' मंदिरामध्ये घातल्या जाणाऱ्या प्रदक्षिणेमागे शास्त्रीय कारण आहे बरं! कोणतं? वाचा – InMarathi

मंदिरामध्ये घातल्या जाणाऱ्या प्रदक्षिणेमागे शास्त्रीय कारण आहे बरं! कोणतं? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या धर्मात सांगितलेल्या कित्येक गोष्टी आपण श्रद्धा म्हणून लहानपणापासून करत असतो. यातल्या बऱ्याच गोष्टींमागचं विज्ञान जाणून न घेता, केवळ सगळे करतायत म्हणून आपणही ती गोष्ट करतो.

काही वर्षांनी जेव्हा आपल्याला त्याबद्दल कोणी विचारतं, तेव्हा बऱ्याचदा आपल्याकडे लॉजिकल कारण नसतं, कारण आपण कधी तितका विचारच करत नाही.

“मंदिराला प्रदक्षिणा का माराव्यात?” हा एक असाच प्रश्न.  याचा अपभ्रंश काही लोकांनी “फेऱ्या मारल्या का?” असा सुद्धा केला आहे. हा प्रश्न आपण कधी स्वतःला विचारत नाही आणि त्यामुळे इतर धर्मियांनी विचारल्यावर आपल्याकडे त्याबद्दल उत्तर नसतं.

काय आहे हे करण्यामागचं शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण? जाणून घेऊयात. 

 

pradakshina inmarathi

 

हिंदू धर्मातील कोणत्याही मंदिराला प्रदक्षिणा ही नेहमी clockwise म्हणजे ‘डावीकडून उजवीकडे’ मारत असतात. हे यासाठी की, गाभाऱ्यातील देव हा कायम तुमच्या उजव्या हाताला असावा.

याचं अजून एक कारण म्हणजे, असं करून आपण हे मान्य करतो की देवच गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, ज्याकडे आपण आकर्षित झालेलो आहोत.

कोणत्याही मंदिराला ३ प्रदक्षिणा माराव्यात असं शास्त्र सांगतं. कारण, या प्रत्येक प्रदक्षिणेचं एक महत्व आहे.

प्रदक्षिणा म्हणजेच स्वतःला तणावातून  मुक्त करणे आणि मंदिरात जाताना जे काही नकारात्मक विचार तुमच्या मनात असतील, जी काही भौतिक जगातील वस्तूंची आसक्ती असेल ती त्या आवारातच सोडून देणे आणि आपल्या कामाला लागणे असं त्याचं महत्व आहे.

‘दक्षिणा’ म्हणजे आपल्या सेवा आणि समर्पण भावातून आपण देवाच्या चरणी अर्पण केलेली छोटी भेट.

देवाची भक्ती करतांना प्रदक्षिणेचं यासाठी महत्व आहे की, प्रदक्षिणा मारताना आपण अगदी सरळ चालत असतो म्हणजेच सरळ विचार करत असतो आणि त्यात एक प्रामाणिकपणा असतो.

देव आपल्या उजव्या हाताला असल्याने तो सगळं बरोबरच करेल आणि वर्तुळ पूर्ण करून आपण आपली इप्सित गोष्टी पूर्णत्वास नेऊ हा भाव त्यामध्ये असतो.

पहिल्या प्रदक्षिणेत आपण स्वतःला आजूबाजूच्या “भौतिक” गोष्टींपासून लांब नेत असतो. त्यांच्याशी आपली असलेली “Attachment” कमी करण्याच्या प्रयत्न करत असतो.

 

hanuman temple-inmarathi

 

गौतम बुद्धांचं एक सुंदर वाक्य आहे, “To be able to free yourself from suffering, free yourself from Attachments”. आवड आणि विश्वास असलेले लोक या गोष्टीवर नक्की विचार करतील.

दुसऱ्या प्रदक्षिणेत आपण स्वतःला या जगातील नात्यांपासून मुक्त करायचा विचार केला पाहिजे. मुक्त म्हणजे त्यांच्यातील आसक्ती कमी करणे. त्यांना त्यांचे निर्णय घेण्याची मुभा देणे.

“अकेले ही आये थे, अकेले ही जाएंगे” हे आपण ऐकत किंवा रिक्षा, ट्रक च्या मागे लिहिलेलं वाचत असतो, पण ते पटण्यासाठी आपल्याला खूप वर्ष द्यावे लागतात. ते या दुसऱ्या प्रदक्षिणेतून साध्य करायचं असतं.

तिसऱ्या प्रदक्षिणेत आपण स्वतःबद्दल असलेली प्रतिमा आणि अहंकार यांचा त्याग करायला शिकलं पाहिजे. आत्मसमर्पण ज्याला म्हणतात ते हेच.तेच नसेल तर आपण आपल्या मनात देवाला सर्वोच्च स्थान दिलेलंच नसतं. आपण फक्त तसा आव आणत असतो.

स्वतःला प्रश्न विचारून त्याची उत्तरं देण्याची ‘हीच ती वेळ आणि हाच तो क्षण’असतो.

आपल्या विचारांमध्ये असलेले हे ३ अडथळे पार केल्यानंतर तुम्ही देवासमोर काही क्षण परत बसून कनेक्ट व्हायचा प्रयत्न करू शकता.

एका अभंगात सुद्धा याबद्दल सांगण्यात आलं आहे की, “देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी तेनि मुक्ती सारी साधियेली…”

प्रदक्षिणेकडे जर का फक्त एक चालण्याचा व्यायाम म्हणून न बघता त्याच्या मागचा भावार्थ समजून घेतला, तर त्याचा फायदा आपल्यालाच मन शांती मिळून होऊ शकतो. शेवटी या सर्व विश्वासाच्या गोष्टी आहेत.

 

pradakshina inmarathi1

 

पौराणिक कथांमध्येदेखील प्रदक्षिणेचं महत्त्व येतं. भगवान शंकरांनी त्यांच्या दोन्ही मुलं म्हणजे कार्तिकेय आणि गणपती यांना ब्रम्हांड परिक्रमा करायला सांगितलं होतं. तेव्हा कार्तिकेयाने पूर्ण ब्रम्हांडाची प्रदक्षिणा त्याच्या मोरावर आरूढ होऊन मारली होती.

त्याउलट, गणपतीने फक्त शंकर -पार्वती यांना मध्यभागी उभं करून त्यांच्या भोवती प्रदक्षिणा मारून “तुम्हीच माझं ब्रम्हांड आहात” हे भावनेतून आणि कृतीतून व्यक्त करून दाखवले होते.

प्रदक्षिणा मारत असतांना आपण कधीच घाईत असू नये. त्यासोबतच, हात फार जोरात हलवत चालू नये. शक्य असल्यास देवाचा मंत्र म्हणत म्हणत प्रदक्षिणा पूर्ण करावी.

प्राचीन काळापासून मंदिरांची रचना अशाप्रकारे करण्यात येते, की त्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाड, फुलं असायची. त्या परिसरातून तुम्ही जर काही वेळांसाठी चाललात, तर तुमच्या शरीराला जास्त ऑक्सिजन चा पुरवठा होतो.

पिंपळाच्या झाडांपासून सर्वात जास्त ऑक्सिजन मिळतो असं विज्ञान सांगतं आणि ऑक्सिजन मिळाल्याने शरीरातील सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात हे प्रदक्षिणेमागचं पूर्वापार चालत आलेलं वैज्ञानिक कारण म्हणता येईल.

प्रत्येक धर्मात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यांचा खरा अर्थ सामान्य माणसांपर्यंत न पोहोचता फक्त त्याची भीती पोहोचवण्यात आलेली आहे.

सध्या जे लोक मनःशांती मिळवण्यासाठी धडपड करत आहेत, त्यांनी कोणतेही अघोरी प्रकार न करता या मार्गाने समर्पण भावना मनात जागृत केली तर त्यांना त्याचा फायदाच होईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?