' भारत सरकारच्या BHIM app चे कुणीही नं सांगितलेले महत्व – InMarathi

भारत सरकारच्या BHIM app चे कुणीही नं सांगितलेले महत्व

 

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

३० डिसेंबर २०१६ ला पंतप्रधान मोदी ह्यांनी BHIM एप्प लोकउपभोगासाठी खुला केला. मोदी सरकारचे ऐतिहासिक पाउल ते आणखी एक UPI एप्प ते मोदी सरकारचा भपका अश्या विविध आशयाच्या प्रतिक्रिया  मध्यम आणि समाज माध्यमात उमटल्या. ह्या पार्श्वभुमी वर भीम एप्प चे स्थान, उद्देश आणि त्यामुळे नेमके काय साध्य होईल/होणार नाही आणि कसे ह्याचा साध्या भाषेत आढावा घेणे प्राप्त ठरते . हे एप्प खरेच ऐतिहासिक आहे काय, आणि सरकारचे म्हणून त्यात असेलेले योगदान ह्याचे विश्लेषण पण आपण करू.

bhim-app-marathipizza

भीम एप्प समजून घेताना त्याधील UPI आणि एकंदरीत डीजीटायझेशन ह्यांचे प्रवाह समजून घेणे गरजेचे आहे.

१९९९ च्या डॉट-कॉम लाटे नंतर इंटरनेट आणि ऑनलाईन हे दोन्ही शब्द आपल्या परिचयाचे झालेत. कुठलीही सुविधा आणि माहिती आपल्याला इंटरनेट वापरून मिळते असा साधा अर्थ आपण काढतो. सरकार आणि उद्योग ह्यांच्यासाठी मात्र ऑनलाईन चे महत्व हे लोकांपर्यंत सहज, लवकर पोहोचून त्यांना हव्या त्या सुविधा थेट मिळवून द्यायचे साधन एवढाच आहे.

गेल्या १५-१६ वर्षात मात्र मागील वाक्यातील विशेषण ह्यांच्या वर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. उदा, एका बँकेत तुम्हाला नवीन खाते काढायचे असेल तर आपण २-४ पानाचा एक फॉर्म भरतो. समजा तोच फॉर्म तसाच कुण्या बँकेने ऑनलाईन उपलब्ध करून दिला तर सहज, लवकर, थेट असे आपले उद्देश साध्य झालेत का? हा प्रश्न आजकाल विचारला जातोय. माणसे करतात तसाच सुस्त आणि पाल्हाळ व्यवहार कॉम्पुटर वापरून होणार असेल तर काय उपयोग? हा सोबतचा जोड प्रश्न. ह्या प्रश्नांचे उत्तर म्हणून आता ऑनलाईन ऐवजी डीजीटायझेशन हा निकष वापरल्या जातोय.

upi_logo_marathipizza

माणूस म्हणून माहिती बघण्याचा, ती हाताळण्याच्या मर्यादा कॉम्पुटर आणि इंटरनेट मुळे जायला हवा हा त्याचा गाभा. सोबत सहज,लवकर आणि थेट ह्या जातकुळीतील निकष आहेच. डीजीटायझेशन मुळे कंपन्यांची उलाढाल वाढेल आणि सरकारी विभागांची कल्याणकारकता वाढते हे त्यासोबतचे गृहीतक आहेत.

डीजीटायझेशन कल्पना प्रत्यक्षात उतरवताना माणसे आणि त्यांतील व्यवहार हे digital म्हणजे अंकीय स्वरुपात असणे म्हत्वाचे असते. आपल्या कडील आधार कार्ड हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. एकदा एका व्यक्ती चे कार्ड तयार केले म्हणजे त्यानंतर त्याचे नाव, गाव, मोबाईल नंबर…हे सर्व परत परत विचारायची गरज संपते. माणसाचे असे डीजीटायझेशन म्हणजे अंकन झाल्याने आधार कार्ड कॉम्पुटर/मोबाईलने वाचले की पुरते. Income tax भरताना किंवा शिक्षक हजेरी साठी ह्याचे प्रात्यक्षिक आपल्याला बघता येते.

हीच डीजीटायझेशनची कल्पना बँक व्यहारात आणताना काही अडचणी असतात.

पहली म्हणजे व्यक्ती किंवा त्याचे खाते अंकून घेणे. QR कोड ह्या ह्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. Paytm मुळे आजकाल ह्याचा अनुभव आपल्या सर्वांना आलेला असेल.

bhim_app_qr_marathipizza

QR च्या आधी बँकचेक आपण ह्याच प्रमाणे वापरायचो. पुढे whatsapp सारख्यांनी व्यक्तीचा मोबाईल नंबर हीच त्याची अंकीय ओळख अशी रीत लावून दिली.

दुसरे म्हणजे व्यक्ती/खात्यांचे  असे अंकन केले तरी सर्व बँकांनी त्याला मानले पाहिजे. ह्यासाठी कुठेली तरी प्रमाण तयार होणे गरजेचे असते. सोबत ते प्रमाण एका बँकेतून दुसरीकडे न्यायची व्यवस्था पण असायला लागते. हे सर्व लक्षात घेऊन भारतात NCPI ही मध्यवर्ती सरकारी संस्था 2008 साली स्थापन केल्या गेली. ह्याच NCPI ने “रुपे” हे भारतीय देयक कार्ड आणि UPI नावाची प्रमाण प्रणाली (API standard) बनवले. ह्याला जगातील इतर देयक प्रणालींची प्रेरणा होतीच. अमेरिकेतील नाचा आणि युरोप मधील सेपा इत्यादी.

आत्तापर्यंत, आपल्या कडे कुणाला पैसे पाठवायचे असेल तर त्याचा खातेक्रमांक आणि शाखेचा IFSC code माहित असणे गरजेचे होते. UPI च्या आधी IMPS म्हणजे मोबाईल आधारित त्वरित देयक सुविधा NCPI ने आणली होती. पण ह्या सुविधेत MMID नावाचा क्रमांक वापरणे गरजेचे होते. म्हणजे सामान्य ग्राहकासाठी खाते क्रमांक एवजी MMID क्रमांक आला. क्रमांक आठवावेच लागत असल्याने कदाचित IMPS हवी तेवढी लोकप्रिय झाली नही. ही समस्या UPIने सोडवली असे म्हणता येते.

बँक ग्राहक म्हणून आपला मोबाईल किंवा आधार कार्ड हीच आपली ओळख म्हणून वापरता येते. त्याचसोबत इमेल सारखी “@बँक” अशी id पण वापरता येते. जसे sachin१२३@sbi. खाते क्रमांका पेक्षा UPI id वापरायला सोपी जाते. आणि समजा तुम्हाला कुणाला मोबाईल किंवा इमेल सारखी UPI id लिहायचा त्रास द्यायचा नसेल तर त्याचे QR चित्र जोडीला आहेच.

बँक व्याहाराचे असे सुलभिकरण हे लोक आणि सरकार दोन्ही साठी चांगले आहे. त्याचमुळे UPI हे डीजीटायझेशन चे  खूप चांगले उदाहरण ठरते – सहज…लवकर…थेट…!

नोटा बंदीनंतर भारतातील सर्व प्रमुख, सरकारी तसेच खासगी बँकांनी आपआपले UPI app उपलब्ध करून दिलेत. पण इथे एक नवीन गैरसोय निर्माण झाली. UPI app ह्यात पैसे पाठवणे, शिल्लक तपासणे आणि पैसे मागणे अश्या मर्यादित सुविधा होत्या. त्यामुळे पैसे देणे-घेणे ह्याची सुलभता असली तरी इतर बँक व्यवहारासाठी त्या त्या बँकांचे एप्प वापरणे आलेच. सामान्य मानून बँकिंग app चा वापर ह्या ३-४ गोष्टीसाठीच करत असल्याने UPI app अनुपयोगी तसे नव्हते. त्यातल्या-त्यात बहुतांश बँकांनी फक्त स्वतःच्या खातेदारांसाठी म्हणून UPI app ची मर्यादा ठेवली. म्हणून खास NCPIने वितरीत केलेले भीम अप्प महत्वाचे ठरते…!

भीम app मध्ये भारतातील प्रमुख बँकेपैकी कुठल्याही बँकेचे खाते वापरता येते. तसेच आपल्या बँकेजवळ आधीच UPI id बनवून घेतली नसेल तर तुमचा मोबाईल हाच UPI id म्हणून वापरता येतो. खरेतर भीम app त्याहीपुढे जाऊन एक क्रांतिकारी पाउल ठेवते.

bhim-app-00-marathipizza

आत्ता पर्यंत UPI id म्हणून @बँक अशी इमेल सारखी id किंवा मोबाईल ह्याचा वापर आपण करू शकू. पण एका व्यक्तीचे अनेक बँकेत खाते, अनेक मोबाईल असणे ह्या सारख्या अडचणीच्या बाबी असतात. त्याच सोबत बँक बदलली की परत सर्वांना नवी UPI id कळला असे संभाव्य त्रास होते. भीम app मध्ये थेट @UPI अशीच id बनवता येते. ही @UPI आणि आधार कार्ड जोडून वापरले म्हणजे तुमचा मोबाईल किंवा तुमची बँक बदलली तरी इतरांना त्याचा त्रास होणार नही ह्याची शक्यता निर्माण होते.

उणे म्हणून भीम  app मध्ये पुढील गोष्टी दिसतात.

भीम app अजून तरी apple मोबाईल वर उपलब्ध नही. तसेच काही लोकांना app मधील रंगसंगती किंवा flow आवडणार नाही. पण सगळ्यात म्हत्वाचे म्हणजे आपण भीम एप्प मध्ये एकाहून अधिक बँक तसेच अनेक खाती वापरू शकलो तरी ते परत परत बटन बदलून set करावे लागते. तसेच आधार आणि बँक खाते ह्यांची जोडणी अजून झाली नाही.

सध्या तरी भीम एप्प साठी andorid फोन लागतो, भविष्यात USSD वाहकता वापरून साध्या फोन वर भीम उपलब्ध करता येईल (बऱ्याच सरकारी apps मध्ये ussd वापरली जाते). वरील गोष्टी ह्या न्यून म्हणून किती लहान/ठळक आहेत हा आपापल्या निष्कर्षाचा भाग आहे. पण मोबाईल appबद्दल चा आपला साधारण अनुभव बघता पुढील आवृत्तीत हे बदल घडावेत असे वाटते.

शेवटी एक प्रश्न उरतो – तो म्हणजे – भविष्यात भीम app विकसित होऊन बँकेचे स्वतःचे app वापरायची गरज नाहीशी होईल काय…?!!!

भविष्यात UPI प्रणाली विकसित झाली तर असे होऊ शकेल. बँकांनाही ह्यामुळे वाचणारा app खर्च आवडेल. साधारणतः दैनंदिन वापरासाठी भीम app उपयोगी आहे. कुणाला ४ महिन्या आधील एखादा व्यवहार बँकेत न जाता तपासायचा असेल, किवा नवी FD काढायची असेल तर मात्र बँकेचे मोबाईल किंवा इंटरनेट app वापरावे लागेल. ह्या सर्वात भारत सरकारने लोकांसाठी अशी सुविधा निर्माण केल्या बद्दल UPI चे आणि सरकारचे कौतुक व्हायला पाहिजे.

modi-speech-marathipizza

भारताची लोकसंख्या बघता UPI प्रणाली जगातील सर्वात जास्त लोकांनी वापरलेली प्रणाली ठरणे फार अवघड नही. हे सगळे होत असताना, UPI प्रणाली किती दिवसांपासून तयार होती आणि कधी लोकार्पण झाली किंवा सरकारने एवढा जोरदार प्रचार केला नसता तर UPI हे IMPS सारखेच फासले असते का आणि म्हणून मोदीला त्याचे श्रेय द्यायचे का हा ज्याच्या त्याच्या विचारवळणाचा परिपाक आहे. शेवटी World cup जिंकणाऱ्या कर्णधाराला “४ वर्ष तूच रोज संघाची तयारी करून घायचा का?” असे प्रश्न आपण विचारत नाही, हे सुद्धा व्याहारिक वळण आहे. मुळात हा लेख राजकीय विश्लेक्षणाचा नसल्याने, प्रायोजक अभावी मोठ्या मोठ्या स्कीम्स फसतात, हे सत्य लक्षात घेऊन भारत सरकार चे अभिनंदन करणे प्राप्त ठरते.

जय भीम !

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?