' या ९ कारणांमुळे तुमची ‘खास’ मैत्री तुटू शकते…कायमची! – InMarathi

या ९ कारणांमुळे तुमची ‘खास’ मैत्री तुटू शकते…कायमची!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘मैत्री’ जगातलं असं एक नातं जिथे कसलाही हिशोब नसतो. स्पर्धा नसते. काय, कुठे आणि कसं बोलाव, वागावं ह्याची बंधने नसतात. मित्र किंवा मैत्रीण हि आपल्या आयुष्यातील अशी एक व्यक्ती असते जिच्याबरोबर तुम्ही कुठल्याही टेन्शन शिवाय, मुखवट्याशिवाय, धाकाशिवाय, विचार न करता मनमोकळेपणाने वागू शकता.

आपल्या मनातील गोष्टी कुठल्याही परिणामांचा विचार न करता बोलू शकता. इन शॉर्ट, मैत्री हि आपल्या तप्त मनावर थंडगार शिडकावा असते. आपल्या आयुष्यात एक हक्काच्या विसाव्याची जागा असते. ज्या व्यक्तीला आपण हक्काने गृहीत धरतो असा आपला मित्र किंवा मैत्रीण म्हणजे आपला सोलमेट असतो.

friends-marathipizza01

 

ह्या मैत्रीच्या नात्यावर आजवर अनेक पानच्या पानं भरून साहित्य लिहिलं गेलंय. अनेक भाषांमध्ये अनेक गाणी गायली गेली आहेत. जगाच्या पाठीवर जितक्या देशात सिनेमे तयार होतात, त्या प्रत्येक देशात मैत्री वर अनेक सिनेमे तयार केले गेले आहेत.

तर थोडक्यात काय, मैत्री हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. ज्याला आयुष्यात खरे, चांगले मित्र मिळाले, तो खरा श्रीमंत ! पण ह्या अश्या जीवाला जीव देणाऱ्या मित्रांना बऱ्याच वेळा आपण गृहीतच धरतो.

मित्र नसतील तर आपलं कसं होईल? हा विचार न करता आपण बऱ्याच वेळा मित्रांना कायम गृहीत धरून हर्ट करतो आणि आपल्या विचित्र व बेजबाबदार वागण्याने मित्रांना आपल्यापासून लांब होण्यास प्रवृत्त करतो.

तुम्ही जर ह्या पैकी कुठल्याही प्रकारे आपल्या मित्राशी वागत असाल तर वेळीच थांबा! कदाचित तुमचा / तुमची बेस्ट फ्रेंड तुम्हाला कंटाळून तुमच्यापासून कायमचं लांब जाण्याचा विचार करत असेल.

आज आम्ही तुम्हाला अशीच काही ९ कारणे सांगणार आहोत ज्यामुळे तुमची जिवाभावाची मैत्री कायमची तुटू शकते!

 

१) ठेविले अनंते, तैसेची राहावे ही भावना

 

friends-marathipizza04

 

मित्रांबरोबर मजा मस्ती करताना आपण बऱ्याच वेळा हे विसरतो की कुठल्याही नात्यामध्ये जशी नातं घट्ट होण्यासाठी दोन्ही बाजूने मेहनत घ्यावी लागते, तशीच मेहनत मैत्रीमध्ये सुद्धा मैत्रीचे नातेही कायम घट्ट राहावे म्हणून घ्यावी लागते.

मैत्री करणे सोपे असते, पण मैत्री टिकवणे खूप कठीण असते. म्हणूनच काळाच्या ओघात आपण अनेक मित्रांपासून लांब होतो. कधी काळी एकमेकांशिवाय पानही न हलणारे मित्र काही काळानंतर एकमेकांचे नाव सुद्धा विसरतात.

कॉलेजमध्ये मित्रांबरोबर मज्जा करणे सोपे असते कारण ते आपल्याला सोयीस्कर असते. पण जेव्हा आयुष्य पुढे जाते, आपण अनेक गोष्टींमध्ये मेहनत न घेतल्याने अनेक मित्र गमावतो. आणि ते मित्र परत जोडण्यासाठी आपण फारशी मेहनत सुद्धा घेत नाही.

हळूहळू मैत्री तुटत जाते, आणि आपण ते सहजगत्या स्वीकारत जातो. हि परिस्थिती बदलावी म्हणून प्रयत्न करण्यापेक्षा आपण आहे त्यात समाधान मानून ‘ठेविले अनंते, तैसेची राहावे’ असे वागतो, कारण तेव्हा तसे वागणे आपल्या सोयीचे असते. अशा वागण्याने आपण आपले अनेक चांगल्या मित्रांपासून लांब होतो.

२. प्रेमाचा फिव्हर

 

friends-marathipizza05

 

कधी कधी माणूस प्रेमात पडतो, ते प्रेम मिळवण्यासाठी प्रसंगी मित्रांची सर्वतोपरी मदत घेतो, आणि मग एकदा टार्गेट त्या हाती आले कि आपल्या प्रेमाच्या माणसावरच १०० टक्के लक्ष केंद्रित करतो आणि त्या ओघात मित्रांना विसरतो.

प्रेमाचे नाते घट्ट करताना मात्र मैत्रीच्या गाठी कधी सैल होतात हे आपल्या लक्षातही येत नाही. नंतर जेव्हा आपल्या लक्षात येते की आपले मित्र आपल्यापासून दुरावले आहेत, तेव्हा वेळ निघून गेलेली असते.

 

३. एकाची प्रगती, दुसऱ्याची अधोगती

friends-marathipizza06

 

वयाच्या विशीत असताना आपण आयुष्यात काहीतरी मिळवण्याच्या ध्यासाने पछाडलेलो असतो. करियर मध्ये काहीतरी मिळवण्याच्या उद्देशाने हर तर्हचे प्रयत्न करीत असतो. ‘मी हि कुणीतरी आहे’ हे जगाला दाखवून द्यायची प्रत्येकाची इच्छा असते.

जेव्हा दोन मित्र एकाच रस्त्याने करियर ची सुरुवात करतात, एखाद्याला पटकन यश मिळते तर दुसऱ्याला बराच स्ट्रगल करावा लागतो. आयुष्याच्या एखाद्या वळणावर जेव्हा हे दोघे एकमेकांना भेटतात,

तेव्हा एकाच्या मनात जर दुसऱ्याविषयी असूया किंवा असुरक्षिततेची भावना निर्माण झाली तर ती व्यक्ती आपसूकच आपल्या त्या यशस्वी मित्राला टाळू लागते. कधी कधी हे फक्त मनाचे खेळ असतात तर कधी आजूबाजूची परिस्थिती त्यांना असे वागण्यास प्रवृत्त करते.

 

४. इगोचा शिरकाव

कधी कधी एखाद्याशी मैत्री केल्यावर आपल्याला जाणवतं की ह्या मैत्रीच्या नात्यासाठी सगळी मेहनत आपण एकटेच घेत आहोत. आपला मित्र मात्र मजेत आहे, त्याला कशाचीच फिकीर नाही.

 

friends inmarathi

 

पण कुठल्याही नात्यामध्ये फिफ्टी फिफ्टी असं परफेक्शन कधीच नसत. कायम चढउतार, उन्नीस बीस, कमी-जास्त होतच. पण आपण हे समजून न घेता आपला इगो मध्ये आणला तर हळू हळू आपण त्या मित्रापासून लांब होतो आणि चांगले नाते तुटते.

 

५. करियरचा फास आणि अपुरी वेळ

 

friends-marathipizza10

 

आयुष्यात पुढे पुढे जाताना बऱ्याच वेळा आपल्या priorities (प्राधान्यक्रम) बदलत जातात. नोकरी लागल्यानंतर बराचसा वेळ कामाच्या ठिकाणी जातो आणि मित्रांच्या भेटी गाठी व्हायला वेळ मिळत नाही किंवा तो अनवधानाने काढला जात नाही.

हळू हळू तुम्ही तुमच्या मित्रांविना आयुष्य कंठायला शिकता .पण जेव्हा लक्षात येतं की करियर च्या नादात आपण आपले चांगले मित्र गमावले आहेत, तेव्हा वेळ निघून गेलेली असते.

 

६. अपेक्षित नसलेला नकार

 

friends-marathipizza08

 

ज्या गोष्टी करायला आपल्या घरातली माणसं आपल्याला सपोर्ट करत नाहीत त्या गोष्टींसाठी आपण आपल्या मित्रांचा सपोर्ट शोधतो. कारण मित्र ज्या प्रकारे आपल्याला सगळ्या गोष्टीत साथ देतात त्या प्रकारे कोणीही देत नाहीत.

आपल्याला पूर्ण खात्री असते की जगात कुणीही आपल्याला समजून घेतलं नाही तरी मित्र नक्की समजून घेईल आणि प्रत्येक चांगल्या वाईटात आपल्यामागे भक्कम आधार म्हणून उभा राहील.

पण कधी जर मित्राने हा विश्वास सार्थ न ठरवता आपल्या कुठल्या निर्णयामध्ये सपोर्ट केला नाही तर अशा वेळी आपले मन दुखावते आणि आपण त्या मित्रापासून मनाने दुरावतो. मानवी मन नकार पचवू शकत नाही आणि मित्राकडून नकार आला तर त्याची परिणीती मैत्री तुटण्यात होते.

 

७. असूयेचे गालबोट

friends-marathipizza09

 

कधी कधी आपल्या मित्राने नव्या लोकांशी मैत्री केली तर पजेसिवनेसची आणि असुरक्षिततेची भावना मनात येऊ शकते. आपल्या मित्राला आपण सोडून दुसऱ्या व्यक्तीशी मैत्री करावीशी वाटली ही भावना मनात कटुता आणू शकते. जितका जास्त पजेसिवनेस तितका मैत्रीला धोका.

 

८. नव्याने भेट पण संवाद अपुरा

friends-marathipizza02

 

कधी कधी वेगवेगळ्या गावी राहायला गेल्याने मित्रांशी वर्षानुवर्षे भेट होत नाही. मध्ये काही वर्ष निघून जातात, वेळ बदलते तशी माणसं बदलतात. खूप वर्षांनी भेट झाल्यावर लक्षात येते की आपला मित्र बदललाय आणि अशा वेळी त्याच्याशी संवाद साधणे, मैत्री टिकवून ठेवणे कठीण होते.

 

९. गैरसमजाचे ग्रहण

friends-marathipizza07

 

कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी मोकळेपणाने न बोलल्याने मनातले गैरसमज व कटुता वाढत जाते ज्याचा परिणाम मैत्री संपण्यात होतो. म्हणूनच जे काय आहे ते मित्राशी मोकळेपणाने बोला, मोकळेपणाने भांडा, पण परत एकमेकांना माफ करून एकमेकांसाठी भक्कमपणे उभे राहा.

तुम्हीसुद्धा असे काही नकळत वागत असाल तर आपल्या वागण्यात वेळीच बदल करा. मित्र असा वागत असेल तर त्यालाही बदल आवश्यक आहे असे सुचवा. कारण मैत्री तुटणे कुणासाठीही कधीच आनंददायी नसते.

दोस्त है तो जिंदगी है.. और जिंदगी जिने के लिये हर एक फ्रेंड जरुरी होता है!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?