ब्रिटिशांचा प्रचंड विरोध झुगारून ९० वर्षांपासून सुरु असलेल्या कंपनीच्या चिकाटीची गोष्ट!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
मेड इन इंडिया, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या सगळ्या संकल्पना जास्त जोरात प्रकाशझोतात आल्या त्या गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या काळात.
देशभर, खरंतर जगभर कोरोनाचे संकट असताना चीनने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली. अजूनही भारत-चीन सीमेवर फारशी शांतता नाहीच. म्हणूनच पंतप्रधानांनी भारतीय जनतेला आव्हान केलं की शक्यतो देशी, स्वदेशी गोष्टींचा वापर करा. ‘व्होकल फॉर लोकल’ ही त्यांची घोषणा होती.
जगातल्या इतर देशांप्रमाणेच भारतही चीनकडून बऱ्याच गोष्टी आयात करतो. म्हणजे आपला बराचसा पैसा चीनकडे जातो आणि चीन मात्र आपला वसाहतवादी दृष्टिकोन आता वाढवू पहात आहे. म्हणूनच पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला.
हाच वसाहतवादी दृष्टीकोन ब्रिटिशांनी भारतासाठी वापरला होता. भारतातून कच्चामाल नेऊन त्यापासून वस्तू बनवून ते, तो तयार माल भारतात चढ्या दराने विकायचे.
स्वातंत्र्याच्या लढाईत देखील स्वदेशीचा नारा दिला गेला होता. इंग्रजांना धडा शिकवायचा असेल, तर त्यांच्या मालाला इथे उठाव मिळू द्यायचा नाही असा चंग भारतीयांनी बांधला होता.
त्यावेळेस विदेशी मालाची होळी करणे आणि स्वदेशीचा पुरस्कार करणे इत्यादी गोष्टी होत होत्या. त्यावेळेस अनेक भारतीयांनी स्वदेशी कंपनी स्थापण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्यांचा हाच उद्देश होता की, आर्थिक बाबतीत देशाला स्वयंपूर्ण केल्यास इंग्रजांची गुलामगिरी करावी लागणार नाही.
ही कहाणी आहे, याचवेळी स्थापन झालेल्या एका कंपनीची, जी अजूनही व्यवस्थित सुरू आहे. जो आज एक ब्रँड बनला आहे. ही कहाणी आहे बोरोलीनची. स्वातंत्र्याच्या लढाईत लाठ्याकाठ्या खाणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या जखमांवर मलम लावून फुंकर घालणाऱ्या क्रीमची. ब्रिटिशांना धडकी भरवणाऱ्या उद्योगाची.
१९२९ मध्ये कलकत्त्याच्या गौर मोहन दत्त यांनी जिडी फार्मासिटिकलस् नावाची एक कंपनी काढली. त्यांचा हाच उद्देश होता, की परकीयांच्या तोडीची औषधं आपल्याच देशात बनावीत. ही औषधे कमी किमतीत लोकांना मिळावीत.
यासाठी गौर मोहन दत्त यांनी अत्यंत मेहनत घेतली. त्यांच्या उत्पादनांपैकी भारतीय ग्राहकांवर जर कोणत्या उत्पादनाने छाप सोडली असेल, तर ते म्हणजे बोरोलीन क्रीम. हे क्रीम हिरव्या रंगाच्या ट्यूबमध्ये मिळायचं.
बोरोलीन क्रीम तरुण मुली चेहरा सुंदर दिसावा, चेहऱ्यावरील पिंपल्स कमी व्हावीत म्हणून वापरत असत. लहान मुलं कुठे धडपडून पडली, तर आया त्या मुलांच्या जखमेवर मलम म्हणून हे क्रीम लावायच्या. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्यास हेच क्रीम वापरलं जायचं.
त्वचेवर पुरळ उमटल्यास किंवा इतर त्वचेचे काही आजार झाल्यास बोरोलीन क्रीम वापरलं जायचं. याचाच अर्थ ही बोरोलीन क्रीम अनेक गोष्टींसाठी वापरलं जात असे.
‘The miracle cure for any ailment’- हीच या क्रीमची टॅगलाईन होती.
हळूहळू हे क्रीम भारतभर प्रसिद्ध झालं. म्हणजे अगदी जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोरोलीन प्रसिद्ध झालं. काश्मिरी लोकांनी त्याचा उपयोग हिमबाधा झाल्यास किंवा थंडीमुळे त्वचेचे काही विकार झाल्यास त्यावर लावण्यासाठी केला.
थंडीने ओठ फाटले, तर त्यावरही हेच क्रीम लावलं जायचं. दक्षिणेकडील लोकांनी उन्हाळ्या्पासून होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी सनस्क्रीनसारखा बोरोलीनचा वापर केला. एकूणच सर्व वयोगटातील लोकांसाठी कुठल्याही हवामानासाठी बोरोलीन उपयोगी पडत होतं. म्हणूनच त्याची लोकप्रियता दिवसागणिक वाढत होती.
साध्या बोरिक अॅसिड, झिंक ऑक्साईड आणि काही अत्तर यापासून बनलेलं हे क्रीम ऑंटीसेप्टीक म्हणून वापरता येत होतं. त्वचेच्या इन्फेक्शनसाठी वापरता येत होतं. उन्हाळा-हिवाळा या ऋतूत होणाऱ्या त्वचेच्या त्रासासाठी वापरता येत होतं. म्हणूनच या क्रीमचा खपही वाढला.
स्वतःचा असा एक ग्राहक वर्ग या क्रिमने तयार केला. मोठमोठ्या श्रीमंत लोकांपासून, गरीब वर्गातील लोकांपर्यंत हे क्रीम वापरलं जात होतं. अगदी पंडित जवाहरलाल नेहरू ते हिंदी सिनेस्टार राजेंद्र कुमार देखील हे क्रीम वापरायचे. यावरूनच या क्रीमची उपयुक्तता आणि प्रसिद्धी लक्षात येते.
भारतातल्या लोकांनी आपण स्वदेशीचा वापर करतो म्हणूनही क्रीम खरेदी करायला सुरुवात केली, ते स्वस्तही मिळायचं.
हे क्रीम जसजसं लोकप्रिय व्हायला लागलं, तसं ते ब्रिटिशांच्या डोळ्यात खुपायला लागलं. हे क्रीम उपयोगी तर होतंच, पण सर्वांना परवडेल अशा कमी किमतीत मिळत होतं. त्यामानाने ब्रिटिश उत्पादने महागडी असत.
आता ज्याप्रमाणे कोलगेट, नेसले सारख्या मोठ्या ब्रँडना देखील एखादी डाबर, पतंजलीसारखी भारतीय कंपनी पुढे जात असेल तर भीती वाटते तशीच भीती ब्रिटिशांना त्याकाळी वाटत होती.
बोरोलीन कंपनी बंद पडावी म्हणून ब्रिटिशांनी अनेक प्रयत्न केले, परंतु स्वतःच्या प्रामाणिकपणाशी बोरोलीनने कधीही तडजोड केली नाही, त्यामुळे ब्रिटीशांचे काही चालले नाही.
जवळ जवळ गेली नव्वद वर्ष ही कंपनी अजूनही बाजारात आपलं नाव टिकवून आहे. यामागचे कारण म्हणजे क्रिमची गुणवत्ता. बोरोलिन क्रिमची गुणवत्ता आणि पॅकेजिंग याबाबतीत कंपनीने कधीही कसलीही तडजोड केलेली नाही. तसंच या कंपनीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ९० वर्षात कंपनीने सरकार कडून कुठल्याही प्रकारचे, अगदी एक रुपयाचंही कर्ज घेतलं नाही.
आता ज्याप्रकारे बाजारात जाहिराती करून आपला माल विकला जातो ही सुविधा कंपनीला सुरुवातीला नव्हतीच, पण केवळ एकमेकांना सांगूनच या कंपनीची कीर्ती पसरली आणि बोरोलीन क्रीम घराघरात पोहोचलं.
भारताच्या स्वातंत्र्याविषयी कंपनी आधीपासूनच आग्रही होती. त्यामुळेच १५ ऑगस्ट १९४७ ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळेस कंपनीने १००००० बोरोलीन ट्यूब लोकांना फुकट वाटल्या.
या क्रीममध्ये गुणवत्ता नसती, तर तिच्या लोकप्रियतेला केव्हाच ओहोटी लागली असती. प्रामाणिकपणे राहून चांगल्या प्रकारची गुणवत्ता दिल्यास लोकांच्या मनावर कितीही काळ राज्य करता येतं, हे बोरोलीनने दाखवून दिले आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.