुरोगामी ठरवण्याचा आहे.)

नुसती विधानं पाहून कुणाला प्रतिगामी ठरवावं?

विधान-१ एस.सी, एस.टी, ओबीसी यांच्यात भ्रष्टाचाराचं प्रमाण अधिक- आशिष नंदी (हे वाक्य नंदी यांचं याबाबतचं पूर्ण म्हणणं लक्षात न घेता तेवढंच दिलय)

तात्पर्य- नंदी हे आता मरेपर्यंत मनुवादी, प्रतिगामी, ब्राह्मण्यवादी झालेत. (बाय द वे नंदी ख्रिश्चन आहेत. असेनात का? मूळचे असतील कदाचित ब्राह्मण!)

विधान-२ ब्राह्मण, बनिया, ठाकूर चोर, बाकी सारे डी एस फोर- कांशिराम (ही त्यांची अत्यंत स्पष्ट, कधीही न बदललेली घोषणा व आयडियोलॉजी होती) \

तात्पर्य- ते काहीही बोलले असले तरी त्यांची पार्श्वभूमी पाहा, जात पाहा, कार्य पाहा…ते पुरोगामीच आहेत

आजच्या ‘एबीपी माझा विशेष’च्या चर्चेत नंदी प्रकरणाच्या संदर्भानं ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांना कांशिराम यांच्या विधानाबाबत विचारलं. ते म्हणाले की कांशिराम ज्या समाजातून आले त्यानं या व्यवस्थेचा अन्याय बघितला होता. म्हणून मला त्याच्या म्हणण्यात काही चूक वाटत नाही.

जयदेव डोळे यांना आता हे सांगावं का की, ज्या आंबेडकरांचं नाव कांशिराम यांनी सदैव घेतलं त्या आंबेडकरांनी कधी अशी शत्रूत्वाची भाषा वापरली नाही, ती भाषा केवळ अमुक एका जातीतून आलेल्या कांशिराम यांनी वापरली तर त्यात चूक दाखवून द्यायची नाही?

आणि याहीपेक्षा घाणेरड्या भाषेत ज्यांनी संपूर्ण त्रैवर्ण्याला (ज्यात जन्माला येणं ही या समाजाची चूक नाही तर अपघात आहे) (तिलक, तलवार, तराजू) चोर आणि जुते मारण्याजोगंच ठरवलं त्यांना प्रतिगामी नाही पण किमान चुकीचंही म्हणायचं नाही?

दुसरीकडे नरके सरांनी नंदी यांना थेट उच्चवर्णिय मानसिकतेचे (यामागोमाग मनुवादी, जातीयवादी आणि शेवटी…..प्रतिगामी (आपला खेळ लक्षात ठेवा) ठरवून टाकलं! तरी बरं की नरके स्वत:च सध्या काही संघटनांकडून (या संघटना पुरोगामी आहेत-संदर्भ वर दिलेले खेळाचे थम्ब रूल्स) प्रतिगामी छावणीत सामील झाल्याचा आरोप झेलतायत.

नरके सरांचे आक्षेप महत्त्वाचे होतेच पण त्यांची आक्रमकता इतकी होती की, नंदी यांनी सहेतूकच आरोप केले असाच समज व्हावा. नरके सरांना मानणारा सर्व जाती-धर्मातील एक मोठा वर्ग आहे. त्यांना साहजिकच नरकेंच्या बोलण्यावरून नंदी खलनायक वाटणार नाही काय?

===

हे हे वाचागिरीश कुबेरांचं चौर्य-कर्म आणि प्रस्थापित माध्यमांनी पाळलेला गुन्हेगारी विश्वातील “ओमर्टा”

===

राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक सुहास पळशीकरांवरदेखील असाच प्रतिगामी असण्याचा आरोप आंबेडकरांवरील व्यंगचित्रावेळी झाला. त्यांच्यावर हल्लादेखील झाला. पळशीकरांवर निळी शाई फेकण्यात आली.

 

suhas palshikar inmarathi

 

पळशीकरांनी त्यावर “निळा रंग हा आंबेकरी चळवळीचा रंग असल्यानं तो मी भूषणावह मानतो”, अशा आशयाचं विधान केलं (या नात्यानं उद्या कुणी चॉपरचे वार केल्यास रक्ताचा लाल रंग कम्युनिस्टांचा…कित्ती छान! मग काय तिरंग्यावरील भगवा हिंदू-प्रतिगाम्यांचाच ठरेल!).

पुरोगामीपणा जपण्याची किती ही धडपड? काय चाललंय हे सभोवताली? इतक्या सहजपणे कुणी पुरोगामी-प्रतिगामी ठरतो? वस्तुत: योगेंद्र यादव यांच्यासारख्या मान्यवर विश्लेषकानं नंदी यांच्या म्हणण्याविषयी आपलं मत आणि नंदीच्या बोलण्याचा अन्वयार्थ आजच्या ‘एक्सप्रेस’मध्ये लेखाद्वारे मांडलाय.

नंदींच्या ‘त्या’ विधानाचा अर्थ लावण्याचा अधिकार आपल्याला आहेच पण त्यांना जास्त नाही का? मला वैयक्तिक पातळीवर एक विधान म्हणून ते खचितच आक्षेपार्ह आणि निषेधार्ह वाटतं. त्याचा प्रतिवाद करता येईल. पण, नंदी यांच्याविरूद्ध थेट अॅट्रोसिटी दाखल करण्याचं टोक गाठायला हवं होतं का?

===

हे ही वाचाआंबेडकरांनी विठ्ठल हाती घेतल्याचं हिंदुत्ववाद्यांना दुःख का? प्रसन्न जोशी यांचा सवाल वाचा!

===

याचा पुनर्विचार मला आवश्यक वाटतो. आधीच आपल्या देशात निकोप, निरोगी चर्चेचा अवकाश आक्रसत चाललाय. त्यात हे प्रकार वाढले तर सामाजिक विषयांच्याबाबतीत चर्चा करायची झाल्यास मी वर मांडलेले थम्ब रूल्स खरंच प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही.

ता. क. कमल हासनच्या ‘विश्वरूपम्’ या सिनेमाला काही मुस्लिम संघटनांनी आक्षेप घेतलाय. शिवसेनेने मात्र पाठिंबा दर्शवलाय. यापुढे संजय राऊत तर म्हणतायत की, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे (बापरे! हे म्हणजे उद्या दिल्ली गँगरेपवाले स्त्री दाक्षिण्यावरही बोलतील तसं झालं.) पण त्यांच्या एका मुद्यात पॉईंट आहे. ‘माय नेम इज खान’च्या वेळी सेनेवर टीका करणारे आता ‘विश्वरूपम’साठी पुढे का येत नाहीत?

 

my name is khan inmarathi

 

जाता जाता: या लेखामुळे मी मनुवादी (म्हणूनच) जातीयवादी (म्हणूनच) ब्राह्मण्यवादी (म्हणूनच) ….प्र ति गा मी वाटत असेन तर ते खरंय (संदर्भ: पाहा वरचे थम्ब रूल्स!)

ही पोस्ट फेसबुक वर तुम्ही इथे वाचू शकता!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?