' मुंबईकरांना लागले तणावाचे ग्रहण…! मुंबईकर देशात सर्वाधिक तणावग्रस्त… – InMarathi

मुंबईकरांना लागले तणावाचे ग्रहण…! मुंबईकर देशात सर्वाधिक तणावग्रस्त…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मुंबई… या शहराचं फक्त नावचं पुरेसं आहे. या शहराला कुठल्याही स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही. असं म्हणतात की मुंबई कधी झोपत नाही, ती निरंतर सुरु असते आणि हे खरं देखील आहे.

DEPRESSION04-marathipizza
flickr.com

तसाच आहे मुंबईचा मुंबईकर.. जो दिवसरात्र राबत असतो, पण तरी त्याच्यातली ती मुंबई स्पिरीट काही कमी होत नाही. पण याच मुंबईच्या स्पिरिटला तणावाचे ग्रहण लागले आहे.

जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर लीब्रेट ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा सर्व्हे नुकताच जाहीर झाला आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 31 टक्के मुंबईकर तणावाखाली जीवन जगत असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे. हा आकडा चिंताजनक आहे. लीब्रेट या डॉक्टरांच्या ऑनलाईन सल्लागार संस्थेने हा सर्व्हे केला आहे. तसेच संपूर्ण देशातल्या महत्त्वाच्या शहरांमधील 60 टक्के नागरीक हे तणावाखाली जगत असल्याचेही यात स्पष्ट झालं आहे.

DEPRESSION02-marathipizza
deccanchronicle.com

या सर्वेनुसार, मुंबईतल्या नोकरदार वर्गातील व्यक्तींचं तणावाचं मुख्य कारण म्हणजे अपूरा वेळ, दिलेलं काम वेळेत पूर्ण करु न शकणं, मानसिक तणावाशी संघर्ष, ऑफिसमधील राजकारण, ओव्हर टाईम काम करणं, तसेच, प्रोफेशनल जीवन आणि वैयक्तीक जीवनात योग्य संतुलन नसल्याची मुख्य कारणं आहेत.

लीब्रेट संस्थेचे सीईओ आणि संस्थापक सौरभ अरोडा यांनी याबाबत सांगितलं की,

तणावाखालील व्यक्तींना आपल्या कुटुंबाशी आणि मित्रांशी बोलताना नेहमी अस्वस्थता जाणवते. पण आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी आपले विचार, आपल्या भावना इतरांसमोर व्यक्त करणं गरजेचं आहे.

अरोडा पुढे म्हणाले की,

तणावाखालील व्यक्तींना त्या मागचे  नेमके कारण समजणे गरजेचे आहे. ज्यामुळे त्याचा परिणाम कमी करण्यासाठी उपाय करता येतील. अन्यथा प्रदीर्घ काळ तणावाखाली राहिल्याने त्याला आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

DEPRESSION05-marathipizza
insideiim.com

संशोधनानुसार, मीडिया आणि जनसंपर्क क्षेत्रातील 22 टक्के, बीपीओ 17 टक्के, ट्रॅव्हल्स अँड टूरिझम 9 टक्के आणि जाहिरात तसेच इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील 8 टक्के व्यक्ती तणावाखाली जीवन जगत आहेत. तर सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्रातील सर्वाधिक म्हणजेच 24 टक्के व्यक्ती तणावाखाली जगत असल्याचा दावा या संशोधनातून केला आहे.

DEPRESSION01-marathipizza
Getty Images

हा सर्व्हे 10 ऑक्टोबर 2016 पासून 12 महिन्याच्या कालावधीत करण्यात आला. यावेळी डॉक्टरांच्या एका टीमने जवळपास एक लाखापेक्षा जास्त नोकरी करणाऱ्या व्यक्तींशी चर्चा केली. त्या चर्चेतून हा निष्कर्ष काढला आहे.

या सर्वेनुसार केवळ मुंबईकरचं नाहीत तर इतर पाच शहरातही नागरिक देखील तणावाखाली जीवन जगत आहेत.

दिल्ली – 27 टक्के

बंगळुरु – 14 टक्के

हैदराबाद – 11 टक्के

चेन्नई – 10 टक्के

कोलकत्ता – 7 टक्के

तणाव म्हणजे काय ?

आपल्या आजूबाजूला काही बदल घडतात. त्या बदलांप्रती आपण शारिरीक व मानसिक प्रतिक्रिया व्यक्त करतो. वातावरणातील बदल प्रतिकूल असल्यास व्यक्त होणारी आपली प्रतिक्रिया तणाव दर्शवते. हा बदल जेवढा जास्त तेवढा तणाव वाढतो. तणाव दीर्घकाळ राहिल्यास चिंतेचे रूप धारण करतो. मानसिक एकाग्रता ढळते, डोकेदुखी सुरू होते, अभ्यासात अडचणी येतात, थकवा वाटू लागतो, मन व शरीरावर तणावाचे अनिष्ट परिणाम सुरू होतात. अनेकदा मानसिक संतुलनही बिघडते, चिडचिडेपणा येतो, संताप वाढतो, आरोग्य बिघडते. याशिवाय मानसिक आजारही घेरतात. झोप न येणे, डोकेदुखी, मायग्रेन, नैराश्य, उच्च रक्तदाब, ह्रदयासंबंधी लेख, लठ्ठपणा, एसिडीटी, अल्सर, केस झडणे आदी व्याधी मागे लागतात.

DEPRESSION-marathipizza
huffingtonpost.in

तणाव कमी कसा करता येईल ?

  • तणाव दूर करण्यासाठी जीवनपद्धती बदलण्याची गरज आहे.
  • आपल्या क्षमतेनुसार काम करा. आपल्या ताकदीबाहेरचे काम करू नका. त्यामुळे उगाचाच न्यूनगंड निर्माण होऊन तणाव वाढतो.
  • जास्त शत्रू निर्माण करू नका. जय-पराजयाच्या भावना फार तीव्र नकोत.
  • सतत काम करणे टाळा. विश्रांतीही घ्या.
  • मोबाईलचा वापर कमी करा. मोबाईल किंवा सोशल मिडीयाच्या अति वापरणे आपण एकलकोंडे होतो.
  • आकस्मिक घडणार्‍या घटनांकडे शांत चित्ताने पहा. संयम आणि शांततेने वागण्याचा प्रयत्न करा.
  • खाण्या-पिण्याच्या सवई बदला. वेळेवर जेवण्याचा प्रयत्न करा.
  • आपल्याला काय साध्य करायचे ते ठरवा. त्यानुसार ताण न घेता ते साध्य करण्याचा प्रयत्न करा नेहमी सकारात्मक विचार करा.
  • नकारात्मक विचारांना कायम दूर ठेवा.
  • पुरेशी झोप घ्या. आरोग्याच्या दृष्टीने रोज आठ तास झोप आवश्यक असते.
  • तणावासंदर्भात तुमचे जवळचे मित्र, नातेवाईक यांच्याशी चर्चा करा. चर्चेने तणाव हलका होतो.
  • जास्त तणाव असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यात महत्वाची कामगिरी पार पडणारा महानगरांमधील कर्मचारीवर्ग मानसिक तणावाचा सामना करतो आहे. ही खरचं चिंताजनक बाब आहे. याचा सर्वांनी विचार करायला हवा आपल्या जवळचे लोकं तर तणावाखाली नाहीत याची काळजी घ्या आणि त्यांना या तणावातून बाहेर काढण्यास मदत करा.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?