' दहावीला मिळत असलेल्या 100% च्या निमित्ताने…! – InMarathi

दहावीला मिळत असलेल्या 100% च्या निमित्ताने…!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

तर विषय हा आहे की 100% मुलांना मिळण्याचा निर्णय आल्यापासून झिणझिण्या आलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी मी काही तरी लेखन करावे असे मला मित्रांनी सुचवले. शैक्षणिक लई मोठी क्रांती झाल्याने व पाऊस आल्याने वाईन शॉप बाहेर त्या दिवशी भली मोठी गर्दी होती. दारू पिल्यावर लोक मोठे तत्वविज्ञानी होतात. त्यांच्यासमोर मोठे मोठे फिलॉसॉफर कमी पडतील तर या विषयावर आज किती लोकांनी कशी जास्त रिचवली असेल त्या विषयी मी चिंतन करत आहे. मोठा विषय तर जे आयुष्यात दहावीला नापास झाले त्यांचा आहे. ते 100% मार्क्स मिळतात आणि त्यांच्या वेळेला काय होत होते या कल्पनेत बेचैन झालेले मला समजत आहे.

ssc-marathipizza01
financialexpress.com

आमच्या काळात पूर्वीच्या लोकांकडून मी त्यांचे पेपर कोणी लिहले वा कोण 22 वेळा दहावी ला बसले याबाबत रंजक कथा व विध्वंसक गोष्टी ऐकल्या आहेत. अनेक जण नापास झाले म्हणून त्यांचे परिवार शोकात बुडालेले ही पाहिलेत. आपल्या शिक्षण पद्धतीत पूर्वीपासून म्याट्रिक म्हणजे पोरगं नर्मदा परिक्रमेला निघाले आहे नीट तेल भरा यापद्धतीची तयारी असते. पूर्वीपासून मॅट्रिक ला गेला म्हणजे चंद्रावर पायरी लावून कड्याला लटकायला निघाला आहे त्या पद्धतीत ते तीट लावेपर्यंत अप्पू पप्पू चाललेले असते.अर्थात त्यावर भविष्य अवलंबून असते. पण मतितार्थ काढला तर हे सारे ज्युनियर कॉलेज च्या प्रेवेशाकरता चालते.

यावर्षी 193 लोकांना 100% मार्क्स देऊन अनेक लोकांचा एसएससी बोर्डाने प्रोग्रॅम फेल करून टाकला आहे. काही ठिकाणी तर टोटल मारल्यास लक्षात येते की 10 मार्क जास्त आहेत. हे सारे अचंबित करणारे असून दारू न पिता एखाद्याला hangओव्हर मध्ये लोटण्यासारखे आहे. असेच चालू राहिले तर 100% घेणाऱ्यांच्या राशी तयार होतील. पूर्वी फाटे कोचिंग क्लासेस पासून ते अनेक महत्वाच्या बोर्डाच्या पेपर तपासणाऱ्या शिक्षक वर्गाकडे क्लास साठी गर्दी होत असे कारण ते तसा रिझल्ट देत असत. मला वैयक्तीक हे असले भंकस प्रकार कधी आवडले नाहीत. महत्व याचे आहे की त्यावेळेला 90 ते 95% घेऊन बोर्डात आलेल्या विदयार्थी वर्गाला आज 100% पाहून काय वाटत असेल? इथे तर पार भाजीपाला झाला.

मला या प्याटर्न वा नवीन 100% वाटणाऱ्या शिक्षण पद्धती बाबत माहीत नाही पण डोंगर पाड्यात राहून वीज नसलेल्या जागेत अभ्यास करून 2 तास पायपीट करत शाळेला येणाऱ्या पोराला आणि एसीत झोपणाऱ्या पोराला आमची पद्धत एकाच तराजूत तोलते आहे हे चुकीचे नाही का? अर्थात याला काही पर्याय देखील नाहीच. ब्रिटिश गेले पण नोकरशाही तयार करणारी सिस्टीम ठेऊन गेले. मला आठवते आहे की गावाकडे गेल्यावर मला माझ्या वडिलांना इंग्रजीत matriculation ला 56 मार्क होते हे इतर लोक मला आनंदाने आठवण सांगत असत. त्यावेळेला मला त्याचे आश्चर्य वाटत असे. पुढे जाऊन देखील मला हेच समजत गेले की लोकांनी शिक्षणाकरिता खस्ता काय खाल्ल्या आहेत. ग्रामीण भागात असे अनेक किस्से ऐकले आहेत. किती आण्याला दूध मिळायचे व आणीबाणीत लोकांनी ट्रँक मध्ये बसून कसे तांदूळ गावातून आणले होते. आज या सर्वांना अप्रूप देऊन आर्चिला किती टक्के मिळाले याची बातमी वाचायला लावली जात आहे. आजच्या शंभर वाल्याला ते दिवस कळणार आहेत का?

ssc-marathipizza02
timesofindia.indiatimes.com

दुसरा विषय अहंकाराचा ही आहे. पूर्वी 95 वाले अनेक जण बाजूला ही पाहत नसत आता 100 वाले कोणत्या झाडावर बसतील. लिहणार पोरं हुशार आहेत की तपासणारे भरकटलेल्या अवस्थेत गेलेत? आज काळ इतका बदलला आहे की खालती पृथ्वीवर मॅट्रिक च्या परीक्षेत 100% गुण मिळतात किंवा देवळात जशी खिरापत वाटतात तसे हे लोक मार्क वाटतायत हे ब्रिटिश काळात परदेशी जाऊन ब्यारिस्टर झालेल्या लोकांना वरती समजले असेल तर त्यांना काय वाटत असेल याची कल्पना न केलेली बरी. पूर्वी ढिगाने मजूर मिळायचे तसे घरात डोकावले तर 90 टक्क्यांची पोर सापडतील आणि अशा वेळी स्पर्धेच्या युगात 40% मिळवणाऱ्या पोरांचे काय होणार याचा विचार कोणी केलाय का? आधीच पोटाची सिस्टीम बिघडली आहे आणि आपण मात्र अजून अरबट चरबट जेवायला लावतो आहोत. साकल्याने विचार करा नाही तर दहावी च्या परीक्षेला बसवण्याचा मान लिपी आणि भाषा हळू हळू पाळीव कुत्र्यांना ही शिकवून दिल्यास ते सध्याच्या पॅटर्न मध्ये उत्तीर्ण होऊ शकतील. आणि इथे गिनीज बुक चा नवा रेकॉर्ड होऊन जाईल.

(टीप- सध्य परिस्थितवर ही लेखकाची वैयक्तीक मतं असून हा फेसबुक वॉल वर जसाच्या तसा उपलब्ध आहे.)

लेखक : हृषीकेश जोशी

कर्जत- रायगड

9673894005

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?