' कोरोनाकाळात कर्तव्यापोटी अंगणवाडी सेविकेने केलं असं काही, की तुम्ही सलाम कराल – InMarathi

कोरोनाकाळात कर्तव्यापोटी अंगणवाडी सेविकेने केलं असं काही, की तुम्ही सलाम कराल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कर्तव्य म्हटलं, की ते पार पाडणं ही मोठी जबाबदारी असते आणि या कोरोनाच्या काळात ते हे प्रकर्षाने दिसून आलंय. पोलीस, डॉक्टर, नर्स, आशा सेविका, सफाई कर्मचारी यांचं उदाहरण हे वेळोवेळी डोळ्यासमोर येतं. आपल्या जीवाची पर्वा न करता हे ‘कोरोना वॉरीयर्स’ दिवसरात्र आपल्या कर्तव्यांचं पालन करताना दिसत आहेत.

अनेकांनी यात आपला जीव देखील गमावला, पण मागे हटले नाहीत. लोकांच्या सेवेतच त्यांनी धन्यता मानली.

आज अशाच एका अंगणवाडी सेविकेला आपण भेटणार आहोत, ज्यांनी परिस्थिती अनुकूल नसताना देखील त्यावर मात करून आपल्या कर्तव्याचे पालन केले.

कोरोनाकाळात तुमच्याही घरी काही महिला येऊन काही चेकअप करून गेल्या असतील. गर्भवती स्त्रिया, नवजात शिशु यांच्या पोषणाची जबाबदारी या सेविकांवर असते.

 

aanganvadi inmarathi

 

शहरी भागात किंवा ग्रामीण भागात हे कार्य तुलेनेने सोप्पं आहे, पण दुर्गम आणि आदिवासी भागाचं काय? एकतर हा दुगम भाग असल्याने तिथे जाण्यास बऱ्याच मर्यादा येतात. संपर्काची साधने सुद्धा तुलनेने कमी असतात. या गोष्टी असून सुद्धा काही जिद्दी अंगणवाडी सेविका या भागात काम करत आहेत.

त्यापैकीचं एक आहेत,रेलू वसावे! नंदुरबार जिल्ह्याच्या आदिवासी भागात या अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. सहा वर्षापर्यंतच्या मुलांचे आणि त्यांच्या आईचे वजन, आरोग्य, योग्य आहार यावर लक्ष ठेवणे हे यांचं काम.

पण कोरोना आला आणि लॉकडाऊन लागू झालं. अंगणवाडी कार्यालयात जाणारे त्यांचे सगळे मार्ग बंद झाले. २५ नवजात शिशु, ७ प्रसूती जवळ आलेल्या महिला यांची जबाबदारी रेलू यांच्या वर होती. टाळेबंदीमुळे तिथपर्यंत कसं पोहोचायचं असा मोठा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर होता.

कोरोनाच्या भीतीने त्या स्त्रिया अंगणवाडीत येऊ शकत नव्हत्या आणि त्यांच्यापर्यंत पोहोचायला मध्ये नर्मदा नदीचा अडथळा होता. 

वस्तीतल्या स्त्रिया इतरवेळेस नदी पार करून आंगणवाडीत येऊन तपासणी, आरोग्य चाचण्या करून जात, पण कोरोनाच्या भीतीमुळे त्या तिथे येण्यास कचरत होत्या.

शेवटी रेलू यांनी स्वतः त्या वस्तीत जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. धाडसी यासाठी, की तिथपर्यंत जायला रस्ता नव्हता. फक्त नदीचा प्रवास आणि थोडेथोडके नव्हे, तर तब्बल १८ किलोमीटर होडीने प्रवास करायचा होता.

त्यांनी स्थानिक नावाड्याकडून होडी घेतली आणि त्या नेमाने गरजवंत स्त्रिया आणि बाळांकडे पोहोचू लागल्या.

 

aanganvadi inmarathi1

 

२७ वर्षाच्या रेलू स्वतः दोन मुलांची आई आहे. मूळ नाशिकच्या असलेल्या रेलू यांना नर्मदा नदी नवीन नाही. नदीत पोहणे आणि होडीचा प्रवास त्यांना माहित होता.

रेलू यांना त्यांच्या या कार्याबद्दल विचारले असता त्या सांगतात, “नवजात शिशूची, त्यांच्या आईची आणि या जगात येणाऱ्या बालकांची जबाबदारी ही माझ्यावर आहे. त्यांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, त्यांच्या हक्काचे भोजन मिळावे म्हणून हा खटाटोप.”

“आता जे काही चालू आहे त्यात त्या निष्पाप जीवांचा काही दोष नाही. एक अंगणवाडी सेविका म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवणे ही माझी जबाबदारी आहे.”

 

relu vasave inmarathi1

 

समाजात मानवता शिल्लक आहे हे रेलु वसावे यांच्याकडे बघून कळते. केवळ पगार मिळतो म्हणून त्या काम करत नाहीत. जबाबदारीच्या पलीकडे जाऊन त्यांना समाजाविषयी कळवळा आहे.

अशा माणसांकडे पाहून आपल्यालाही समाजाविषयी काहीतरी करावं ही प्रेरणा मिळते. त्यांच्या कार्याला सलाम केलाच पाहिजे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?