' तब्बल ८ वर्षे लढवत ठेवलेल्या ह्या किल्ल्यावर मराठा सम्राज्याची छाप आजही उठून दिसते! – InMarathi

तब्बल ८ वर्षे लढवत ठेवलेल्या ह्या किल्ल्यावर मराठा सम्राज्याची छाप आजही उठून दिसते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मराठ्यांचा गौरवशाली इतिहास सुरू होतो तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून. अवघ्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून घेणे, अफजलखान वध, शाहिस्तेखानावर हल्ला, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका, छत्रपती म्हणून राज्याभिषेक आणि दक्षिण दिग्विजय.

यामधली प्रत्येक घटना ही तत्कालीन परिस्थिती मध्ये ‘रिबेल’ होती असं म्हणण्यात काहीच हरकत नाही.

 

shivajin-mharaj-inmarathi

 

मुघल, इंग्रज, सिद्दी यांच्या नाकावर टिच्चून महाराजांनी मराठ्यांचं स्वतंत्र राज्य प्रस्थापित केले. तेवढंच मजबूत आरमार उभारून जमिनीसोबत पाण्यात सुद्धा आपलं साम्राज्य प्रस्थापित केले.

या सगळ्या गोष्टींमध्ये शेवटी अधोरेखित होते ते म्हणजे दक्षिण दिग्विजय! स्वतःला मराठा साम्राज्याचे छत्रपती घोषित केल्यानंतर महाराजांनी केलेली सगळ्यात मोठी स्वारी म्हणजे दक्षिण दिग्विजय.

महाराजांचा प्रताप आणि पराक्रम पाहता गोवळकोंड्याच्या कुतुबशाहाने महाराजांसमोर मैत्रीचा प्रस्ताव ठेवला आणि स्वतः महाराजांच्या स्वागतासाठी जातीने हजर होता.

सावत्र भाऊ व्यंकोजी सोबत पुन्हा संबंध प्रस्थापित केले. आणि याच दक्षिण दिग्विजयात महाराजांनी जिंकून घेतला तो दक्षिणेतला बुलंद किल्ला जिंजी!

तर आपण याच जिंजीच्या किल्ल्याबद्दल जाणून घेणार आहोत. शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात रामचंद्रपंत अमात्य म्हणतात,

“साल्हेरी अहिवन्तापासून ते चंदी कावेरी तीरापर्यंत निश्कंठक राज्य. शतावधी दुर्ग, चाळीस हजार पागा, दोन लक्ष पदाती. ऐसी केवळ सृष्टीच निर्माण केली.”

शिवाजी महाराजांनी आपल्या हयातीत निर्माण केलेल्या हिंदवी साम्राज्याचे वर्णन या दोन ओळींमध्ये कळून येते. यामध्ये चंदी म्हणून जो उल्लेख झालेला आहे तो म्हणजे दक्षिणेतील मराठा साम्राज्याचा किल्ला जिंजी!

 

gingee inmarathi

 

जिंजी शहराच्या पश्चिमेला कृष्णगिरी, चंद्रगिरी आणि राजगिरी हे तीन मोठे डोंगर आहेत. आणि हे तिन्ही डोंगर तटबंदीने सुरक्षित केले गेले आहेत.

पूर्व घाट तामिळनाडू मध्ये याच भागातून येतो. दगडी भागात सर्वत्र उगवणाऱ्या काहणडळाची झाडे येथे सर्वत्र पाहायला मिळतात. सध्याच्या तामिळनाडू शासनाच्या मुत्ताकडू या संरक्षित क्षेत्रात जिंजीचा हा समूह येतो.

स्थानिक तामिळ भाषेत या किल्ल्याला चेंगी किंवा सेंजी म्हटलं जातं. सेंजी अम्मा या देवीच्या नावावरून किल्ल्याला नाव पडले सेंजी. ज्याचा अपभ्रंश होऊन झालं जिंजी.

तीन डोंगरावर टप्प्याटप्प्याने काम करून आजचा जिंजी किल्ला निर्माण झालेला आहे.

१२ व्या शतकात अनंत कोण या दक्षिणेतील कोंणार साम्राज्याच्या राजाने राजगिरी डोंगर विकसित करून किल्ला तयार करण्याचे काम सुरू केले. कृष्ण कोण राजाने कृष्णगिरी डोंगर त्याच्या काळात विकसित केला.

विक्रम चोल या चोल राजाने किल्ला पूर्ण विकसित केला असा इतिहासात उल्लेख आहे.

चोल नंतर हा किल्ला विजयनगर साम्राज्याचा भाग झाला आणि त्यानंतर आदिलशाही. प्रत्येक राजाने त्यावर आपल्या प्रमाणे बदल घडवत आणले.

शिवाजी महाराजांनी १६७७ मध्ये हा किल्ला नासिर मुहम्मद या किल्लेदाराला नमवून आदिलशाही कडून जिंकून घेतला आणि आपल्या दक्षिणेत असलेल्या राज्याची राजधानी बनवले.

तिन्ही डोंगराचे महाराजांनी पुन्हा नामकरण केले. शारंगगड, गर्वगड आणि मदोन्मत्तगड! शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेल्या या किल्ल्याचे महत्त्व मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामात दिसून येते.

 

gingee 2 inmarathi

 

संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठा साम्राज्य गिळंकृत करायला निघालेल्या औरंगजेबाच्या मुघल फौजेने राजधानी रायगडला वेढा घातला.

छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई, मुलगा शाहू, छत्रपती राजाराम महाराज हे तेव्हा वेढ्यात अडकले होते.

छत्रपती राजाराम आणि युवराज शाहू यांच्या सोबत छत्रपतींचा पूर्ण परिवार तेव्हा रायगडावर अडकला होता. परिस्थिती लक्षात घेता राजाराम महाराज रायगडावरून निसटले आणि थेट आले ते दक्षिणेत जिंजीच्या किल्ल्यावर.

राजाराम महाराजांचा पाठलाग करता करता मुघल सेनापती झुल्फिकारखान हा जिंजी पर्यंत येऊन पोहोचला आणि त्याने जिंजीला वेढा घातला.

वेढा फोडण्याचा बराच प्रयत्न धनाजी जाधव या मराठा वीराने केला पण वेढा काही हटेना. अशाच झालेल्या एका गनिमी काव्यामध्ये राजराम महाराज जिंजी वरून निसटून परत महाराष्ट्रात परतले.

दुसऱ्यांदा राजाराम महाराज हातातुन निसटले आणि चिडलेल्या मुघलांनी सर्वशक्तिने किल्ल्यावर हल्ला चढवला. रसद संपल्यामुळे मराठ्यांनी शरणागती पत्करली आणि ७ फेब्रुवारी १६९८ ला किल्ला मुघलांच्या हातात गेला.

रायगडावरून निसटल्यानंतर राजाराम महाराजांना आश्रय घेण्यासाठी महाराष्ट्रात किल्ला सुरक्षित नव्हता.

कारण औरंगजेबने आपली भलीमोठी फौज महाराष्ट्रात उतरवली होती आणि मराठ्यांच्या सगळ्या महत्वाच्या किल्ल्याना त्याने वेढा घातला होता.

जिंजी महाराष्ट्रापासून लांब असल्याने मुघल फौजेची एक मोठी तुकडी राजराम महाराजांच्या मागावर आली आणि याचाच फायदा घेत पुन्हा राजाराम महाराज जिंजीवरून निसटून महाराष्ट्रात परत आले.

 

chatrapati rajaram inmarathi

 

मुघलांची केलेली ही दमछाक मराठयांना महाराष्ट्रात पुन्हा भरारी घेण्यास महत्त्वाची ठरली. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या मराठा योध्यानी औरंगजेबासहित अख्ख्या मुघल फौजेला जेरीस आणले होते.

राजराम महाराजांच्या काळात जिंजीचे महत्त्व हे प्रकर्षाने दिसून आले होते.

मराठ्यांच्या नंतर हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. मुघलांनंतर कर्नाटकी नवाब यांचं शासन आल्यानंतर हा किल्ला त्यांच्याकडे गेला.

पुढे हैदरअलीला नमवून फ्रेंचांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. अंततः १७६१ ला अँग्लो फ्रेंच युद्धात ब्रिटिशांनी फ्रेंचांचा पराभव करून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

तो देश स्वतंत्र होई पर्यंत ब्रिटिशांच्या ताब्यात राहिला. अनेक शतके आणि अनेक राज्यकर्ते पाहिलेल्या या जिंजीच्या किल्ल्याचा इतिहास हा मराठ्यांशिवाय पूर्ण होत नाही.

मराठा साम्राज्याचे छत्रपती आश्रयाला येतात आणि त्यांच्या जाण्यानंतर तब्बल आठ वर्षे हा किल्ला मराठ्यांनी लढवत ठेवला होता. मराठ्यांची छाप आजही या भागात उठून दिसते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?