' औरंगाबाद दंगल : MIM आमदार इम्तियाज जलील यांच्या अनावृत्त पत्राला चंद्रकांत खैरे याचं उत्तर – InMarathi

औरंगाबाद दंगल : MIM आमदार इम्तियाज जलील यांच्या अनावृत्त पत्राला चंद्रकांत खैरे याचं उत्तर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम या पक्षाचे आमदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना अनावृत्त पत्र लिहिले होते. हे पत्र येथे वाचता येईल.

इम्तियाज जलील यांनी लिहिलेल्या या पत्राला खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्र लिहून उत्तर दिले आहे. ते प्रकाशित करत आहोत.

===

इम्तियाज भाई,

सर्व प्रथम आपणास सप्रेम जय महाराष्ट्र. खरं तर आपल्या पत्राला उत्तर देणार नव्हतो. परंतु एक खोटी गोष्ट १० वेळा लोकांना सांगितली तर लोकांना ती खरी वाटते हे लॉजिक आपणास माहित आहे. त्यात आपण पत्रकार आहात म्हणून आपण त्या लॉजिक चा पुरेपूर वापर करीत सोशल मिडिया मध्ये पत्र प्रपंच केलात.

सर्व प्रथम एक सच्चा हिंदू म्हणून, सन्माननीय बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून, आणि त्यानंतर संभाजीनगरचा एक जबाबदार खासदार म्हणून आपल्या पत्रावर जरा आपल्याशी बोलावं म्हणून हे पत्र…

तर आपण माध्यमांमध्ये म्हणालात, घडलेली दंगल खैरेंनी त्यांच्या राजकीय फायद्या करिता घडविली. तर आपण मला वैयक्तिक पत्र न पाठवता जाहीर पणे पत्र लिहिले ते राजकीय स्वार्थापोटी अथवा सहानुभूती मिळविण्यासाठीचं तर लिहिले ना..? मला येऊन भेटला असतात अथवा फोन केला असतात तरी तुम्ही हे विषय मला बोलू शकला असतात. परंतु त्याचा गवगवा होणार नव्हता ना? यातच आपली राजकीय महत्वाकांक्षा दिसते.

 

imtiaj-jalil-inmarathi
youtube.com

आपण आपल्या पत्रात म्हणालात

“मी सर्व हिंदूंचे रक्षण करणार. मी हिंदूंचा नेता आहे. मी हिंदूंचा आमदार होतो, मी हिंदूंचा खासदार आहे.”

या माझ्या वक्तव्यांमुळे म्हणे संवेदनशील मानवतावादी औरंगाबादी नागरिक म्हणून तुम्हाला प्रचंड वेदना झाल्या तर मला सांगा

“१५ मिनिट पुलिस हटादो किसमे हिम्मत है बता देंगे”

असं ओवेसी जाहीर सभेत बोलतात तेव्हा तुम्ही तुमचं मन कुठे गहाण ठेवलं होतंत? आजही तुमच्या पक्षाचे MIM चे वेगवेगळे नेते बाहेरून येऊन इथे आमखास मैदानावर चिथावणीखोर भाषणं करतात. तिथे उपस्थित असलेले लाख-दीड लाख मुस्लीम समाजातील लोक त्यांना सहमत होऊन टाळ्यांच्या कडकडाट करतात तेव्हा मग काय ते नेते तिथे संस्कारवर्ग चालवत असतात का? आणि मी हिंदू आहे, हिंदू आमदार आहे, हिंदुंच रक्षण करणार असं बोललो तर त्यात तुमच्या मनाला वेदना का होतात?

मी “रक्षण करणार” असं बोललो, ते का बोललो?

ज्यांच्या वर हल्ला होत असतो रक्षण त्याचं करायचं असतं ना? जेव्हा समोरून मिरची पुड्या, पेट्रोल बॉम्ब, तलवारी, लोखंडी सळया, दगडफेक करण्यासाठी काश्मीर मेड गलोरी इतकी सगळी तयारी करून ठेवून आक्रमण होतं तेव्हा माझ्या सारख्या बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकाने हातात बांगड्या घालून तुमच्या सोबत शांती मार्च काढत तमाम दंगलग्रस्त हिंदूंना दंगलीत जळत ठेवायचं होतं का?

अहो ते आमदार, खासदार, प्रतिष्ठा या सगळ्यांपेक्षा बाळासाहेबांनी दिलेलं शिवसैनिक हे पद माझ्या करिता परमोच्च आहे. आणि हिंदुत्व रक्षण हे त्या पदाचं अंतिम ब्रीद आहे. ते कर्तव्य आहे आमचं. ते आयुष्यभर होणारच आहे !

आणि मला आपण जे समझदारी चा डोस पाजण्याचा प्रयत्न करीत आहात, तोच डोस जर दंगल सुरु असतांना तमाम मुस्लीम नेते रात्रभर सगळ्या मोहल्ल्यांमध्ये ५-१० हजार तरुणांना घेऊन त्यांच्या समोर जो संस्कारवर्ग चालवून व्यवस्थित चिथावणीखोर संस्कार करून दंगल पेटवत होते त्यांना पाजला असतात तर मला हे पत्र लिहिण्याची वेळ आपल्यावर आली नसती.

आपण म्हणालात, मी सर्व धर्माच्या सर्व लोकांचा खासदार आहे. हो आहेच! मलाही ते मान्यच आहे. परंतु म्हणून मी माझं हिंदुत्व रक्षणाच्या परम कर्तव्यापासून दूर पळू शकत नाही. हिंदू कधीच स्वतःहून कोणाशी पंगे घ्यायला जात नाहीत आणि गेलेही नव्हते. मग कोणी पंगे घ्यायला आल्यास त्याला गुलाबाची फुलं वाहायची का? तशी पद्धत आम्हा शिवसैनिकांमध्ये नसते. तसे संस्कारच आमच्यावर मा. शिवसेना प्रमुखांनी करून ठेवलेत.

हिंदुंवर कोणीही हल्ला केल्यास त्याला चोख उत्तर मिळणारच. तेव्हा हल्ला करणार्यांचा धर्म कोणता आहे ह्याच्याशी आम्हाला देण घेणच नसतं. त्या पेक्षा कोणी हल्ला करूच नका ना? सर्वांनीच गुण्या गोविंदाने राहा. आमचे देखील तेच म्हणणे आहे… सर्वे भवन्तु सुखिनः!

आपण पुढे म्हणता “छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे आपण आपल्या सर्व रयतेसाठी केलेल्या कार्यानं आपण चांगले हिंदू आहात हे दाखविले पाहिजे, अशी इथल्या नागरिकांची इच्छा आहे.” तर आपल्या माहिती साठी – आपला इतिहास कमजोर असल्या कारणाने सांगतो – की साक्षात परम आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील स्वराज्यावर हल्ला करणार्यांना पायघड्या घातल्या नव्हत्या. त्यांचा योग्य तो बंदोबस्तच केला होता! मग आम्ही देखील तर तेच करत आहोत ना?

 

aurangabad-clashes-inmarathi
youtube.com

आपण पुढे म्हणता “शहर शांत करणे ही आपली लोकप्रतिनिधी या नात्याने पहिली जबाबदारी होती” का? आपण लोकप्रतिनिधी नाही आहात का? आपण हल्ला होऊच नसता दिला तर ही वेळ का आली असती? एकीकडे आपल्या पक्षाचे नगरसेवक आणि नेते दंगल पेटवतात आणि वर आम्हाला ती शांत करायची विनंती करतात हे दुतोंडी राजकारण नाही का?

आम्ही दंगल केलीच नाही तुमच्या पक्षाच्या लोकांकडून ती पेटविल्यावर आम्ही आमच्या पद्धतीने ती शांतच केली…

आणि लोकप्रतिनिधी म्हणूनच बोलायचं तर १९९० ला सर्वप्रथम शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने आणि या शहरातील जनतेच्या पाठबळावर मी या शहरात हिंदू आमदार म्हणून निवडून आलो. त्यानंतर १९९५ ला परत निवडून आल्या नंतर मा. शिवसेनाप्रमुखांनी मला कॅबीनेट मंत्रिपद देऊन या शहराचं पालकमंत्री केलं. आपण ४ वर्षापूर्वी आमदार झालात त्यावेळी माझा ३ वेळा खासदार म्हणून माझा कार्यकाळ पूर्ण करून झाला होता, सध्या माझी चौथी टर्म सुरु आहे.

इतक्या कालखंडात मी शहरात किती दंगली घडविल्या? या कालखंडात एकही दंगल शहरात मी होऊ दिली नाही. तुमच्या हैद्राबादच्या निजाम मेड कट्टरतावादी पक्षाचा शहरात प्रवेश झाल्यावरचं दंगली कशा काय होतात??

“दंगल करणारे मुठभर एकदोन हजार हिंदू किंवा मुस्लीम असतील पण औरंगाबाद शांत रहावे, हिंदू व मुस्लीमांनी गुण्यागोविंदाने व प्रेमाने रहावे असे वाटणारे लाखों हिंदू व मुस्लीम आहेत, हे खरे नव्हे का?” असं तुम्ही म्हणता. तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, दगडफेक करणारा मुस्लीम समाजाचा गट एकदोन हजार नाही तर १० हजारापेक्षा जास्त होता आणि पूर्ण तयारीनिशी होता.

हिंदू वसाहतींमध्ये सर्व जण झोपेत असतांना रात्रीच्या शांततेत पद्धतशीरपणे हा दंगलीचा डाव खेळल्या गेला होता. आणि हिंदू-मुस्लीम आजवर येथे प्रेमानेच तर आजवर राहत होते ना?

दंगली या आधी शिवसेनाचा शहरात प्रवेश झाल्यानंतर आम्ही होऊच दिलेल्या नव्हत्या. त्या आज तुमचा कट्टर मुस्लीम पक्ष शहरात आल्यावरच कशा काय होत आहेत?

 

muslimleader_owaisi_inmarathi
indianexpress.com

स्वामींच्या आईस्क्रीम च्या दुकानाबद्दल आपण बोललात. दुकान जाळणारे तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते आणि वरून तुम्हीच बांधून देताय – हे राजकारण जनतेला कळत नाही असं आपल्याला वाटत का? तसं असेल तर लवकर जागे व्हा… जनता है… सब जानती है!!

आणि विकासाबद्दल बोलत आहात तेव्हा एक लक्षात घ्या, २० वर्ष झाले मी खासदार आहे. त्या पूर्वी असलेलं संभाजीनगर आणि आजचं संभाजीनगर यांची जरा तुलना करून पहा. प्रत्येक सामान्य व्यक्तीचा आलेला फोन मी स्वतः उचलतो. अर्ध्या रात्री त्यांच्या संकटकाळी त्यांच्या मदतीसाठी धावून जातो. हे मोठेपणा म्हणून सांगत नाही, तर ते माझं कर्तव्यच आहे असं मी समजतो. तसे संस्कारच मा. शिवसेना प्रमुखांचे माझ्यावर आहेत.

आजही मा. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरेंच्या सुसंस्कृत तथा संयमी नेतृत्वाखाली आमचा पक्ष ८०% समाजकारण आणि २०% राजकारण करतो. हे आमचं तत्वच आहे. स्वतः दंगली पेटविण्याचे उद्योग कधी आम्ही केले नाहीत, कारण आमचं पक्ष नेतृत्वच सुसंस्कृत आहे आणि सबंध महाराष्ट्राने ते अनुभवलं आहे.

संभाजीनगर मधील जनता देखील ते अनुभवत आहे आणि म्हणूनच त्या जनतेच्या आशीर्वादाने मी आज खासदार आहे. पण त्याच वेळी तुमच्या पक्षप्रमुखांचे चिथावणीखोर संस्कारवर्ग सबंध हिंदुस्थान एकतो. म्हणून तुम्हाला नम्र विनंती आहे लोकं सगळं पाहत असतात, तुमच्या सारखं दुतोंडी राजकारण फार काळ टिकत नसतं.

बाकी आपण सुज्ञ आहात. आपण हैद्राबाद इम्पोर्टेड कट्टरपंथीय MIM ची विचारधारा नाकारत शहरात शांतता ठेवाल अशी आशा व्यक्त करतो. तसेच ती शांतता ठेवण्यासाठी कधीही अर्ध्या रात्री मला हाक मारा मी आपल्या सोबत असेल ही देखील हमी देतो.

जय महाराष्ट्र!

आपलाच हक्काचा खासदार
चंद्रकांत खैरे

===

प्रत्युत्तरादाखल लिहिलेल्या पत्राची प्रेसनोट:

Chandrakant Khaire reply to Imtiaz Jaleel 1 inmarathi

 

Chandrakant Khaire reply to Imtiaz Jaleel 2 inmarathi

 

Chandrakant Khaire reply to Imtiaz Jaleel 3 inmarathi

 

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?