' क्षमता असूनही अपयश? याला कारणीभूत असणाऱ्या या १० गोष्टी समजून घ्या – InMarathi

क्षमता असूनही अपयश? याला कारणीभूत असणाऱ्या या १० गोष्टी समजून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

तुम्ही हुशार आणि मेहनती आहात, लोकांमध्ये फेमस आहात. पण तरीही तुम्हाला यश मिळत नाहीये अशा वेळी “मैं ऐसा क्यो हुं” अशी भावना मनात घर करू लागते.

अर्थात यासाठी सेलिब्रिटी असणंच गरजेचं नाही तर आपल्या रोजच्या जीवनातही हा अनुभव प्रत्येकाला कधी ना कधी येतोचय.

एखादी परिक्षा असो, स्पर्धा असो वा नोकरीसाठी मुलाखत, ज्यावेळी यश हुलकावणी देतं त्यावेळी आपलं काहीतरी चुकतंय ही भावना मनात डोकावतेच. मात्र यावेळी नेमकी कोणती चूक हे मात्र सुचत नाही.

अशावेळी मनस्ताप करून घेत नशिबाला दोष देण्यापेक्षा आपली चूक शोधून ती सुधारली तर निश्चितच भविष्यात अपयशाला सामोरे जावे लागणार नाही.

ranbir-kapoor-sad-marathipizza

 

तुम्ही creative आहात , confident आहात तरीही कुणाशी मिटिंग करायची म्हटलं तर तुम्हाला टेन्शन येतं! तुम्हाला महत्वाच्या कामाच्या वेळीच थकल्यासारखं आणि निराश वाटतं. सगळंच चुकतंय, आपण प्रयत्न करतोय पण काहीच मनासारखं घडत नाही.

तुमच्यात potential असून सुद्धा तुम्ही १००% प्रयत्न करू शकत नाही असं तुम्हाला वाटतं. तुम्ही तुमचे मित्र, आयुष्यातील मजा, फॅमिली सगळं बाजूला ठेवून फक्त कामाकडे लक्ष देताय, तरी यश का हुलकावणी देतंय?

हा प्रश्न केवळ तुम्हालाच नाही तर अनेक सेलिब्रिटीजनादेखील पडला आहे. प्रचंड क्षमता, टॅलेन्ट, उत्तम व्यक्तीमत्व असे सारे गुण असूनही अनेकांच्या पदरी अपयशच आल्याची उदाहरणं आपल्याला सहज आढळतात.

एखादा चित्रपट पाहताना किंवा खेळाचा सामना बघताना चटकन आपण म्हणतो, ” हा खूप टॅलेन्टेड होता, मात्र फारसा चमकला नाही”. आपलं हेच वाक्य त्या व्यक्तीच्या अपयशाचं चित्र दाखवते.

अभिनेता अक्षय खन्ना, अभिषेक बच्चन, गायक लकी अली, क्रिकेटपटु विनोद कांबळी इथपासून ते धीरुभाईंसारख्या ज्येष्ठ व्यक्तीमत्वाचा वारसा पुढे नेणारे उद्योजक अनिल अंबानींपर्यंत… नावांची यादी मोठी आहे.

या सगळ्यांकडे क्षमता, हुशारी, गुण यांची कमतरता नाही, प्रत्येकजण आपआपल्या क्षेत्रात धडपडही करत आहे, मात्र त्यांना अपेक्षित असं यश मिळू शकलेलं नाही हे खरं.

असं म्हणतात प्रामाणिक कष्ट हीच यशाची गुरुकिल्ली आहे. परंतु ते करून सुद्धा तुम्हाला यशाची चव चाखायला मिळत नसेल तर नक्कीच कुठेतरी काहीतरी गफलत होतेय असं समजा. पुढील गोष्टींपैकी अनावधानाने तुम्ही काही करत असाल तर ते वेळीच सुधारा. मग यश तुमच्या वाट्याला नक्कीच येईल.

 

१) यश अपयशाची सतत चिंता करणे.

 

swapnil-joshi-sad-marathipizza

 

जिथे भीती असते , तिथे यश मिळणे कठीण असते. यशासाठी माणसाने निर्भीड असणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही अपयशाला घाबरून काम करता, तेव्हा त्या भीतीमुळे तुमच्याकडून चुका होउ शकतात. भीती, चिंता ह्या गोष्टी तुम्हाला १००% प्रयत्न करण्यापासून रोखतात. हे एक दुष्टचक्र आहे. चुका होतील अशी भीती मनात ठेवू नका. कारण जो चुकतो तोच शिकतो.

प्रयत्न करणारा मनुष्यच चुकतो व प्रयत्न न करणारा कधीच पुढे जात नाही. मोठमोठी माणसं सुद्धा त्यांच्या चुकांमधूनच धडे घेऊन यशस्वी झाली आहेत.

पण त्यांनी चुकांना घाबरून प्रयत्न करणे कधीच सोडले नाही. थॉमस एडिसन ने जर प्रयत्न करणे सोडले असते तर आजही आपण कंदिलाच्या प्रकाशात आयुष्य घालवलं असतं.

 

२) स्वतःशी प्रामाणिक नसणे

 

aaditya-kapoor-sad-marathipizza

 

 

ह्या दिखाऊ जगात माणसाने स्वतःचे खरेपण, वेगळेपण, स्वतःचे अस्तित्व टिकवणे खरंच कठीण आहे. गर्दीचा एक भाग बनून जाताना, गर्दीत मिसळून जाताना आपण आपले अस्तित्व विसरतो. सगळं जग म्हणतं म्हणून आपण एखादी न पटणारी गोष्ट सुद्धा स्वीकारतो.

लोकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागू नये म्हणून आपण एखादी गोष्ट नाईलाजाने स्वीकारतो. परंतु असे करू नका. आपला मुद्दा बरोबर असेल, योग्य असेल तर तो सर्वांपुढे मांडण्यास घाबरू नका.

जग तुम्हाला एकटे पाडेल. पण तुम्ही स्वतःशी, स्वतःच्या विचारांशी ,स्वतःच्या अस्तित्वाशी प्रामाणिक असाल तर यश मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. नेहमी स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाशी प्रामाणिक राहा.

 

३) स्वतःच्या कामाविषयी तक्रार करणे

एखाद्यावेळी खूप काम केल्यानंतर कंटाळा आला म्हणून घरच्यांकडे किंवा मित्रांकडे कामाविषयी तक्रार करणे ह्यात काही गैर नाही. पण तुम्ही सतत स्वतःच्या कामाविषयी तक्रार करत असाल तर तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. सतत तक्रार केल्याने तुमच्या मनावर व कामावर विपरीत परिणाम होऊ शकतात.

 

tension inmarathi

 

आनंदी व सकारात्मक विचार तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जातात. पण सततच्या तक्रारीने तुम्ही नकळत स्वतःच्याच कामाचा द्वेष करू लागता ज्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो. हे दुष्टचक्र वेळीच थांबवा.

 

४) तुम्ही तुमच्या मनाचा कौल ऐकत नाही

 

dhoni-upset-marathipizza

 

बऱ्याच वेळेला आपण अशा गोष्टी करतो ज्या करण्यास आपले मन आपल्याला परवानगी देत नाही. पण प्रवाहाबरोबर वाहत जाऊन आपण त्या गोष्टी करतो कारण जग त्या गोष्टीला योग्य मानते. असेच आपण मेंढ्यांच्या कळपात शिरतो आणि आपली सर्जनशीलता संपते. आपलं वेगळेपण आपण विसरतो. मनाचा कौल घेत नाही आणि यशापासून दुरावत जातो.

 

५) इतरांशी तुलना करणे

 

abhisehk-bacchan-sad-marathipizza

 

अपयशाची अति चिंता केल्याने आपण नकळत आपली तुलना दुसऱ्याशी करू लागतो. स्वतःबद्दल कायम निगेटिव्ह विचार करतो आणि समोरच्याला अधिक स्मार्ट, हुषार, मेहनती, लकी समजू लागतो.

एकदा स्वतःला कमी लेखायला सुरुवात झाली की प्रगती संपून अधोगतीकडे वाटचाल सुरु होते. शर्यतीत पळायला सुरुवात केली की आपटून जखमी होण्याचीच शक्यता जास्त असते. निरोगी स्पर्धा हवीच पणअश्या तुलना फक्त तुमचा वेळ वाया घालावेल आणि तुमची प्रगती रोखेल.

 

हे ही वाचा –

===

 

६) योजनांचा अभाव असणे 

 

decisions inmarathi

 

 

एखादी गोष्ट प्लॅन न करता करणे हे जरी थ्रिलिंग असले तरी त्यामुळे कामात चुका होऊ शकतात. आयुष्यातले निर्णय उत्स्फूर्तपणे घेण्यात चुकीचे काही नाही पण शक्यतोवर आपण सगळ्या गोष्टी शिस्तीत, योजनाबद्ध रीतीने केल्यास करियरचा ग्राफ उंचावण्यास मदत होते. म्हणूनच टार्गेट ठेवून काम केल्यास छोटे छोटे माईलस्टोन गाठणे सोपे होते.

 

७) नकारात्मक वातावरण

तुमच्या आसपास जर सतत टीका करणारी, तुमच्याविषयी, तुमच्या कामाविषयी नकारात्मक बोलणारी माणसे असतील तर त्याचा खूप नकारात्मक परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो. सतत  निगेटिव्ह ऐकल्याने तुम्ही सुद्धा स्वतःच्या कामाविषयी नकारात्मक विचार करू लागता. ह्याने तुमची productivity आणि creativity कमी होते.

 

negative guy inmarathi

हे ही वाचा – टिकेतूनच घडवा यशाचा मार्ग…!! या ९ गोष्टी आत्मसात केल्या तर यश नक्कीच मिळेल…

तुमचा आत्मविश्वास कमी होतो. तुमचा स्वतःवरील विश्वास आणि सकारात्मकता कमी झाल्याने तुम्ही १००% कामात लक्ष देऊ शकत नाही.

 

८) दिवसाचा अर्धा वेळ वाया घालवणे

 

Tea with Friends InMarathi

 

लवकर निजे, लवकर उठे त्यास आयु-आरोग्य सुख संपत्ती लाभे’ असं आपले पूर्वज सांगून गेले आहेत ते अगदी खरं आहे.

आपल्या चांगल्या सवयी आपला बराच फायदा करून देतात. उशिरा उठून, उशिरा दिवस सुरु केल्याने काम सुद्धा उशिरा सुरु होते. हे तुमच्या करियरसाठी योग्य नाही. सगळा दिवस आळसात वाया घालवून संध्याकाळी सगळं काम उशिरा करणे ह्याने फायदा नक्कीच होत नाही. जवळजवळ सगळीच यशस्वी माणसे सकाळी लवकर उठण्यास प्राधान्य देतात.

 

९) अनारोग्य

हल्लीच्या धावपळीत शरीराकडे लक्ष देणे, तब्येत सांभाळणे, योग्य व्यायाम आणि डाएट कडे लक्ष देणे अनेकांना जमत नाही. सकाळचा नाश्ता न करणे, ऑफिसमध्ये काम करताना जंक फूड खाणे, जास्त प्रमाणात चहा, कॉफी पिणे ह्याने शरीरावर घातक परिणाम होतात. कामात चुका होऊ शकतात.

 

no smoking inmarathi 2

 

संतुलित आहार, योग्य व्यायाम ह्याने तुम्हाला फिट राहण्यास मदत होईल. कामात उत्साह वाटेल, थकवा, चिडचिड, नैराश्य, डोकेदुखी, अशक्तपणा ह्या तक्रारी जाणवणार नाहीत. ओघाने काम सुद्धा व्यवस्थितरित्या पूर्ण करता येईल.

 

१०) स्वतःला जगापुढे न आणणे

भरपूर कष्ट करून, स्मार्ट आणि हुषार असून सुद्धा जर तुम्ही यशापासून लांब राहत असाल तर तुम्ही स्वतःला, तुमच्या टॅलेंटला, कामाला जगापूढे प्रेझेंट करणे आवश्यक आहे. न बोलणाऱ्याचे सोनेही विकले जात नाही पण बोलणाऱ्याचे दगड सुद्धा विकले जातात असं म्हणतात ते काही खोटं नाही. म्हणूनच तुम्ही स्वतःचे व स्वतःच्या कामाचे जगापुढे योग्य प्रकारे मार्केटिंग करणे ही काळाची गरज आहे.

 

fear of failure inmarathi

 

सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा स्वतःवर विश्वास असला तर तुम्ही जगाला सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवायला convince करू शकता. आत्मविश्वासाने जगापुढे स्वतःला सिद्ध करू शकता.

ह्या १० गोष्टी ज्याचा अत्यंत नकारात्मक परिणाम तुमच्याही नकळत तुमच्या आयुष्यावर व कामावरही होतो त्या टाळल्या तर यश मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही.

 

हे ही वाचा –

===

 

 

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?