' शनिवारची बोधकथा : शक्तीपेक्षा “श्रद्धा” श्रेष्ठ! आयुष्यात ‘गुरूं’चं महत्त्व स्पष्ट करणारी कथा – InMarathi

शनिवारची बोधकथा : शक्तीपेक्षा “श्रद्धा” श्रेष्ठ! आयुष्यात ‘गुरूं’चं महत्त्व स्पष्ट करणारी कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया।
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ।।

श्लोक वाचून तुमच्या लक्षात आलं असेलच, की या श्लोकात गुरूला वंदन केलं आहे. पूर्वी गुरुकुल पद्धत असल्यामुळे गुरुचं स्थान अनन्यसाधारण होतं, जसजसा काळ बदलला तसतसं माणसाच्या आयुष्यातलं गुरूच महत्त्वदेखील बदलत गेलं.

आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यात तर सगळ्या गोष्टी अगदी घरबसल्या, आयत्या मिळतात. सध्या कोरोनामुळे आपण ऑनलाईन शिक्षण घेतोय… या सगळ्यात गुरु कशाला हवा?असा प्रश्न पडू शकतो…त्याचंच महत्त्व पटवून देणारी आणि अहंभाव कमी करणारी ही बोधकथा :

एक गाय रानात चरण्यासाठी जाते. संध्याकाळी रानात भटकत असताना तिच्या लक्षात येतं, की एक वाघ दबक्या पावलांनी तिच्यामागे येत आहे. शिकारीच्या इर्षेने वाघ तिच्यामागे धावू लागला. भीतीने गाय जीव मुठीत धरून इकडे तिकडे पळू लागली.

 

 

पुढे वाट दिसत नाही हे पाहून ती गाय रानातील एका तलावात शिरली. वाघ सुद्धा तिची शिकार करायचीच या इर्षेने आला होता म्हणून पुढचा मागचा विचार न करता तोही तलावात शिरला.

खरी गोष्ट तर पुढे घडली…. तलावात पाणी फार कमी होते आणि चिखलरुपी गाळ जास्त होता. पाणी कमी असल्यामुळे ते दोघेही त्या चिखलात रुतून बसले. हलायचा प्रयत्न केला, तर जास्तच आत शिरू लागले.

वाघ गायीपासून खूपच जवळ होता, पण परिस्थिती इतकी बिकट होती, की तो कोणतीच हालचाल करू शकत नव्हता.

गळ्यापर्यंत चिखल आल्यानंतर गायीने वाघाला विचारलं, “तुझा कोणी मालक किंवा गुरु आहे का?” तिच्या या प्रश्नावर वाघाला खूप हसू आलं. तो म्हणाला, “या जंगलात मी शक्तिशाली आहे, सगळे प्राणी मला घाबरून असतात. माझा मालक कोणी का असेल? मीच त्यांच्यावर राज्य करतो.”

त्यावर गाय म्हणाली, “तू कितीही बलवान असलास, तरी तुझ्या शक्तीचा आता काहीच उपयोग नाहीये” . त्यावर “तुझीही अवस्था माझ्यासारखीच तर आहे की, थोड्यावेळाने आपण दोघेही मरणारच आहोत” वाघ म्हणाला.

मिश्कीलपणे हसून गाय म्हणाली, “मी तुझ्याइतकी बलवान नसले, तरीही मी माझ्या मालकाप्रती प्रामाणिक आहे. माझ्या समर्पणाच्या भावनेमुळे थोड्यावेळात माझा मालक इथे येईल आणि मला या चिखलातून बाहेर काढेल.”

 

 

गायीने म्हट्लं तसंच झालं… थोड्यावेळाने तिचा मालक तिथे आला आन त्याने गायीला तलावातून बाहेर काढलं. वाघाला मात्र तो बाहेर काढू शकला नाही, कारण वाघाला बाहेर काढणं म्हणजे स्वतःचा आणि गायीचा जीव धोक्यात घालणं आहे हे तो जाणून होता.

कथेतून बोध हाच, की कोणावर पूर्णपणे निर्भर राहणं ही चांगली गोष्ट नाही, परंतु मीच श्रेष्ठ, मला कोणाचीच गरज नाही हा अहंभाव तुमच्या विनाशाला कारणीभूत असतो.

हाच विनाश होऊ द्यायचा नसेल, तर कथेतील मालकाप्रमाणे एखादा गुरु प्रत्येकाच्या आयुष्यात असावा. कथेतील गाय हे समर्पक हृदयाचे प्रतीक आहे, तर वाघ हे अहंकारी मनाचे! त्यामुळे या संसाररूपी चिखलातून बाहेर पडायचे असेल, तर ईश्वराप्रती, गुरुंप्रती भक्तिभाव, श्रद्धा ठेवणे गरजेचे आहे.

तुमच्याकडे कितीही शक्ती असली, तरीही असे अनेक प्रसंग असतात जिथे तुमची शक्ती कामी येत नाही. त्याप्रसंगात तुम्हाला श्रद्धाच मदत करते. त्यामुळे “गर्वाचे घर खाली” याप्रमाणे गर्व न करता समर्पणभाव मनात ठेवले, तर तुम्ही नक्कीच सुखी होऊ शकता.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?