' ‘लग्नानंतर मुलगा खरंच बदलतो का?’ जाणून घ्या मराठी माणसांना काय वाटतं! – InMarathi

‘लग्नानंतर मुलगा खरंच बदलतो का?’ जाणून घ्या मराठी माणसांना काय वाटतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

 

‘लग्नानंतर मुलगा खरचं बदलतो का?’ जाणून घ्या याबद्दल मराठी माणसांना काय वाटतं?

माणसाच्या आयुष्यातील लग्न हा एक मोठा टप्पा असतो. लग्नानंतर मुलाचं किंवा मुलीचं आयुष्य उत्तर ध्रुवावरून दक्षिण ध्रुवावर पोहोचतं, असं म्हटलं तरीही वावगं ठरू नये.

ज्या घरात जन्म घेतला. पुढील २०-२५ वर्षे आई-वडिलांच्या, भावा-बहिणींच्या छत्रछायेत घालवले. त्या घराला सोडून नव्या गावात नव्या घरात मुलगी प्रवेश करते. तर आईच्या मायेच्या सावलीत वाढलेला, ज्या आईने २५-३० वर्षे काळजी घेतली; तो मुलगा पत्नीच्या प्रेमाच्या छायेत जगू लागतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्याकडे मुलीला बदलावचं लागतं, हे संस्कार तिच्यावर लहानपणापासूनच केले जातात. सोबत मुलगाही बदलतो. पण मुलाच्या बदलण्याच्या प्रक्रियेची फारच चुकीच्या पद्धतीने चर्चा घडते.

नेमक्या याच नाजूक विषयाला स्पर्श करत मराठी माणसांच्या मनात या विषयाबद्दल नेमके काय भाव आहेत हे जाणून घेण्यासाठी ‘इनमराठी’ने एक प्रयोग केला.

‘इनमराठी’च्या फेसबुकवर पेजद्वारे मराठी माणसांना ‘तुमचा काय अनुभव?’ या सदराखाली या विषयावर आपले मत मांडण्याचे आवाहन केले.

हे आवाहन तब्बल दीड लाखांहून अधिक मराठी माणसांपर्यंत पोहोचले. तर तब्बल २०० हून अधिक प्रतिक्रिया आल्या. यापैकीच काही निवडक प्रतिक्रियांबद्दल चर्चा करणारा हा लेख –

प्रशांत जगताप यांना असं वाटतं की, ही एक सहजसोपी गोष्ट आपण उगाच करीत बसतो. लग्नानंतर काहीच बदलत नाही. आपणच पूर्वग्रहदूषित नजरेने पाहतो.

‘‘दृष्टिकोन बदला. उलटपक्षी तुम्ही पण घरात आलेल्या सुनेला समजून घ्या’’, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

तर विजय कुलकर्णी यांनाही बदल  वगैरे  सर्व काही नाटकं असतात असं वाटतं. परखड भाषेत त्यांनी लिहिलं आहे की, ‘‘बदल वगैरे वगैरे सर्व काही नाटक!! ” ” “जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही “हे त्रिकालाबाधी सत्य आहे.’’

तानाजी लव्हांड आणि अमृता अर्जनल यांनीही मुलगा बदलत नाही तर दृष्टिकोन बदलत असतो, असे लिहिले आहे.

तानाजी यांनी लिहिले आहे की, ‘‘कुटुंबातील सर्व नातेवाईक स्वताचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतात आणि प्रत्येक नातेवाईक लॉची पदवी केल्याप्रमाणे स्वतः मी आणि मीच योग्य आहे, हे दाखवण्यासाठी आयुष्यात वेळ आनंद मिळवण्यासाठी घालविण्यापेक्षा भांडणतंटे करण्यात घालवतात.’’

योगेश जंगम यांना मुलगा बदलत नाही, असे वाटते ‘‘नवरे मंडळी आता ‘अबला पुरुष’ झाले असल्याचे ते लिहितात.  ‘‘नवरा बदलत नाही. तो स्थिर असतो पण बिचाऱ्या दोन सबला नारींमुळे मेटाकुटीस येतो.

लग्न नाही केल तर आईच्या शिव्या, अन् केलं तर बायकोच्या शिव्या, नवरे मंडळी आता अबला पुरुष झाले आहेत.’’, अशा शब्दांत योगेश यांनी आपल्या भावना स्पष्टपणे मांडल्या आहेत.

राजेंद्र एल. भोसले यांनी वेगळा विचार मांडला आहे. ते लिहितात, ‘‘अगदी खरं आहे. लग्ना आधी मुले कोणाचंच ऐकत नसतात. लग्ननंतर त्याला आई आणि बायको दोघांचही ऐकावं लागतं.’’

मोनल कासार यांनीही मुलगा अथवा मुलगी कोणीही बदलत नाही असं म्हटलं आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘एक मुलगी आपल्या घरात आली आता ती वर्चस्व गाजवले ही विचारधारा आपल्या मुलांपासून दूर नेतात.

मुलाचे लग्न झालं की त्याची ही एक लाईफ आहे हे आपण सरस विसरतो. तो काय विचार करतो हे कोणी विचार करत नाही. पण यातील सर्वच खापर त्याचा बायकोवर जात असते. त्याच्यावर खूप जवाबदारी आहे, हा विचार ही कोणी करत नाही.

लग्न झालं की नाती जुळतात न त्यात स्वतःला सामावून घेताना जर काही राहून गेलं तर त्याला समजून ग्यायचे की त्याला उलट म्हणायचं की लग्न झालं तुझा स्वभाव बदलला?’

विठ्ठल एन साबळे – पाटील यांनी स्वत:चा अनुभवातून काही विचार मांडले आहेत. त्यांना लग्नानंतर मुलगा आई आणि पत्नी या दोघींच्या हातातील खेळणं होतो असं वाटतं. त्याला नातेवाईक कारणीभूत असतात असं त्यांना वाटतं. त्यामुळे नातेवाईकांपासून आपण आपलं घर वाचवायला हवं असं त्यांना वाटतं.

वंदना एस जे आणि सुनिता बनकर – म्हेत्रे या दोघींनाही या प्रकारात नवऱ्याचं बायको आणि पत्नीमध्ये सँडविच होतं, असं वाटतं.

सुनिता लिहितात, ‘‘ज्या बायका असे म्हणतात त्यांनी आपले नवरे कसे वागतात ते पहावे. बदल हवा असेल, तर बदलायला शिका. बदला घ्यायला नव्हे.’’

सचिन मोरे यांनी मुलगा आणि जावई यांची तुलना केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, ‘‘मुलगा व जावई यांमध्ये मुलग्यांने वागावे, तसे जावयांने वागावे ही भावना ठेवावी.’’

ऐश्वर्य चितळे यांनीही सचिन मोरे यांच्यासारखी भूमिका मांडत, ‘‘आपला मुलगा बैल होतो आणि जावई गरीब गाय ही सध्याची परिस्थिती आहे.’’ असे लिहिले आहे.

अलका थावाल यांनी या विषयावर अगदी मार्मिक भाष्य करताना लिहिले आहे की, ‘‘आपल लग्न झाल्यावर आपला नवरा बदलला ना मग मुलाचे लग्न झाल्यावर त्याने बदलल तर काय झालं?

सून आणि मुलगा आनंदात रहावे, ही तर आपली अपेक्षा असते. आपण त्यांच्या सुखात, आनंदात सहभागी व्हायचं मग कधीच आपल्याला त्रास होत नाही.’’

विजय नाईक यांनी हा लग्नानंतर ‘दोन महिन्यात मुलगा कसा बदलू शकतो’ असा प्रश्न उपस्थित करत ‘‘या विषयावर संशोधन सुरु आहे, गप्प राहणे हाच एक उपाय’’ असा सल्लाही दिला आहे.

मोहन जाधव पाटील आणि सुनिल कांबळे – साखरीकर  यांनी जवळपास मुलगा बदलतो असे गृहित धरून बाजू मांडली आहे. मोहन लिहिले आहे की, ‘‘जी मुलगी आपले आई वडील, बहीण भाऊ, सगळे नाती गोती सोडून येते. ती ‘च्या मुळे मुलगा थोड फार बदलला तर वाईट मानून घेऊ नये.’’

तर सुनिल यांनी लिहिले आहे, ‘‘एकदा का लग्न झाले की. मुलगा बदलु दे किंवा नाही बदलु दे. मुलगा बदलला हा शिक्का मारला जातोच. मुलग्याच्या आयुष्यात सहचारिणी म्हणून आलेली मुलाची पत्नी तीच्याही काही आपेक्षा असतील. हे लक्षात घेतलं पाहिजे’’

नयन पटेल यांनी दोघांनाही वेळ द्यावा, असे मत व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिले आहे, ‘‘लग्नानंतर मुलगा आणि मुलगी या दोघांनाही परस्परांना खूप वेळ द्यावा असे वाटत असते.

हे अगदी नैसर्गिक आहे तो त्यांना मिळावा किंबहूना मोठ्यांनी तसा प्रयत्नपूर्वक करावा त्यांना मोकळीकता द्यावी.

रंगभरू द्यावे त्यांना वर्ष सहा-महिनेच तर असतात बहरण्याचे, स्वप्न रंगवण्याचे. त्यात अपेक्षाचे डोंगर नकोत कोणीही बदलत नसतो ते एकमेकात गुंतलेले असतात पून्हा राहाटगाड्यात येतातच फक्त त्यांना वेळ द्या व समजून घ्या. नाहीतर पाखरं उडालीच समजा.’’

छाया जहागिरदार यांनीही दोघांनाही वेळ द्यायला हवा असे लिहिले असून नाती जपणं काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

रोहन एस. रावरेकर यांनी बदल होतोच असे म्हणत मुलीची बाजू समजून घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘‘बदल स्वाभाविक आहे, मुलगी घर सोडून येते, तेव्हा तिचं सगळं विश्वच बदलत, रोज दिसणारे आई-बाबा, रोजच्या सवयी, शेजारी – नातलग हे अचानक बदलतात.

ती नवीन घरी स्वतः ला सामावून घेते. ते परक घर आपलंसं करण्याचा प्रयत्न करते. ह्या सगळ्याच्या बदल्यात तिने स्वत:च्या हक्काच्या नवऱ्याकडून काही अपेक्षा केल्या तर चूक काय आहे?

म्हणजे तिच्यावर थोडे लक्ष देणे, सोबत फिरायला जाणं किंवा तिला आपल्या जीवनाचा प्रथम भाग मानणं आणि वागणं सुद्धा. या सगळ्यात दोघांनी अतिरेक टाळावा, मग अशे विचार टाळता येतात.’’

सुनिता वासू यांनीही बदल होतच असतो, असा आशय व्यक्त करत लिहिले आहे की, ‘‘बदललंच पाहिजे. मुलगाच बदलतो असं नाही. घरात नवीन मूल जन्माला आलं तरी बदल होतोच ना? तसा हाही एक बदल.

मुलाचं लग्न करून दिल्यामुळे मुलगा बदलतो, अशी भीती वाटत असेल, तर त्याला अविवाहितच ठेवावा.

आणि विवाह करून दिलाच आहे तर बदलही स्विकारावा. आपण मेल्यानंतर सूनच मुलाच्या साथीला राहणार आहे ना? आणि सून तर आपलं घरदार सोडून तुमच्याकडे आली आहे. तिला आपल्या कुटुंबात प्रेमाने सामावून घेण्यातच शहाणपणा आहे.’’

समाधान शिवाजीराव काळंगे यांनी अतिशय कळीचा मुद्दा मांडला आहे. ‘‘बाहेरून आलेल्या मुलीला दोघेही नवीन असतात त्यात मुलगा जर आपल्या आईच्या चुकांना बरोबर म्हणत मोठा झाला असेल, तर अशा मुलांना बाजू घेताना अडचणी येतात.

नक्की बाजू कोणाची घ्यायची? आईची घेतली तर बायको नाराज; बायकोची घेतली तरी आई नाराज होते. तिला सतत वाटतं असत आपला पोरगा आपल्या ताब्यातून जातोय.’’

स्नेहा धांड – भिंगारे यांनीही आई मुलाबाबत खूपच संवेदनशील असते असे लिहित बदल स्वीकारायला हवेत असा संदेश दिला आहे.

वैशाली मेश्राम शिंदे यांनीही बदल हा नैसर्गिक असल्याने म्हणत सण-समारंभाच्या निमित्ताने तसेच मुलगी दुसऱ्या घरात आली असल्याने तिची प्रचंड कुचंबना होत असल्याचा, मुद्दा अधोरेखित केला आहे.

मंगेश करंबळेकर यांनी एक कठीण पण प्रॅक्टिकल सल्ला दिला आहे. आईला आईच्या जागेवर आणि बायकोला बायकोच्या जागेवर ठेवावे आणि ही कला आहे, असे त्यांना वाटते.

दत्तात्रय गायकवाड यांनी बदल स्त्रीमध्ये बदल करून घेण्याची क्षमता पुरुषांपेक्षा अधिक असल्याचे मत मांडले आहे. माणसामध्ये (पुरुषामध्ये) बदल घडून येण्यास थोडा वेळ लागतो, असेही त्यांनी लिहिले आहे.

शशांक देसाई यांना अपार प्रेम व काळजी घेणाऱ्या व्यक्तींना मुलातील बदल स्वीकारण्यासाठी बराच काळ जातो, असे वाटते.

प्रिया जंगले लिहितात, ‘‘प्रत्येक मुलीची इच्छा असते कि माझ्या नवऱ्यांनी माझंच ऐकावं असं वाटतं आणि त्यामुळे असं होत कि तरी मुलीनं त्याचा आई-वडील बहिण भाऊ बाकी सगळे यांना समजून घेतलं त्यात भर आहे ना म्हणून त्या मुलाला थोड बदलाव लागतं.’

मोहन जाधव पाटील  यांनी लिहिले आहे की, ‘‘जी मुलगी आपले आई वडील, बहीण भाऊ, सगळे नाती गोती सोडून येते. ती ‘च्या मुळे मुलगा थोड फार बदलला तर वाईट मानून घेऊ नये.’’

प्राजक्ता कुलकर्णी पत्तार यांनी एका वेगळ्‌या दृष्टीने या विषयाला स्पर्श केला आहे. ‘‘जसं मुलगा बदलतो असं त्याच्या घरच्यांना वाटतं. तसंच मुलगी बदलली असं तिच्या घरच्यांनाही वाटत असतं. पण ते गरजेचं आहे, असंच तिच्या सासरी समजतात!

तोच विचार स्वतःच्या मुलाबद्दल करावा. त्यात वेगळं काय आहे?’’ अशा शब्दांत आपलं मत व्यक्त केलं आहे.

मृगनयना जयवंत यांनी सामोपचाराची भूमिका घ्यायला हवी असा संदेश देत लिहिले आहे की, ‘‘सगळयांनीच विचारात आणि वागण्यात बदल केला तर नात टिकत. कुटुंब आनंदी रहात.

यश मिळत. समोरच्याला समजून घ्या. विचार पटत नसतील. तर नीट बोलून समोरच्याची बाजू समजून घ्या. वेळ आली तर समोरच्याला नीट समजावून सांगा. नाहीतर नको नको ते बदल होतात आयुष्यात.’’

संजिवनी एस भैलुमे यांनी सडेतोड प्रतिक्रिया लिहिली आहे. त्यांनी लिहिले आहे, ‘‘असे काही नसते. नवऱ्याला बायको म्हणजे नुसती कामवाली वाटते. आई आणि बहिणीची सेवा करायला फक्त बायको घरात आणली जाते, तिच्या इच्छा अपेक्षांचा काहीच विचार केला जात नाही, नवऱ्याला आई, वडील, बहीण, भाऊ हेच त्याच जग वाटत.

जे बायकोवर प्रेम करू शकत नाहीत अश्या लोकांनी तर लग्नच करू नये.’’

किरण पवार यांनी या विषयाशी संबंधित दुसऱ्या एक विषयाला स्पर्श केला आहे. बऱ्याच मुली पोटगीसाठी आणि संपत्तीसाठी खोट्या केसेस दाखल करतात, असे त्यांनी लिहिले आहे.

हा सर्व प्रकार जवळून बघितल्याचे सांगत, अशा मुली खूप मानसिक त्रास देतात आणि ब्लॅकमेल करतात आणि त्यांना मुलीच्या घरातूनच सहकार्य मिळते, असेही त्यांनी लिहिले आहे.

 

या सर्व प्रतिक्रियांवरून एक स्पष्ट आहे की, प्रत्येक कुटुंबाची स्थिती वेगवेगळी असते. कुटुंबाची संस्कृती, त्यांचे आचार-विचार त्याचप्रमाणे कुटुंबियातील सदस्यांचा व्यावसायिक जीवन वगैरे या सर्व बाबींवर ही बाब प्रत्येक कुटुंबात वेगवेगळी असते.

मात्र, एक खरे की, लग्नानंतर मुलगी बदलते, तसेच मुलगाही बदलतो. दोघांमधीलही बदल दोन्ही कुटुंबियांनी आनंदाने स्वीकारला तर ‘मुलगा बदलतो?’ हा प्रश्न उपस्थित होऊच शकत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?