' चिमुरडीने घेतलाय पुण्यातील मुठा नदी स्वच्छ करण्याचा वसा, तुम्हीही व्हाल ना सहभागी? – InMarathi

चिमुरडीने घेतलाय पुण्यातील मुठा नदी स्वच्छ करण्याचा वसा, तुम्हीही व्हाल ना सहभागी?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘पाणी’ जगण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक गोष्टींपैकी एक. आपल्या शरीरातही ७०% निव्वळ पाणीच असतं. पाणी म्हणजे आपल्या पंचमहाभूतांतला सर्वात महत्वाचा घटक. त्याशिवाय सृजन अपूर्ण आहे, म्हणूनच पाण्याला जीवन म्हंटलं जातं.

पाण्याशिवाय सृष्टीची कल्पनाच अशक्य. धर्मातही पाण्याला अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे. पाण्याचं आपल्या आयुष्यातलं स्थान आपल्याला चांगलंच माहित आहे.

निसर्ग आपल्याला भरभरून देत आलाय आणि देतही राहील. पाणी ही मानवाला निसर्गाने दिलेली अमूल्य भेट आहे, पण मानवाला त्याची किंमत आहे का?

फिरायला जायचं म्हंटलं, की आपण समुद्र किंवा नदी असलेल्या स्थळांना तिथे भेटी देतो, मात्र आपल्यापैकी किती जणांना त्याच जीवनदायिनी नदीच्या पाण्यात साठलेला, तरंगत असलेला कचरा अस्वस्थ करतो? आपल्यापैकी किती जण अशा ठिकाणी जबाबदारीने वागतात?

आज आम्ही तुमच्यासाठी अशाच एका चिमुरडीच्या प्रेरणादायी चळवळीची माहिती घेऊन आलो आहोत. जी आपल्याला अंतर्मुख करणारी आहे.

ही गोष्ट हे शाल्मली नलावडे ह्या जागरूक मुलीची. जिने आपल्या वयाच्या मनाने कितीतरी पट जास्त समजूतदारपणा दाखवत एका नव्या बदलाची सुरुवात केली.

 

shalmali pune mutha river inmarathi

 

शाल्मली ११ वर्षांची असताना आपल्या वडिलांसोबत पुण्याचा वारजे पूल पार करत होती. तेवढ्यात तिने कोणालातरी मुठा नदीच्या पात्रात कचऱ्याची पिशवी टाकताना पहिलं.

छोट्याशा शाल्मलीने लगेच वडिलांना विचारलं, “हे लोक नदीत कचरा का टाकतात? असं करायला नकोय त्यांनी. आपण हे थांबवण्यासाठी काय करू शकतो?”

शाल्मलीचे वडील सचिन नलावडे हे उद्योजक आहेत, शिवाय त्यांनी शाल्मलीचे होम स्कुलिंग केले असल्याने, ते कायम तिला तिचा विचार करण्यास प्रवृत्त करत असतात. ह्या गोष्टी बद्दल तिला स्वतःला काय वाटतं असा त्यांनी तिला प्रतिप्रश्न केला.

हा प्रश्न ऐकून, मी स्वतः लोकांना कचरा टाकण्यापासून रोखण्यासाठी इथं उभी राहीन, असा विचार बोलून दाखवला आणि नुसता बोलूनच दाखवला नाही तर त्याप्रमाणे वागलीही.

तिने चक्क तिथे उभं राहून अनेकांना नदीच्या पात्रात कचरा न टाकण्याविषयी विनंती केली आणि लोकांना नदी घाण करण्यापासून परावृत्त केलं.

पण असं किती जणांना थांबवणार? पूर्ण वेळ तिनं तिथं उभं राहणं केवळ अशक्य होतं, तिने मुठा नदीच्या वेटलँड संवर्धनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांच्या संघटनेला जॉईन केलं आणि त्यांच्यातली सर्वात कमी वयाची स्वयंसेविका बनण्याचा मान मिळवला.

आता शाल्मली नदी स्वच्छ करण्याच्या कार्यात सहभागी झाली. गेली तीन वर्षे ती नदीच्या स्वच्छतेसाठी काम करतेय, ह्या वर्षांत तिला ह्याबाबत अनेक अनुभव आले.

 

shalmali pune mutha river inmarathi1

 

त्याबद्दल ती सांगते की, “नदीच्या किनाऱ्यावरून चालताना आपण नदी किनाऱ्यावरून नव्हे तर कचऱ्याच्या मैदानातून चालतोय असं वाटावं इतकी घाण नि कचरा नदीच्या काठाशी होता. प्लॅस्टिच्या बाटल्या, तुटलेल्या चपला, काचेच्या बाटल्या, फाटके कपडे आणि काय काय…

कोणीतरी तर आपला जुना सोफादेखील किनाऱ्यावर टाकून दिला होता.” हे सगळं पाहून शाल्मलीचा निश्चय आणखी पक्का झाला. तिचं एकच स्वप्न, एकच ध्येय ते म्हणजे नदी कचरा मुक्त करणे. तिला नदीचं पाणी शुद्ध आणि नितळ झालेलं बघायचं होतं.

ह्यात तिला आणखी मदतीची गरज असल्याने तिने आपल्या ध्येयाबद्दल आपली मित्रमंडळींना सांगितलं आणि ती मुलंही आनंदाने तिच्या ह्या मोहिमेत सामील झाली.

तरुण पिढीचा असा उत्साही स्वभाव पाहून “जीवितनदी” एनजीओच्या संस्थापकांपैकी एक असणाऱ्या, अदिती देवधर मुलांमधील ही जागरूकता आणि त्यासाठी काम करण्याची, कष्ट घेण्याची असलेली त्यांची तयारी पाहून आनंद झाल्याचे सांगतात. शिवाय शाल्मलीच्या ह्या निर्णयात तिच्या आईवडिलांनी तिला दिलेला पाठिंबा ह्याचे विशेष कौतुक करतात.

आपल्याकडे ‘शिवाजी जन्मावा, पण शेजारच्या घरी’ असं म्हणतात. अशावेळी शाल्मलीचे वडील, आई मुग्धा आणि भाऊ सृजन ह्यांनी तिच्या ह्या कार्याला दिलेला पाठिंबा फार महत्वाचा आहे.

 

shalmali pune mutha river inmarqathi

 

प्रगतीच्या नावावर दिवसेंदिवस वाढत चाललेला पर्यावरणाचा ऱ्हास कमी करणं, थांबवणं फार आवश्यक झालेलं आहे. कारण आपण कितीही प्रगती केली, कितीही तंत्रज्ञान विकसित केलं, तरीही मानवाच्या आयुष्यात पाणी, अन्न आणि प्राणवायू ह्यांना कोणतीच गोष्ट बदलू शकत नाही. शिवाय त्यांची निर्मितीही अशक्यच! त्यामुळे आहे त्या नैसर्गिक स्रोताचे रक्षण करणे, संवर्धन करणे, जपणे, वाढवणे हे अतिशय आवश्यक आहे.

चला तर जसा शाल्मलीने निर्धार केला तसा आपणही करूयात, नद्यांचे संवर्धन करण्यात हातभार लावण्याची शपथ घेऊया.

निसर्ग हजार हातांनी आपल्याला देतच असतो. कधीही भेदभाव करत नाही. त्यामुळे त्याच्या ह्या देत राहण्याची जाणीव ठेवत, कृतज्ञता बाळगत आपल्या निसर्गाचे रक्षण, त्याचे संवर्धन करणे ही आपलीच जबाबदारी आहे आणि गरजही.

वरील विषयावरील अधिक माहिती तुम्ही येथे मिळवू शकता

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?