' प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या बंदुकींच्या २१ फैरींच्या सलामी मागचा रंजक इतिहास! – InMarathi

प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या बंदुकींच्या २१ फैरींच्या सलामी मागचा रंजक इतिहास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

२६ जानेवारी म्हणजे आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन!

स्वातंत्र्यदिना एवढंच किंबहुना त्यापेक्षा जास्त या दिनाचे महत्त्व आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. या दिवशी देशभर मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

आपल्या भारतीय सैन्याकडून या दिवशी तर चित्तथरारक प्रात्यक्षिकांची मेजवानी सादर केली जाते आणि तो सोहळा देखील आवर्जून पाहण्यासारखा असाच असतो.

म्हणूनचं आजही दिल्लीपर्यत पोहोचु न शकणारी देशातील जनता, आजही सकाळी लवकर उठून टिव्हीवर दाखविला जाणारा हा नेत्रदिपक सोहळा आवर्जुन पाहतात.

 

21-gun-salute-marathipizza01
mensxp.com

 

याच दिवशी अमर जवान ज्योती स्मारकाजवळ अजून एक विशेष कार्यक्रम पार पाडला जातो.

तो कार्यक्रम असतो, २१ बंदुकींच्या फैरींच्या सलामीचा!

यापुर्वी टिव्हीवर तुम्ही हा कार्यक्रम पाहिला असेलच, पण ही सलामी कुणाला दिली जाते, त्यामागचं कारण काय हे तुम्हाला माहित आहे का…

अनेकांना वाटत असेल की सैन्यासाठी अथवा जवानांसाठी ही सलामी दिली जाते, मात्र तुमचं उत्तर तितकसं योग् नाही.

बऱ्याच जणांना माहित नाही पण ही सलामी भारताचे प्रथम नागरिक अर्थात राष्ट्रपती यांना दिली जाते.

आज आम्ही तुम्हाला याच बंदुकींच्या २१ फैरींच्या सलामीमागची रंजक कहाणी सांगणार आहोत. जी आजही भारतीयांसाठी अज्ञातच आहे.

ही प्रथा १७ व्या शतकापासून सुरु झाली जेव्हा ब्रिटीश नौदलाने असा प्रस्ताव मांडला की

युद्धाच्या पूर्वी शत्रुपक्षाला शांततेचा संदेश देण्यासाठी किंवा तसा हेतू दर्शवण्यासाठी आपण आपली युद्ध शस्त्रे (बंदुका) हवेत चालवावीत किंवा ती खाली करावीत. ज्यामुळे शत्रू पक्षाला संदेश जाईल की आम्हाला युद्धात रस नाही.

त्या काळची ब्रिटीशांकडे असलेली शस्त्रास्त्रे चालवणे म्हणजे फारच कंटाळवाणं काम होतं. त्यांना रीलोड किंवा अनलोड करण्यात बराचसा वेळ वाया जायचा. त्यामुळे बहुतेक वेळेस युद्धामध्ये शत्रूपक्षाला प्रतिकार करण्यास बराचसा वेळ मिळायचा.

हीच हानी टाळण्यासाठी, शत्रुपक्षाला “युद्धाशिवाय वाद सोडवता येऊ शकतो” असा संदेश पोचवण्यासाठी ब्रिटीश सैन्य नौकेवरून हवेमध्ये गोळीबार करायचे किंवा समुद्रात तोफा चालवायचे.

 

british-warship-marathipizza
fineartamerica.com

 

हळू हळू कालांतराने या गोष्टीचं प्रथेत रुपांतर झालं. जेव्हा कधी शत्रूसमोर आदर दर्शवायचा असेल किंवा त्यांचा सन्मान करायचा असेल तर अश्याप्रकारे हवेत गोळीबार करून सलामी द्यायची प्रथाच सुरु झाली.

आता तुम्ही विचार करत असाल प्रथेची सुरुवात तर कळली पण फक्त २१ बार उडवण्याचे कारण काय?

यामागचा एक दावा सांगतो की याचे कारण आहेत त्याकाळच्या ब्रिटीश युद्धनौका!

बायबल मध्ये ७ हा क्रमांक पवित्र मानला गेल्याने त्याकाळच्या प्रत्येक ब्रिटीश युद्धनौकांमध्ये सात तोफा किंवा सात बंदुकाच असायच्या.

त्यामुळे जेव्हा कधी शत्रूपक्षाला शांततेच्या मार्गाचा संदेश दिला जायचा तेव्हा सात तोफांमधून समुद्रामध्ये सात गोळे डागले जायचे आणि प्रत्येक तोफेमधून एक गोळा डागल्यानंतर त्या पाठोपाठ एका बंदुकीमधून गोळ्यांच्या तीन फैरी झाडल्या जायच्या.

म्हणजे सात बंदुकींमधून एकूण २१ फैरी झाडल्या जायच्या आणि हेच कारण आहे की जी प्रथा पुढे सुरु झाली त्यामध्ये बंदुकीच्या २१ फैरी अर्थात २१ बंदुकींची सलामी दिली जायची.

 

21_gun_salute-marathipizza
urbantrunk.com

 

तरीही स्वातंत्र्यपूर्व काळात जम्मू काश्मीरसारख्या काही भारतीय संस्थानांमध्ये राजांना १९ किंवा १७ फैरींची/तोफांची सलामी द्यायचा रिवाज होता.

स्वातंत्रोत्तर काळामध्ये प्रजासत्ताक दिनाची परेड वगळता नवीन राष्ट्रपतींना आणि भारताला भेट द्यायला येणाऱ्या विदेशातील प्रमुखांना देखील बंदुकींच्या २१ फैरींची सलामी दिली जायची.

सध्या भारतीय प्रजासात्ताक दिनी राष्ट्रपतींना देण्यात येणाऱ्या सलामीवेळी ५२ सेकंदांचे राष्ट्रगीत सुरु असताना दर २.२५ सेकंदांच्या अंतराने सात बंदुकींमधून तीन राउंड म्हणजेच बंदुकीच्या २१ फैरी झाडल्या जातात.

तसेच आठवडाभर चालणाऱ्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात हुतात्मा दिनी म्हणजे ३० जानेवारी रोजी देशाच्या रक्षणार्थ शहीद झालेल्या सैनिकांना बंदुकीच्या १४ फैरी झाडून सलामी दिली जाते.

ही सलामी केवळ राष्ट्राच्या प्रमुखालाच दिली जाते. जगभरात सम्राटांना १०१ तोफा वा बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली जाते.

 

21gun-inmarathi

 

आहे की नाही रंजक गोष्ट? अहो मग शेअर करा आणि इतरांनाही सांगा! आपल्या देशातील या महत्वपुर्ण पद्धतीची माहिती प्रत्येक भारतीय नागरिकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?