' नोटबंदी वर मोदी सरकार पास की नापास? उत्तर सोपं आहे, पण — ! – InMarathi

नोटबंदी वर मोदी सरकार पास की नापास? उत्तर सोपं आहे, पण — !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

चलन बदलची गुणपत्रिका दिवसेंदिवस मनोरंजक होत जातीये. त्यानुसार भक्त (दोन्ही बाजूचे!) लोकांचे प्रचारकी नाट्य अधिकच मनोरंजक होताहेत.

कसं असतं, शाळा/कॉलेजच्या परीक्षेचे फायदे वेगवेगळे असतात. काही प्रत्यक्ष असतात तर काही अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष फायदे मेजरेबल असतात. त्यांची सांगड गुणांशी असते. परीक्षेत यशस्वी झालात की नाही हे ठरलेल्या विषयांतील गुणांवरून कळत असतं. विषय फिक्स्ड असतात. “ठरलेल्या विषयांत कमी मार्क्स मिळाले म्हणून काय झालं? अप्रत्यक्ष फायदे खूप होणारेत!” असं म्हणून भागत नसतं आणि मार्क्स कमी मिळाले म्हणून विषय बदलून ही चालत नसतं.

 

demonisation-marathipizzza01
intoday.in

चलन बदल ही सरकारने स्वतः विषय ठरवून, स्वतःच दिलेली परीक्षा होती. पण गंमत ही आहे की, गुणांचे जे निकष सरकारने स्वतःच ठरवले होते, त्यांनुसार सरकार ह्या परीक्षेत उत्तीर्ण झालंय की अनुत्तीर्ण हे खुद्द सरकारलाच सांगता येत नाहीये. ते सांगता येत नाही म्हणून समर्थकांनी विषय बदलण्याचा अट्टाहास सुरू केलाय. चलन बदलने झालेले / होऊ पहाणारे अप्रत्यक्ष फायदे वेगळे आहेत – पण सरकारने ठरवलेले, वेळोवेळी घोषित केलेले फायदे वेगळेच आहेत.

“भ्रष्टाचार”, “काळा पैसा”, “खोट्या नोटा”, “लेस कॅश… इव्हन “महागाई”… अश्या निकषांवर चलन बदलाचा निर्णय देशास लाभदायक ठरेल हे सरकारतर्फे विविध पातळ्यांवरून वेळोवेळी सांगण्यात आलं आहे. ह्या सर्व फ्रंटवर सरकारची गुणपत्रिका कोरी करकरीत दिसतीये. चलन बदलामुळे ना भ्रष्टाचार कमी झालाय (तो होणारच नव्हता) ना लोकांकडील काळा पैसा “जळाला”. एकूण चलनातील नोटा आणि खोट्या नोटा – ह्यांचं गणितही उलगडत नाहीये आणि महागाईवर तर बोलूच नये अशी परिस्थिती आहे. सुरुवातीला दिलेला कॅशलेस अन लेस कॅशचा जोर आता चांगलाच ओसरलाय.

भविष्यात निकालात लक्षणीय बदल झाले तर उत्तम… वर्तमान परिस्थितीत तरी घोषित गुणपत्रिकेवर सरकार अनुत्तीर्ण आहे. तरीही सरकार समर्थकांची चलन बदलाची री ओढण्याची कसरत थांबता थांबेना. किमान ज्या लक्षणीय रिझल्ट्सच्या वचनांवर सामान्य जनतेने त्या अडीच तीन महिन्यांत प्रचंड त्रास सहन केला, त्या वचनांवर सरकार उभं राहू शकलं नाही हे मान्य करण्यात कसूर करणाऱ्या सरकार समर्थकांची बांधिलकी मोदी आणि भाजपशी अधिक – सामान्य जनतेशी कमी आहे.

पण त्याचवेळेला चलन बदल हा निर्णय कसा “संपूर्ण” चुकीचा आणि देशविघातक होता हे पटवण्याची सर्कस करणारे सुद्धा दयनीय वाटतात. गुणपत्रिकेवर चलन बदलच्या निर्णयाबद्दल सरकार नापास असलं तरी मूळ निर्णय अगदीच वांझोटा ठरवता येणार नाही.

 

demonisation-marathipizzza02
indiatvnews.com

कर दात्यांची वाढलेली लक्षणीय संख्या आणि ह्या वर्षातच वाढलेला कर हे दोन इमिजीएट लाभ झालेत. पण हे लाभ इमिजीएट असले तरी शॉर्ट टर्म नाहीत. पुढील काही वर्षात हे वाढत जाणार आहेत. खोट्या कंपन्या, बनावट पॅन कार्ड्स बाहेर येणे – हा अश्याच लॉंग टर्म बेनिफिट्सचा प्रकार आहे. सरकारकडे आलेला प्रचंड डेटा – हा असाच दूरवर परिणाम करणारा लाभ असणार आहे.

चलन बदलामुळे एका रात्रीत कॅश लेस बद्दल निर्माण झालेली जागरूकता सरकारच्या प्रबोधनाच्या ताकदीची कल्पना देऊन जाते. पण सरकारने भीम ह्या ब्रह्मस्त्राचं फारच तोकडं प्रमोशन करून स्वतःची (आणि देशाची) विकेट काढून दिली. किमान ५०% जनता एका फटक्यात कायमची कॅशलेस होऊ शकेल एवढ्या ताकदीचं आहे भीम. पण त्याबद्दल एवढं पराकोटीचं अज्ञान आहे की, ते पेटीएम सारखं ई वॉलेट नसून भीमद्वारे पैसे अकाऊंट टू अकाऊंट विनामूल्य तात्काळ ट्रान्सफर होतात – हे कित्येकांना अजूनही माहिती नाहीये. हा केवळ अवेअरनेसचा प्रॉब्लम आहे, जो सरकार चटकन सोडवू शकतं. सरकारची इच्छाशक्ती असेल तर एकटा हा भीम चलन बदलाचं ओझं पेलवू शकेल.

(भीम चं महत्व विषद करणारा लेख : पेटीएम विसरा, ‘जय भीम’ म्हणा! )

भीमचं प्रमोशन आणि २००० (आणि शक्य असेल तर ५०० सुद्धा) च्या नोटा काढून घेणे ह्या दोन्ही स्टेप्स लवकरात लवकर घ्यायला हव्यात. असो. थोडक्यात, दोन गोष्टी दोन्हीकडच्या मित्रांनी समजून घ्याव्यात.

१) चलन बदलातून “अपेक्षित” परिणाम “अजूनतरी” साधलेला दिसत नाही. त्यामुळे, आजच्या घडीला तरी सरकार नापास आहेच.

पण –

२) भविष्यात निकाल बदलू शकतो आणि बरेच अप्रत्यक्ष लाभ होत आहेत, त्यामुळे चलन बदल हा निर्णयच चूक ठरवता येत नाही.

बाकी, चलन बदल हा एक scam होता, रिलायन्स/अदानीचा फायदा झाला इत्यादी थियरी असणाऱ्या लोकांना :
राजकारण अगदीच निरस होऊ नं देता मनोरंजनाचा कोईफिशीयंट कायमच ऊंच ठेवण्याचं महत्वाचं सामाजिक कार्य आपण करत आहात. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. कीप अप दि गुड वर्क!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?