' “…मग तुम्हीच छत्रपती व्हा!” : छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मण पुजाऱ्यावर खवळतात तेव्हा.. – InMarathi

“…मग तुम्हीच छत्रपती व्हा!” : छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मण पुजाऱ्यावर खवळतात तेव्हा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपण आजकालचं राजकारण बघतो किंवा समाजातील प्रतिष्ठीत आणि वजनदार व्यक्तींच्या प्रवृत्तीदेखील पाहतो. एखाद्याच्या कामात लुडबूड करणे किंवा वशिलेबाजीसारखे विषयतर सर्वसामान्य झालेत त्यामुळे ज्याचं वजन जास्त त्याचं पारड जड हे गणित बनलेलंच आहे.

पण एक काळ असा होता जेव्हा सर्वाना समान न्याय आणि ज्याची कामे तोच चोखपणे बजावायचा.

आणि तो काळ होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्याचा पुरावा म्हणजे शिवकालीन पत्रे.

 

shivkalin-patre-inmarathi
mirchifm.com

त्यातल्याच एक पत्रं म्हणजे महाराजांनी एका ब्राम्हण पुजाऱ्याला पाठवलेलं पत्र. शिदोजी प्रतापराव गुजर हा सिंहगडाचा किल्लेदार होता आणि या किल्लेदारानं एका निष्पाप मजूराला एका ब्राम्हण पुजाऱ्याच्या सांगण्यावरून कोठडीत डांबून ठेवलं. तो ब्राम्हण पुजारी म्हणजे जेजुरी देवस्थानचे नारायण महाराज चिंचवडकर होते.

जेव्हा महाराजांना हे कळलं तेंव्हा त्यांनी पहिल्यांदा तर शिदोजी गुजरला जाब विचारला की,

“तू नेमका नोकर कुणाचा? त्या पुजाऱ्यांचा की माझा? चिंचवडकर महाराजांच्या सांगण्यावरुन तु कसं काय एखाद्या गरिबाला तुरूंगात डांबू शकतो?”

अशा प्रकारचे खडे बोल ऐकल्यानंतर शिदोजी गुजर यानं तात्काळ त्या गरिब मजूराला सोडून दिले. शिदोजी गुजरला पुढे काय शिक्षा दिली याचा कुठे उल्लेख आढळत नाही परंतु सामान्य प्रजेवर अन्याय करणाऱ्या कोणत्याच अधिकाऱ्याला महाराज सोडत नसत. आणि शिदोजी गुजर म्हणजे प्रतापराव गुजरांचा मुलगा असं असूनही कुठलीही भीडभाड न बाळगता महाराजांनी त्याला खडे बोल सुनावले.

 

shivaji mharaj InMarathi 1

 

महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी चिंचवडकर महाराज या पुजाऱ्याला देखील पत्र लिहीलं आणि खडसावलं. ते पत्रात असं म्हणतात की-

“आमची बिरदे तुम्ही घ्या आणि आपली बिरदे आम्हास द्या.”

म्हणजे आम्ही जे काम करतोय ते आता तुम्हीच करा आणि पुजा आरत्या आम्ही करत बसतो. याचा अर्थ असा होता, शिवाजी महाराजांच्या कामात कुणी ढवळाढवळ केलेली चालत नसे. आणि कुण्या अधिकाऱ्याने स्वत:हून चुकीचे निर्णय घेणे किंवा प्रजेला त्रास देणे म्हणजे महाराजांच्या लेखी सर्वात मोठा गुन्हा असे.

 

shivaji-maharaj-marathipizza04

 

इतिहासातील ही घटना म्हणजे आजकालच्या राजकारण्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी आहे. महाराजांच्या एकूण कार्यकाळातल्या अशा अनेक घटना आहेत ज्या आजच्या राजकारण्यांनी स्वत:समोर आदर्श म्हणून ठेवल्या पाहिजेत.

शिवाजी महाराजांचं हे पत्र म्हणजे प्राचीन भारतीय संस्कृतीचा महाराजांनी चालवलेला वसा होय.

शिवाजी महाराजांच्या काळातली अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांचा उहापोह होऊ शकतो.

शिवाजी महाराजांनाच मुळात कधी जात पात उच्च निच असा भेदभाव मान्य नव्हता. शिवाजी महाराजांनी एक प्रकारे भट ब्राम्हणांची असेलली मक्तेदारी मोडून काढली आणि प्रजेला अभय दिलं.

 

shivaji mharaj InMarathi 2

 

शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याला उतरती कळा लागली आणि स्वार्थापोटी जनतेच्या पुढे हात पसरणारे राजकारणी आपण पाहू लागलो. जनतेच्या पैशातून मौज मजा करणारी, भ्रष्टाचार, लांडी –लबाडी करणारी मंडळी आपण पाहतोय.

हजारो क्विंटल धान्यांची निवाऱ्याआभावी नासाडी होतेय आणि हजारो गरिब मजूर लोक त्या अन्नापासून वंचित राहतात, लाखो भूकबळी गेले, सराकारी साहित्याची पुर्वीही आणि आत्ताही नासाडी होते.

परंतु जरा इतिहासात डोकावून पाहा, कुठल्याही इतिहासकारानं किंवा साहित्यिकांनं कुठंही असं नमूद करून ठेवलेलं आपल्याला आढळणार नाही की स्वराज्यात अन्नधान्याच्या नासाडीमुळे प्रजेचा जीव गेला.

स्वराज्यातील प्रजेला सुखी ठेवण्याचं आणि प्रजा हेच दैवत मानून प्रजेसाठीच लढाई आणि प्रजेसाठीच आपलं संपूर्ण आयुष्य वाहून देण्याचं अदभूत साहस दाखणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

 

shivaji mharaj InMarathi 3

 

काय आत्ताच्या काळात होईल का असा एखादा राजा? एखादा नेता?

जेव्हा धर्मसत्ता ही राजसत्तेच्या समान मानली जायची किंवा राजसत्तेपेक्षादेखील तिला समाजात जास्त वजन होतं अशा काळात एखाद्या पुजाऱ्याला खडसावनं म्हणजे फार धैर्याचं काम म्हणावं लागेल.

आणि हेच काम करून दाखवलं शिवाजी महाराजांनी. प्रजेसाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कासाठी हा राजा मरेपर्यंत आपलं कर्तव्य बजावत राहिला. पण आजच्या काळात त्यांचे केवळ पुतळे उभारणाऱ्यां नेतेमंडळींना हे आदर्श कधी दिसणार.

 

shivaji mharaj InMarathi 4

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेले आदर्श हे येणाऱ्या कित्येक राजकीय पिढ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाण करून देतील.

गरज आहे ती फक्त या राजकर्त्यांनी शिवचरित्रात थोडंस डोकावण्याची. मग बघा कशा समस्या सुटतील. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणारी मंडळी आज आपण पाहतो.

शिवाजी महाराजांचा त्या काळी असणारा राज्यकारभारातील वक्तशीरपणा,शिस्तबध्दता, योजनाबध्द कार्य आणि कामाचा उत्कृष्ट दर्जा इत्यादी प्रकारे काम करण्याच्या पध्दतीमुळे स्वराज्याच्या अनुशासनाला कोणीही शह देऊ शकता नव्हता.

 

shivaji mharaj InaMarathi 5

 

दुर्दैवानं शिवाजी महाराजांच्या कालखंडानंतर ते आजतागायत आपण स्वराज्याच्या झालेली परवड पाहतोय. आपल्या कित्येक पिढ्या केवळ महाराष्ट्राची दुर्दशा पाहण्यातच गेल्या परंतू कदाचित इथून पुढे स्वराज्यातील अनुशासन आणि प्रजेचं सुख पुन्हा परत येऊ शकतं.

त्यासाठी शिवाजी महाराजांना पुन्हा जन्म घेण्याची गरज नाही गरज आहे ती फक्त दुर्दम्य इच्छाशक्तीची.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?