' पोर्तुगीजांचे सैन्य…लढाईत फितूर पती; संकटांवर मात करणाऱ्या या राणीच्या शौर्याला सलाम हवाच – InMarathi

पोर्तुगीजांचे सैन्य…लढाईत फितूर पती; संकटांवर मात करणाऱ्या या राणीच्या शौर्याला सलाम हवाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

यत्र नार्यस्तु पूज्यते, रमन्ते तत्र देवता।

भारतीय परंपरेत स्त्रीचे महत्व अनन्य साधारण आहे. ती नवदुर्गा आहे, ती आदिशक्ती आहे, आदिमाया आहे. माता, बहीण, वहिनी, नणंद, मामी, आत्या इत्यादी नात्याने बांधली आहे.

स्त्रीने ठरवले तर ती स्वर्गसुख धरतीवर आणू शकते. इकडची दुनिया तिकडे करू शकते. ती कठीण प्रसंगी दुर्गा, भवानी, महीषासुर मर्दिनी आहे. प्रेमळ माता, कर्तबगार पत्नी, मायाळू बहिण व इतर कोणत्याही भूमिका ती सहजपणे, मनापासून वठवते.

भारतात कितीतरी महान स्त्रिया होऊन गेल्या ज्यांनी इतिहास रचला, घडवला व इतिहासात अजरामर झाल्या. राणी लक्ष्मीबाई, राणी चेन्नम्मा, जिजाबाई, कल्पना दत्त, प्रीतीलता वड्डेदार, सरोजिनी नायडू, मदर टेरेसा, आनंदी जोशी, किरण बेदी, कल्पना चावला, सुनिता विल्यम अहो किती नावे घेण्यासारखी! या स्त्रियांनी कठीण परिश्रमांनी, कामावरील प्रेमाने, प्रामाणिक कष्ट घेऊन वैश्विक प्रगती साधली.

 

 

राजकारण, समाजकारण, अर्थकारण यांमध्ये सुरुवातीला स्त्रीला महत्व दिले जात नसे. “चूल आणि मूल” या पर्यंत तिचे जग मर्यादित, पण आज पुरूषप्रधान संस्कृतीत ती खूप पुढे गेलेली आहे.

ती आज देशाचं पंतप्रधान, राष्ट्रपतीपद भूषवते. स्थल, जल, वायु या तिन्ही दलात प्रमुख पदांवर आपण तिला पहातो. स्त्रिला तुच्छ समजणारे आता तिच्याकडे सन्मानाने, आदराने बघू लागले आहेत.

आता स्त्रिया सर्व क्षेत्रात पुढे आलेल्या दिसतात कारण बुद्धी, मेहनत, तळमळ, कामावरील प्रेम, ते परीपूर्ण करण्याची तिची जिद्द अन् ताकद!

काही नावे इतिहासजमा झाली आहेत. काही तर आपल्याला माहीत पण नाहीत. त्यातील एक नाव राणी अब्बक्का चौटा! ऐकलंय का हे नाव कधी?

२००९साली या नावाने एक तटरक्षक नौकादलात सामिल करण्यात आली होती. या राणीचे दुसरे नाव “अभया राणी”! जिला भिती हा शब्दच माहित नव्हता. हा शब्द तिच्या कोशातच नव्हता.अब्बक्काचा जन्म उल्लालच्या चौटा राजघराण्यात झाला होता.

 

 

या राजघराण्यात मातृप्रधान संस्कृती नांदत होती. या प्रथेप्रमाणे घरातील मुलींना सर्व हक्क, संपत्ती दिली जाते. स्त्री ही घराण्याची प्रमुख असते. मुलीला सगळीकडे प्रथम हक्क दिला जातो. या परंपरेप्रमाणे अब्बक्काचे मामा तिरूमला राय यांनी तिला उल्लाल राज्याचे राणीपद बहाल केले.

राजघराण्याची परंपरा म्हणून तिला अश्वरोहण, तीरंदाजी, लढाया करणे, राज्यव्यवस्था सांभाळणे, शासनाचा कारभार इत्यादी गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात आले.

अब्बक्का राणीच्या राज्यात सर्व धर्माची, जातीची माणसे एक दिलाने, एकजुटीने व सौख्याने नांदत होती. राज्यहित बघणारी राणी असल्यामुळे ती खूपच लोकप्रिय होती. प्रजाजनांना ही राणी खूप आवडे. ती न्यायप्रिय, प्रजाहित दक्ष, प्रजेची आई प्रमाणे काळजी घेणारी अशी ती होती.

 

rani abbaka chowta inmrathi2

 

लढाईमध्ये अग्निबाणांचा वापर ती करे. ती शूर, वीर, निडर होती. मामा तिरूमला राय यांनी अब्बक्काचे लग्न मंगळूर मधील बंगा घराण्यातील राजा लक्षमप्पा अरसा यांचे बरोबर लावून दिले. लग्नाच्या काही दिवसांनंतर अब्बक्का पतीला सोडून माहेरी आली. याचे काय भयंकर परिणाम भोगावे लागतील याची तिला कल्पना नव्हती.

पोर्तुगीजांनी समुद्र मार्गाने भारतात प्रवेश केला. दूरचा प्रवास करून वास्को द गामाने कलिकत मध्ये प्रवेश केला. मसाल्याचा व्यापार करायच्या आशेने, दिल्लीचे तख्त काबीज करायचे असा दुष्ट विचार त्यांनी केला होता.

हिंदी महासागर परिसरात, भारत, मस्कत, श्रीलंका, चीन येथे किल्ले बांधणी करण्यात आली. १५२६ मध्ये पोर्तुगीजांनी मंगळूर बंदर जिंकले व आपला मोर्चा उल्लाळकडे वळवला.

हे राज्य राजा तिरूमला ३ यांच्या आधिपत्याखाली होते. पोर्तुगीजांना हे राज्य हवे होते म्हणून अब्बक्काने कर भरावा अशी जबरदस्ती केली, पण राणीने या गोष्टीला ठार नकार दिला. १५५५मध्ये चढाई झाली, पण राणीने त्यांना पराभूत केले.

१५५७ ला परत मंगळूर लूटून बरबादी केली. १५६८ला उल्लालवर हल्ला चढवला. राणीने निकराचा लढा दिला, पण पोर्तुगीज जिंकले. राणीला मशिदीत आश्रय घ्यावा लागला. त्याच रात्री २०० सैनिकांना एकत्र करून तिने जोरदार लढाई केली. यात पोर्तुगीज जनरल मारला गेला.

 

rani abbaka chowta inmrathi3

 

कित्येक सैनिक बंदीवान झाले, कित्येक पळून गेले, मग राणीने पोर्तुगीजांकडून मंगळूचा किल्ला काढून घेतला. १५६९ साली मंगळूर, कुंदपूरावर कब्जा केला. अब्बक्काही त्यांच्या साठी धोका बनून राहीली होती.

१५७० मध्ये अब्बक्काचे पती पोर्तुगीजांना जाऊन मिळाले व उल्लाळवर हल्ला चढवला. यावेळी अहमदनगरचे सुलतान अन् कालीकतचे राजा यांच्याशी राणीने संगनमत करून लढाई केली. त्यात किल्ला नष्ट करून टाकला, यात जनरल मारले गेले. पतीने केलेली फसवणूक यामुळे अब्बक्का पकडली गेली, तिला राजकैदी बनवले गेले, पण ती जीवात जीव असे पर्यंत लढली.

राणी अब्बक्का सशक्त महिला म्हणून इतिहासात अजरामर झाली. राजनीतीज्ञ, उत्तम शासक, सर्वधर्मसमभाव, उत्तम सेनानी म्हणून इतिहास तिचे नाव अभिमानाने घेईल. दर पिढी तिचा आदर्श ठेवेल.

लोककथा- लोकगीतामधून तिची कहाणी ऐकवली जाते. यक्षगान हा कर्नाटकातील पारंपारिक नाट्यशैलीआहे. त्याद्वारे अब्बक्काच्या गोष्टी नव्या पिढीला सांगितल्या जात आहेत. या व्यतिरिक्त भूतकोला या नृत्यशैलीतून राणीचे गुणवर्णन केले जाते. वीर राणी अब्बक्का उत्सव उल्लाल येथे आजही साजरा केला जातो. प्रतिष्ठित महिलांना वीर राणी अब्बक्का प्रशस्तीपत्रकांनी गौरविले जाते.

पोर्तुगीजांशी लढणारी अब्बक्का ही भारतीय महिला स्वातंत्र्यसेनानी आहे. भारतीय इतिहासात अब्बक्काचे नाव सोनेरी अक्षराने लिहीले गेले आहे. तिला त्रिवार सलाम!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?