' बाकरवडी फेम  ‘चितळे बंधू’ यांची तितकीच चटपटीत कहाणी… – InMarathi

बाकरवडी फेम  ‘चितळे बंधू’ यांची तितकीच चटपटीत कहाणी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बाकरवडीचं नाव जरी काढलं तरी सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. आणि ती बाकरवडी चितळेंची असेल तर मग तिची बातच काही और आहे. खरं तर बाकरवडी म्हटलं की चितळेंचच नाव समोर येतं.

दुकान उघडताच अवघ्या ३-४ तासांमध्ये दुकानातील अक्खा माल संपून जातो, म्हणजे या बाकरवडीचे लोक किती चाहते आहेत हे कळतंच. पण बाकरवडीच्या तिखट आणि आंबट – गोड चवीची जादू हि फक्त महाराष्ट्र किंवा भारत इथपर्यंतच सीमित नाही.

आज देश विदेशातही मोठ्या मनाने तिने स्वतःचे चाहते निर्माण करून घेतले आहेत.

पण तुम्हाला माहित आहे का कि महाराष्ट्राच्या अत्यंत आवडीची ही चटकदार, खमंग आणि खुसखुशीत बाकरवडी मूळची महाराष्ट्राची नाहीच ती?

नसेल माहिती तर जाणून घेऊया बाकरवडी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राची ओळख कशी बनली याचा प्रवास. चितळे ग्रुप ऑफ कंपनीज हे फक्त एक नाव नाही, तर ४ पिढ्यांनी जपलेला वारसा आहे.

 

chitale bandhu inmarathi

 

त्याची सुरुवात भास्कर गणेश चितळे यांनी १९३९ साली साताऱ्यात “चितळे डेरी” ने केली. १९३० साली हि त्यांनी असाच उपक्रम सुरू केला होता पण दुर्दुवाने त्यात त्यांना अपयश आलं.

पण अपयशामुळे खचून न जाता त्यांनी पुन्हा हा व्यवसाय सुरु केला.

त्यांच्या दुग्ध पादार्थांच्या क्वालिटी मुळे त्यांना बाजारातून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला व पुढे रघुनाथ भास्करराव चितळे यांनी व्यवसाय विस्तारण्याचे काम हाती घेऊन, मुंबईत चितळे डेरीची शाखा उघडली.

पुढे ते पुण्यात स्थायिक झाले व १९५० साली श्री रघुनाथराव चितळे व नरसिंहराव चितळे या दोन बंधूंनी यांनी पुण्याच्या बाजीराव रोड येथे “चितळे बंधू मिठाईवाले” ची पहिली शाखा सुरु केली.

तिथे ताज्या श्रीखंडापासून गोड व चिवडा, फरसाण शेव, अशा चटपटीत पदार्थांचे उत्पादन सुरू केले.

व्यवसाय जोमाने सुरु झाला आणि त्यांनी १९५० साली पुण्यात ५०० स्क्वेयर फूट ची आपली हक्काची अशी एक जागा पुण्यात विकत घेतली, जी आज चितळे बंधू मिठाईवाल्यांचे मुख्यालय म्हणून ओळखली जाते.

त्यानंतर १९७० साली रघुनाथराव चितळे गुजरातच्या दौऱ्यावर आले असता, “जगदीश फरसाणच्या” बाकरवडीने त्यांचे लक्ष वेधले. गुजराती बाकरवडी जरा चवीला गोड होती पण त्यातील मसाल्याचे ते अविस्मरणीय कॉम्बिनेशन त्यांच्या डोक्यात घट्ट बसले.

 

chitale bandhu featured inmarathi

 

महाराष्ट्रात येऊन त्यांनी बाकरवडीवर एक प्रयोग केला, तिला महाराष्ट्रीय लोकांच्या “तिखट” खाण्याच्या प्रेमामुळे त्यांनी बाकरवडी चे तिखट स्वरूप तयार करून, आपल्या पुण्याच्या चितळे बंधू मिठाईवालेच्या शाखेवर विकरी सुरु केली.

लोकांना हि बाकरवडी इतकी भावली, कि पाहता पाहता संपूर्ण महाराष्ट्राला आता बाकरवडी वर प्रेम झाले होते. दुकान सुरु करताच अवघ्या ३ – ४ तासात संपूर्ण बाकरवडीचा माल विकल्या जायचा.

हळू हळू बाकरवडीची मागणी वाढू लागली आणि चितळे बंधू मिठाईवाले हि मागणी पूर्ण करण्याची कोणतीही संधी हातून जाऊ देत नव्हते. ग्राहकांना संतुष्ट करणे हाच ध्यास घेऊन बाकरवडीचे उत्पादन वाढत गेले.

१९७० च्या दशकात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे रघुनाथरावांना जपान दौऱ्यावर धाडण्यात आलं. तिथल्या इंडस्ट्रीजचे झालेले यांत्रिकीकरण पाहून ते थक्कच झाले.

जितक्या वेगानं तिथे कामे होत होती, ते पाहून त्यांना प्रेरणा मिळाली. १९८९ साली भरपूर वर्षांच्या संशोधनाने युरोपच्या जर्मनी अनो हॉलंड मधून खास बाकरवडी बनवण्यासाठी मशीन डिजाईन करून घेऊन त्या मशिन्स भारतात आणल्या गेल्या.

यामुळे आता चितळे बंधू मिठाईवालेचे अर्धे यांत्रिकीकरण झाले होते. ९० च्या दशकात बाकरवडी चे उत्पादन व खप हे दिवसाला ३०० किलो इतके झाले होते.

 

bakarwadi inmarathi

 

वाढत्या मागणीमुळे त्याकाळात जी रघुनाथरावांनी मुंबईच्या प्रभादेवी बरोबर, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात येथे हि चितळे बंधूंच्या शाखा सुरु केल्या. त्याकाळी शाखा असणं हि जरा निराळी आणि नवीन गोष्ट होती.

पण चितळेंनी त्यात यश मिळवून दाखवलं. २०१२ पर्यंत त्यांच्या सगळ्या शाखा संपूर्णपणे ऑटोमेटेड झाल्या होत्या आणि दिवसाला ३००० किलो बाकरवडी चे उत्पादन करत होत्या.

आणि आज हा आकडा भरपूर वाढलेला दिसून येतो, एकटी पुण्याची शाखाच आज बाकरवडी चे एका तासाला ८५० किलो उत्पादन करते. आणि विशेष म्हणजे, इतके उत्पादन करूनही दिवासाखेर बाकरवडी शिल्लक राहत नाही.

जिथे शाखा आहेत, तिथल्या सगळा माल संपतो आणि पॅकिंग सुद्धा मशीन ने होत असल्या कारणाने बाकरवडीची शेल्फ लाईफ हि वाढली आहे ज्यामुळे विदेशातून होणारी बाकरवडीची मागणी सुद्धा पूर्ण करण्यात चितळे बंधू मिठाईवालेंना मोठं यश आलंय.

दूध सोडता, चितळेंच्या सगळ्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय उत्पादनांपैकी, म्हणजे आंबा बर्फी, पेढे, श्रीखंड बाकरवडी सगळ्यात जास्त विकली जाते.

बाकरवडी आज त्यांची ओळखच बनली आहे हे हि म्हणायला हरकत नाही. “बाकरवडी म्हणजे चितळे” हे समीकरण जगाच्या हृदयात अगदी घट्ट बसलंय. आणि का नाही बसणार?

 

chitale products inmarathi

 

कारण बाकरवडीवर मूळ हक्क जरी गुजरातचा असला तरी तिला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध करण्याचे काम चितळेंनी केले.

अमेरिका, सिंगापोर आणि इस्रेल मध्ये सुद्धा आज चितळ्यांच्या शाखा आहेत आणि तिथे सुद्धा बाकरवडी प्रेम हे भारता प्रमाणेच आहे.

चितळ्यांची सरासरी वार्षिक उलाढाल २०० करोड इतकी असून दिवसाला २००० – २५०० ग्राहक त्यांची उत्पादने खरेदी करतात.

१९३० चा डेरी चा व्यवसाय बुडण्यापासून, “चितळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज” हे साम्राज्य उभारण्या मागे चार पिढ्यांची मेहनत, चिकाटी आणि चितळे ब्रँड प्रति असलेले समर्पण दर्शवते.

आज चितळे बंधू मिठाईवाले बरोबर चितळे ऍग्रो, चितळे डिजिटल्स, चितळे फूड, चितळे डेरी इतक्या क्षेत्रांत चितळ्यांचे नाव झळाळते आहे.

एक सामान्य माणूस सुद्धा आपल्या चिकाटीने व बदलत्या काळाशी मैत्री करून त्या प्रमाणे स्वतःत अजून सुधारणा व बदल करून एवढे मोठे साम्राज्य उभे करू शकतो याचे “चितळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज” हे एक उत्तम उदाहरण आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?