' ८३ वर्षाच्या साधुने राम मंदिर निर्माणासाठी केलेली ही मदत थक्क करणारी आहे! – InMarathi

८३ वर्षाच्या साधुने राम मंदिर निर्माणासाठी केलेली ही मदत थक्क करणारी आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राम जन्मभूमी हा विषय गेले कित्येक महिने सगळ्यांच्या तोंडी आहे. कोरोना महामारीच्या भयाण संकटातसुद्धा आपल्या पंतप्रधानांनी अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी भव्य भूमिपूजन सोहळा पार पाडला होता.

सारा देश तेंव्हा “जय श्रीराम”च्या जयघोषात दुमदुमत होता. आपणही तो सोहोळा टेलिव्हिजनवरुन लाईव्ह अनुभवला असेल.

 

narendra modi inmarathi

 

गेल्या महिन्यापासून राम मंदिर निर्माण हा मुद्दा आणखीन चर्चेत आला आहे, पण तो एका वेगळ्याच कारणामुळे! राम मंदिर निर्माणासाठी सामान्य जनतेकडूनसुद्धा देणग्या घेतल्या जात आहेत.

यात कुणावरच कसलीच जबरदस्ती केलेली नाही. पण सरकारने आणि न्यासा या संस्थेने या भव्य मंदिराच्या निर्माणासाठी सामान्य लोकांना आवाहन केले आहे की त्यांनी सुद्धा या पवित्र कार्यात स्वतःचे योगदान द्यावे.

यावरून मीडिया तसेच सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा किंवा वाद होताना आपल्याला दिसत आहेत! काही लोकांचं म्हणणं असं आहे, की एवढ्या मोठ्या मंदिरासाठी सरकार लोकांकडे का पैसे मागत आहे?

 

तर काही लोकांच्या मते हा त्यांच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे राम मंदिर हे संस्कृतिचे प्रतीक असल्याने त्यासाठी जेवढी मदत होईल तेवढी करणं असा एक मतप्रवाहदेखील पाहायला मिळतो आहे!

अयोध्येतील राम मंदिर उभारणीला जगभरातून मदतीचे हात येत आहेत. ऋषिकेशमधील एका साधुबाबांनी तर राम मंदिर उभारणीसाठी थोडी थोडकी नाही तर तब्बल एक कोटी रूपयांची देणगी देऊन सर्वांना चकीत केलं आहे.

 

swami shankardas inmarathi

 

कोण आहेत हे साधुबाबा? आणि यांच्याकडे इतकी मोठी रक्कम आली कुठून? जाणून घेऊया –

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टद्वारे राम मंदिर उभारणीत प्रत्येकजण जमेल तितकी देणगी देऊन हातभार लावत आहे. या पाश्र्वभूमीवर ऋषीकेश येथे गुहेत वास्तव्य असणार्‍या संत स्वामी शंकर दास यांनी अलिकडे एक कोटी रूपये दान करून भल्याभल्यांना चकीत केले.

त्यांच्या या देणगीमुळे ते बातमीचा आणि चर्चेचा विषय बनले. गेली साठ वर्षं संत स्वामी शंकरदास हे गुहेत वास्तव्य करून आहेत. ऋषिकेश येतील निलकंठ मार्गावरील एका गुहेत ते सहा दशकं वास्तव्य करत आहेत.

यमकेश्र्वर प्रखंडातील मणीकूट पर्वताच्या पायथ्याशी असणार्‍या पौराणिक नीलकंठ महादेव मंदिरात जाणार्‍या श्रध्दाळू भक्तांना टाट वाले बाबा हे नाव चांगलंच परिचयाचं आहे.

या मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या निवास आणि भोजनाची सोय वर्षानुवर्ष या ठिकाणी केली जाते. या टाटवाला बांबांचे शिष्य असणार्‍या स्वामी शंकर दास महाराज ज्यांना स्थानिक लोक फ़क्कड बाबा म्हणूनही ओळखतात.

यांनी राम मंदिर उभारणीसाठी गुप्त दान देण्याचं ठरवलं होतं मात्र ही मोठी रक्कम कदाचित इतरांसाठी प्रेरणा ठरू शकेल या विचारानं त्यांनी ही कल्पना रद्द केली.

इतकी मोठी रकम त्यांच्याकडे कुठून आली याचं उत्तर त्यांनी दिलं, गेली अनेक वर्षं भाविक जी रक्कम दान करत असत त्यातील काही भाग ते राम मंदिर उभारणीसाठी बाजूला काढून ठेवत होते.

मागील आठवड्यात स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी चकीत झाले. याचं कारण होतं, एक कोटी रकमेचा चेक घेऊन बँकेत पोहोचलेले शंकरदास. आधी तर बँक कर्मचार्‍यांचाही यावर विश्र्वास बसला नाही.

 

swami shankar das inmarathi

एका साधुच्या खात्यावर इतकी रक्कम असणं अशक्य वाटल्यानं बँक अधिकार्‍यांनी खात्याची पडताळणी केली असता खात्यावर एक करोडहून अधिक रक्कम असल्याचं  समजलं आणि धनादेशही बरोबर असल्याची खातरजमा झाली.

यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकार्‍यांना बँकेत बोलावून बाकी प्रक्रिया पूर्ण केली गेली.

ऋषिकेश येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख सुदामा सिंघल बँकेत पोहोचले आणि त्यांनी पुढील प्रक्रिया पार पाडण्यास मदत केली.

साधू थेट दान स्वरूपात देणगी देऊ शकत नसल्यानं हा धनादेश आधी प्रमुखांच्या हवाली करण्यात आला आणि आता बँक मॅनेजर ट्र्स्टच्या खात्यात हा धनादेश जमा करतील.

८३ वर्षांचे वयोवृध्द संत स्वामी शंकरदास यांचे गुरू महर्षी महेश योगी, विश्र्व गुरू महामंडेलेश्र्वर ब्रह्मकालिन संत स्वामी मुनीषनंद महाराज, मस्तरामबाबा यांचे समकालिन होते.

शंकरदासस्वामी यांनी गेल्या चाळीस वर्षांपासून सर्व सुखसोयी आणि सुविधांचा त्याग केलेला आहे. गेली साठ वर्षं ते राम मंदिर उभारणीसाठी निधी गोळा करत आहेत. योग्य वेळ साधत त्यांनी हा निधी सुपूर्त केला आहे.

हा धनादेश सुपूर्द करताना त्यांनी सांगितलं की आज माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. राम मंदिर उभारणीला मदत करण्याचं स्वप्न पूर्ण झालं.

राम मंदिर उभारणी हे दोन पिढ्यांनी बघितलेलं स्वप्न आता अखेरीस पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना जगभरातून येणारा आर्थिक मदतीचा रोख थक्क करणारा आहे.

 

ram mandir inmarathi

 

अयोध्येतील बहुचर्चित राम मंदिर नेमकं कोणी उभारलं माहित आहे? पौराणिक कथांनुसार असं सांगितलं जातं की, प्रभुरामचंद्रांनी जलसमाधी घेतल्यानंतर हळूहळू अयोध्या नगरी उजाड बनू लागली.

मात्र राम जन्मभूमी असलेला महाल मात्र तसाच उभा होता. प्रभुरामचंद्रांचा पूत्र कुश यानं पुन्हा अयोध्या निर्माणाचं कार्य हाती घेतलं. यानंतर सूर्यवंशी राजघराण्याच्या ४४ पिढ्यांनी या ठिकाणी राज्य केल्याचं सांगितलं जातं.

अखेरचे सूर्यवंशीय शासक होते महाराज बृहव्दल. यांच्या शासनकालापर्यंत रामजन्मभूमीची देखभाल केली जात होती.

महाभारतातील प्रसिध्द कुरूक्षेत्र युध्दादरम्यान महाराज बृहव्दल यांचा मृत्यू अभिमन्यूच्या हातून झाला. त्यांच्या पश्चात राममंदिराची देखभाल पूर्वीसारखीच चालू राहिली मात्र हळूहळू पुन्हा एकदा अयोध्या नगरी उजाड बनत गेली. त्यानंतर राजा विक्रमादित्यानं राम मंदिराचं पुन:निर्माण केलं.

अयोध्येचं रूपांतर हळूहळू जंगलात झालं होतं. नगर नष्ट होऊन ती जागा रानावनानं घेतली होती.

भटकंती करत करत एक दिवस राजा विक्रमादित्य शरयू नदी तिरी एका वृक्षाखाली बसला असता त्याला काही साक्षात्कार झाले. त्यानंतर राजा विक्रमादित्यानं शोधकाम सुरू केल्यानंतर राममंदिराचा शोध लागला.

 

raja vikramaditya inmarathi

 

राजा विक्रमादित्यानं या ठिकाणी भव्य राममंदिराची उभारणी केली. त्यानंतर अनेक शासकांनी याठिकाणी राज्य करत राममंदिराची देखभाल केली.

शुंग वंशांचे प्रथम शासक पुष्यमित्र यांनी विक्रमादित्यानं बांधलेल्या मंदिराचा जीर्णॊध्दार केला. यावेळेस सापडलेल्या शिलालेखानुसार अयोध्या ही गुप्तवंशीय द्वितिय चंद्रगुप्त याची राजधानी होती.

याच कालखंडातील कालीदास यानं अयोध्येच्या राममंदिराचा उल्लेख अनेकवेळा केलेला आहे.

पानीपत युध्दादरम्यान राजा जयचंद यांचा मृत्यू झाला. यानंतर अनेक परकिय आक्रमणांनी विशेषत: मुघलांनी अयोध्येवर आक्रमण केलं. केवळ अयोध्याच नव्हे तर काशी, मथुरा ही हिंदुंची धर्मस्थळं उध्वस्त केली.

मंदिरं जमिनदोस्त करत तिथल्या पुजार्‍यांना, भाविकांना मारून टाकत मंदिरांचा अवशेष उरणार नाही याची काळजी घेतली.

मात्र १४ व्या शतकापर्यंत अयोध्येच्या राममंदिराला ते जमिनीत गाडू शकले नाहीत. सिकंदर लोदी याच्या शासनकालापर्यंत राममंदिर जागेवर असल्याचे उल्लेख आढळतात. १५२७-२८ या दरम्यान राममंदिर पाडून त्याजागी मशिद उभी केली गेली.

 

babri masjid inmarathi

 

त्यानंतर २०२० मधे पुन्हा एकदा राममंदिर मूळ जागी उभं करण्याची मोहिम आधुनिक लोकशाहितील कायदेशिर लढा जिंकून हाती घेण्यात आलेली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?